निनाद परुळेकर ते साठ वर्षांपूर्वीचे दिवस अजूनही आठवतात. आम्ही पाल्र्याला पूर्वेकडे राहायचो. दीक्षित रोडच्या एका टोकाला माझे घर. शाळेला जाणे-येणेही त्याच रस्त्यावरून व्हायचे. या रस्त्यावरील वीजखांबांना जोडणाऱ्या तारांवर चिमणीच्या आकाराचे, निळसर काळय़ा रंगाचे पक्षी अगदी रांगेत बसलेले असायचे. पंधरा-वीस पक्षी हवेतच उलटय़ा सुलटय़ा कोलांटय़ा मारायचे; अगदी ‘बेशिस्तपणे!’ त्यांना ‘पाकोळय़ा’ म्हणतात, एवढीच त्यांच्याबद्दलची माहिती तेव्हा होती. बाकी कुतूहल वाटावं, असं काही वाटलं नव्हतं त्यांच्याबद्दल. पण शिक्षण संपवून कामाला लागल्यानंतर या पक्ष्यांनी लक्ष वेधून घेतलंच. नोकरीचे स्थान नेव्ही-लायनगेट. आमच्या गेटच्या समोरच ‘बीएनएचएस’ या संस्थेचे ऑफिस. तिकडे वन्यप्राणी, वन्यपक्षी आणि निसर्गाबद्दलही बरीच माहिती दिली जाते आणि ते जंगलात कुठेकुठे फिरायलाही घेऊन जातात, हे कळले. दुसऱ्याच दिवशी त्यांचा सदस्य झालो आणि महिनाभरात त्यांच्या वनसहलींत भटकंतीही सुरू झाली. फक्त साधारण स्टँडर्डचा कॅमेराही माझ्याकडे होताच. त्याच वेळी मला पाल्र्याची आणि तेव्हा विजेच्या तारांवर बसणाऱ्या त्या पाकोळय़ांची आठवण झाली. त्या पाकोळय़ा दीक्षित रोडच्या शेवटी अन् तेथेच का राहायच्या या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. रस्त्याच्या शेवटाला एक मोठा तबेला होता अन् त्या तबेल्यात पन्नास-साठ गाई, म्हशी वगैरे होत्या. त्या सर्वाचे शेण ते भय्ये तेथेच असलेल्या एका मोठय़ा रिकाम्या खड्डय़ांत टाकायचे आणि तिथलीच काही माणसे शेजारच्या पडीक जमिनीवर गोवऱ्या (शेणी) थापायचे. ओल्या आणि सुक्या शेणाच्या एवढय़ा मोठय़ा पसाऱ्यावर, अर्थातच, हजारोंनी कीटक, चिलटे, माश्या अशा एक ना दोन नाही तर पंधरा-वीस प्रकारच्या जिवांना मस्त खाद्य मिळालेले होते आणि या जिवांना खायला पाकोळय़ा फेऱ्या मारायच्या. अर्थात जेव्हा मला हे ‘पाकोळय़ांचे ज्ञान’ मिळाले होते तेव्हा पार्ले आणि दीक्षित रोड सारेच बदलेले होते आणि पाकोळय़ाही आधुनिक पाल्र्याला निरोप देऊन अन्यत्र कुठेतरी, शहरांबाहेर गेल्या होत्या. पाल्र्याच्या पाकोळय़ांचा विषय तेथे संपला, पण नंतर अनेक वर्षांनी नाशिकजवळील नांदूरमधमेश्वर येथे गेलो असता, अवतीभोवती अनेक पाकोळय़ा घिरटय़ा घालताना दिसल्या. धरणाच्या बंधाऱ्याला लागून असलेल्या सुरक्षा तारांवर पाकोळय़ांचे छोटे थवे बसले होते. मी त्यांच्या अगदी दहा फूट जवळ आलो तरी त्या उठत नव्हत्या. मी कॅमेरा काढून त्याला लावलेल्या टेलिफोटोलेन्सने त्यांचे निरीक्षण करू लागलो, तो काय आश्चर्य? उडताना त्या पाकोळय़ा दिसल्या त्यांच्यापेक्षा तारांवर बसलेल्या पाकोळय़ा फारच सुंदर वाटत होत्या. ती साधारण चिमणीच्या आकाराएवढी मोठी आणि तिच्या डोक्यावर बऱ्यापैकी पिंगर-विटकर रंगाचा डाग होता. बाकी सर्व शरीर निळसर काळे, पण तकाकणारे, असे होते. गळय़ापासून पोटापर्यंतचा सर्व भाग पांढरा होता. पण पाय आणि नखे मात्र दुबळी व आत वळलेली अशी होती. त्यामुळेच त्यांना तारेवर छान बसता येते, पण जमिनीवर किंवा झाडांच्या फांद्यावर बसणे जमत नाही. काही क्षणानंतर त्या पाकोळय़ा ‘चिट्चिट्’ असा आवाज करीत उडाल्या आणि उंचावर विजेच्या तारांवर जाऊन बसल्या. वाऱ्याने हलणाऱ्या तारांबरोबर छान झोका घेऊ लागल्या. एकाएकी त्यापैकी एकीने हवेत सूर मारला आणि चोच उघडून काहीतरी गडप केले आणि ती तारेवर येऊन बसली. पाहतो तर तिच्या चोचीत एक कीटक होता. अशा प्रकारे हवेत उडणारे कीटक आपल्या तीक्ष्ण डोळय़ांनी हुडकून त्यांना हवेतच गट्टम करण्याचे असाधारण कसब या पाकोळय़ांत आहे. त्यामुळेच त्या वेडय़ावाकडय़ा, कुठल्याही दिशेने ‘बेशिस्तपणे’ का उडत असतात, हे समजले. तिथून पुढे मधमेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर नदीच्या डाव्याच अंगाला कातळाच्या खडकाच्या निसर्गनिर्मित बांध लागला आणि बांधाच्या वर हवेत सुमारे दोनशे-तीनशे पाकोळय़ा आवाज करीत घिरटय़ा घालत असलेल्या दिसल्या. माझ्यापासून तीस-चाळीस फुटांवर नदीपात्रातील कोरडय़ा जागेवर बऱ्याच पाकोळय़ा मातीतून काहीतरी वेचन होत्या. अधिक बारकाईने पाहिलं तेव्हा त्या चिखलाचा गोळा चोचीत धरून नेत होत्या, असं दिसलं. हा गोळा बांधावर चिकटवत होत्या. अशा प्रकारे चिखलगोळय़ाचे, नारळाच्या वाटीसारख्या आकाराचे, मातीचे घरटे त्या करीत होत्या. यापैकी कित्येकांची घरटी तयार झालेली होती, तर काहींची तयार होत होती. प्रचंड धावपळ आणि अविश्रांत मेहनत केवळ आपल्या भावी संसाराची घडी बसविण्यासाठी करावी लागते हे पाकोळय़ांनी दाखवून दिले होते. ही घरटी करण्यामागचे वैशिष्टय़ असे की, ही जागा सर्वच दृष्टीने सुरक्षित होती, म्हणजे तेथे माणसांचा वावर नव्हता. तेथे साठलेल्या स्थिर पाण्यावर शेवाळ व वनस्पतींची वाढ झालेली होती. म्हणजे आपोआपच तेथे कृमीकीटक आले, त्यामुळे पाकोळय़ांच्या पोटापाण्याची सोय झाली. दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की, त्या घरटय़ांच्या वसाहतीवर फक्त सकाळी आणि संध्याकाळीच सूर्याची किरणे पडतील, हे जाणून त्यांनी नेमक्या जागी घरटी केली होती. निसर्गाने मुक्या जिवांना कशी उपजत बुद्ध दिली आहे, ते यानिमित्ताने जाणवले. एका पक्ष्याविषयीच्या, इंग्रजी पुस्तकात पाकोळय़ांविषयी अशी माहिती आढळली की, नव्याने वीण घातलेल्या पाकोळय़ा एका दिवसात सुमारे साडेसहाशे किलोमीटर्स (चारशे मैल) एवढे उड्डाण करतात. कारण आपल्या पिलांनाही त्यांना अन्न (भक्ष्य) भरवायचे असल्याने अविश्रांत उड्डाणाचे श्रम करावे लागतात; परंतु सर्वसाधारण काळात त्या ३२५ किलोमीटर्स (दोनशे मैल) एवढे उड्डाण सहजच करतात. पाकोळय़ांच्या विणीचा हंगाम अमुकच असा नसतो. तरीही त्यांची वर्षांतून दोनदा वीण होते. त्या एका वेळेला चार ते पाच अंडी घालतात. पिले उडायला लागेपर्यंत पाकोळय़ा त्यांना भक्ष्य भरवतेच. पण उडय़ा पिलांनाही ती हवेतच भक्ष्य भरविते. अशा या पाकोळय़ा ‘बेशिस्तीत’ उडणाऱ्या, पण गुड प्लॅनर आणि ग्रेट बिल्डर! Email : pneenad@gmail.com