देशातील आघाडीच्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 40% टॅरिफ दरवाढ केल्यामुळे युजर्सच्या खिशाला कात्री लागली आहे. प्लॅन्सच्या दरवाढीमुळे आर्थिक नुकसान भरुन काढण्यास मदत होईल अशी कंपन्यांना अपेक्षा आहे. पण, टॅरिफ दरवाढीबाबत मोबाइल ग्राहकांच्या चिंतेत अजून वाढ करणारी एक बातमी आहे.

येत्या काळात ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, “टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरुन काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणं आवश्यक आहे” असं मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)चे संचालक जनरल राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केलंय. यासोबत, प्रतिग्राहक सरासरी महसूल(ARPU)200रुपये इतका वाढवणं गरजेचं आहे असंही ते म्हणालेत. तसंच सीओएआयने, युजरला गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे यासाठी Floor Price निश्चित करण्याची मागणी ‘ट्राय’कडे केली आहे. Floor Price निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, सध्या भारतात जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत एअरटेल सर्वाधिक चांगली 4G सेवा देत आहे.

‘ट्राय’ सध्या याप्रकरणी समभाग धारकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे, त्यानंतरच दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.