कुपोषण आणि मद्यपानामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) प्रमाण वाढत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन (बीयूएसएम) आणि तामिळनाडूच्या जवाहरलाल वैद्यकीय संस्थेने याबाबत अधिक संशोधन केले. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिप्रमाणात घेतले जाणारे मद्य आणि क्षयरोग यांचा परस्पर संबंध असल्याचे त्यांना आढळून आले. यासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणावर क्षयरोगाच्या रुग्णांचा अभ्यास केला. प्लॉस वन या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. क्षयरोगग्रस्त रुग्णांचा घरातील लोकांशी आलेला संबंध आणि रक्तातील मार्करचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या क्षयरोग रुग्णांची इतर भागांतील लोकांशी तुलना करण्यात आली. यातील जवळपास ६१ टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना उपासमार अथवा कुपोषण झाल्यामुळे क्षयरोग झाला. तर अधिक प्रमाणात मद्यपान केल्यामुळे ७५ टक्के पुरुषांना क्षयरोग झाल्याचे संशोधकांना आढळून आले. अंदाजानुसार, जगभरामध्ये प्रतिवर्षी १०.६ दशलक्ष लोक क्षयरोगाला बळी पडतात. यामध्ये भारताचे प्रमाण ७५ टक्के अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोगाबाबत अधिक संशोधन करण्याची गरज व्यक्त केली असून, त्या पाश्र्वभूमीवर हे संशोधन हाती घेण्यात आले होते. भारत सरकारने नुकतेच क्षयरोग रुग्णांच्या पौष्टिक आहाराची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. कुपोषण आणि अधिक मद्यपान केल्यामुळे क्षयरोग होत असून त्यावर आवश्यक ते उपाय करण्याची गरज संशोधनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.