Diwali 2025: बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. लक्ष्मीपूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो. या दिवशी दिवाळी पाडवादेखील साजरा केला जातो. तेव्हा हा सण नेमका काय आहे, तो कसा साजरा केला जातो, त्यामागची परंपरा काय हे सविस्तर जाणून घेऊ…
दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी…
अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीचे औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे. पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते आणि ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’… अशी प्रार्थना केली जाते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो. या वर्षी २२ ऑक्टोबर २०२५ला बलिप्रतिपदा साजरी होणार आहे.
बलिप्रतिपदेचे शुभ मुहूर्त
शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत
दुसरा शुभ मुहूर्त सकाळी १०.५६ वाजल्यापासून ते दुपारी १२.२३ वाजेपर्यंत
तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी ४.२४ वाजल्यापासून ते ६.०९ वाजेपर्यंत
पौराणिक कथा
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही या राजाची ख्याती होती. पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात समोर उभे राहिले. या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचन दिल्या कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही दानशूरपण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी तसंच दीपोत्सवही साजरा केला जातो.