Body Parts you Should Not Touch: आपण रोजच्या घाई-गडबडीत शरीराच्या काही भागांना नकळत वारंवार स्पर्श करतो… पण हेच स्पर्श तुमचं आरोग्य धोक्यात आणू शकतात; इतकं की तुम्हाला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. तुम्ही शरीराच्या या भागांना किती वेळा स्पर्श करता? विचार करा. एका चुकीच्या सवयीमुळे तुमच्या शरीरात जीवघेणे जीवाणू आणि विषाणू शिरकाव करू शकतात. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही चूक वारंवार करू नका. आजच ही सवय बदलली नाहीत, तर उद्या तुम्हाला उशीर होऊ शकतो.
आपण रोज दरवाजांचे हँडल, मोबाईल, नाणी, कागदपत्रं, लिफ्टचे बटण आदींसारख्या असंख्य वस्तूंना वारंवार लावतो आणि मग त्याच हातांनी सहजपणे स्वतःच्या शरीरालाही स्पर्श करीत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हेच हात तुमच्यासाठी गंभीर आजार घेऊन येऊ शकतात? तज्ज्ञ सांगतात की, शरीरातील काही विशिष्ट अवयवांना वारंवार हात लावणं म्हणजे रोगांना थेट आमंत्रण देण्यासारखं आहे.
तीर्थंकर महावीर विद्यापीठ, मुरादाबादचे रेसिडेंट डॉक्टर डॉ. मनीष जैन यांचं म्हणणं आहे की, आपण नकळत आपल्या शरीराच्या अनेक नाजूक भागांना अनेक वेळा हात लावतो. पण हे हात अनेक वेळा धूळ, मळ, जीवाणू आणि विषाणूंनी भरलेले असतात. त्यामुळे हे हात शरीराच्या आत सूक्ष्म जीव-जंतू पोहोचवतात आणि त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. काही वेळा ही स्थिती इतकी गंभीर होऊ शकते की, त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं. चला, तर मग ज्यांना वारंवार हात लावणे योग्य नाही, असे शरीराचे ते पाच अवयव कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ…
१. चेहरा : चेहऱ्याला वारंवार हात लावल्यानं त्वचेमध्ये जीवाणू पोहोचून मुरमे, अॅलर्जी आणि त्वचेसंबंधीचे आजार होऊ शकतात. डोळे, नाक, तोंडातून हे जंतू थेट शरीरात जातात आणि सर्दी, डोळ्यांची अॅलर्जी निर्माण करतात.
२. कान : काही जण वारंवार कानात बोटं घालतात. तसेच पिन किंवा नखंही कानात घालतात. त्यामुळे कानाच्या आतील भागांना इजा होऊन संसर्ग, वेदना आणि कधी कधी श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका निर्माण होतो.
३. डोळे: डोळे हे अतिशय संवेदनशील असतात. हातांवरील जंतूंमुळे डोळ्यांना संसर्ग होतो. धूळ किंवा कसला कचरा डोळ्यांत गेला तरी डोळे रगडणं टाळावं. कारण- त्यामुळे रेटिनावर परिणाम होऊ शकतो.
४. तोंड: तोंडात अनेक जीवाणू असतात. पण, हातांवरचे हानिकारक जंतू तोंडातून आत गेले, तर पचनसंस्थेवर परिणाम होतो. विशेषतः सर्दी-खोकल्याच्या वेळी तोंडाला हात लावणं टाळावं.
५. नखं : नखांखाली जीवाणू दडून बसलेले असतात. नखं चावणं, कुरतडणं किंवा नखांना वारंवार स्पर्श करणं यांमुळे संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे नखं स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे.
थोडक्यात काय?
या साध्या वाटणाऱ्या सवयी मोठ्या आजारांना जन्म देऊ शकतात. म्हणूनच स्वच्छता पाळा, हात धुवा आणि वरील अवयवांना अनावश्यक स्पर्श करणं टाळा. तुमची छोटीशी दक्षता भविष्यातल्या मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते.