Raksha Bandhan 2024 Thali Decoration: बहीण-भावामधील प्रेम दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. पंचांगानुसार, दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण- भावाला राखी बांधल्यानंतर त्यांना मनासारखी ओवाळणी मिळते. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थसुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षण करण्याची आठवण करून देणारे एक बंधन या दिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. रक्षाबंधन हा सण आज सोमवार, १९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होत आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी ०१.३० ते रात्री ०९.०८ पर्यंत आहे. रक्षाबंधनात राखी थाळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी पूजेची थाळी सजवतात. रक्षाबंधनाच्या ताटात कोणकोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे, या संदर्भात जाणून घेऊया.

रक्षाबंधननिमित्त ओवाळणीच्या थाळीत ‘या’ गोष्टी ठेवा

राखी

राखी हा केवळ रेशमाचा धागा नसून, ते दोन पवित्र व अतूट नात्यांचे प्रतीक आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मग हा राखीचा धागा भावाला त्या वचनाची आठवण करून देतो. त्यामुळे ओवाळणीच्या थाळीत राखी असायलाच हवी.

कुंकू

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना बहीण भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही शुभ कार्यात टिळा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी ताटात कुंकू ठेवा; जेणेकरून तुम्ही त्यासोबत तुमच्या भावाला टिळा लावू शकता.

(हे ही वाचा : प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी )

दिवा

रक्षाबंधनाची सजविलेली थाळी ही पूजेच्या थाळीसारखी असते. राखी बांधल्यानंतर भावाची आरती केली जाते आणि त्याला हानीपासून वाचवण्यासाठी प्रार्थना केली जाते. राखीच्या थाळीत तेल किंवा तुपाचा दिवा ठेवा. हा दिवा सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.

अक्षता

पूजेच्या ताटात अक्षता अवश्य ठेवाव्यात. अक्षता औक्षवंत म्हणजे आयुष्याची वाढ करणाऱ्या असतात. त्यामुळे दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकण्यात येतात. त्यामुळे राखीच्या ताटात अक्षता असणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारळ

पूजेमध्ये नारळ खूप शुभ मानले जाते. काही ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाला नारळ देतात. हे फळ देवी लक्ष्मीचे फळ मानले जाते. बहीण आपल्या भावाला नारळ देते आणि त्याला प्रगतीसाठी शुभेच्छा देते. ताटात नारळही ठेवा. मान्यतेनुसार राखी बांधताना नारळ वापरल्याने भावाच्या जीवनात सुख-समृद्धी येते.