आयुर्उपचार वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com कधी खावं? याबाबत ही दोन टोकाची मतं आपल्याला समाजात दिसतात. माझ्यासाठी योग्य काय, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला असेल. मी ‘दीक्षित’ यांच्याप्रमाणे दोन वेळेला जेवावं का आणि ‘दिवेकर’ सांगतायत त्यांच्याप्रमाणे थोडं थोडं जास्त वेळा जेवावं? आयुर्वेद याबाबत काय म्हणतो आपण आज हे बघू या. आयुर्वेदाप्रमाणे जठराग्नीचे चार प्रकार सांगितले आहेत. विषम, तीक्ष्ण, मंद व सम. वात प्रकृतीचा विषम अग्नी म्हणजे रोज ठरल्यावेळी भूक असेलच असा नाही. आज आहे तर उद्या नाही असा. पित्त प्रकृतीचा तीक्ष्ण अग्नी. अशा लोकांचं पचन इतरांपेक्षा लवकर होते, त्यामुळे त्यांना जास्त वेळा खावे लागते व न खाल्ले तर त्यांना कसे तरी होते. कफ प्रकृतीचा अग्नी मंद असतो. अशांनी अनेक वेळा एकदा जेवले तरी पुरते. सम प्रकृतीचा अग्नी सम असतो. अशा लोकांना ठरावीक वेळा भूक लागते. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना ‘दीक्षित डाएट’ चालणार नाही. कफ प्रकृतीच्या लोकांना ‘दिवेकर डाएट’ त्रासदायक होईल. याशिवाय भूक लागली असता न जेवणे व लागली असता पूर्ण उपाशी राहणे हेही आयुर्वेद दृष्टीने चुकीचे आहे. असे केले असता अंग दुखणे, ग्लानी, चक्कर, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. म्हणून भूक लागली असता खावे हा सर्वात सोपा नियम आहे. भारतामध्ये कामाला बाहेर पडण्यापूर्वी १० वाजण्याच्या दरम्यान जेवण व सूर्यास्त होण्यापूर्वी संध्याकाळचे जेवण अशी पद्धत होती. बदलत्या जीवनशैलीमुळे जेवणाच्या वेळा बदलल्या आहेत व पुढे गेल्या आहेत. वजन कमी होण्यासाठी डायबेटिससाठी किंवा स्वास्थ्यरक्षणासाठी कोणताही डाएट करताना आपल्या प्रकृतीला ते झेपेल का हे आधी जरूर बघा. प्रत्येक व्यक्तीची भूक, पचविण्याची ताकद वेगवेगळी आहे. ऋतू व आपल्या प्रकृतीप्रमाणे योग्य वेळी जेवण करा व निरोगी राहा.