न्यूयॉर्क : बैठय़ा कामामुळे आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासानंतर पाच मिनिटे चालणे आवश्यक आहे, असा निष्कर्ष नव्या संशोधनात काढण्यात आला आहे. यासंबंधी माहिती ‘जर्नल मेडिसिन अॅड सायन्स स्पोर्टस् अॅड एक्सरसाइज’मध्ये प्रकाशित करण्यात आली. या संशोधनात ११ निरोगी प्रौढ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीच्या पाच दिवसांत त्यांना सलग आठ तास एकाच ठिकाणी बसविण्यात आले. तर, नंतर त्यांना प्रत्येक अर्ध्या तासानंतर पाच मिनिटे चालण्यास सांगितले. या दोन्ही प्रयोगादरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब आदींवर कसा परिणाम होतो, हे तपासले. त्यावेळी प्रत्येक अर्ध्या तासानंतर पाच मिनिटे चालणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे स्पष्ट झाले. नियमित अंतराने काही वेळ चालण्याचा शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठीही मोठा फायदा होतो, असे या संशोधनामुळे अधोरेखित झाले. अशा व्यक्तींना अधिक थकवा जाणवत नाही. त्यांचे वर्तनही चांगले राहते आणि ते ऊर्जावान असतात, असे आढळले आहे. एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसणाऱ्यांना मधुमेह आणि हृदयरोगासह अन्य आजारांचा धोका असतो. त्यामुळे हे नवे संशोधन उपयुक्त ठेरल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.