अतिप्रमाणात शीतपेय घेणे आणि खूप गोड खाण्याच्या सवयीमुळे चांगले आरोग्य असणाऱ्या लोकांनाही हृदयविकार होण्याची शक्यता असल्याचा इशारा संशोधकांनी नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात दिला आहे.  ब्रिटनमधील सुरे विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. खूप साखर असलेले खाद्यपदार्थ खाण्यामुळे आरोग्य चांगले असणाऱ्या लोकांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते. तसेच यकृतामध्येही मोठय़ा प्रमाणात चरबी साठून राहते, असे या संशोधकांना आढळून आले.

क्लिनिकल सायन्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासाठी दोन गट स्थापन करण्यात आले. यामध्ये कमी आणि अधिक प्रमाणात यकृतात असलेल्या फॅटचा अभ्यास करण्यात आला. त्यांना कमी/अधिक प्रमाणात साखर देऊन त्याचा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य यावर नेमका काय परिणाम होतो, हे तपासण्यात आले.

कमी साखर असलेल्या आहारामध्ये १४० पेक्षा कमी कॅलरीज असतात. तसेच अति प्रमाणात साखर असलेल्या आहारामध्ये ६५० पेक्षा अधिक कॅलरीज असतात.

१२ आठवडे उच्च प्रमाणात साखरेचा आहार देण्यात आल्यानंतर सहभागी लोकांच्या यकृतातील चरबीचे प्रमाण अधिक आढळून आले. त्यामुळे त्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, हृदयविकारचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढला होता, असे संशोधकांनी सांगितले.

जर अधिक प्रमाणात साखरयुक्त पदार्थ घेतले तर चरबीच्या चयापचय क्रियेमध्ये बदल होतो. तसेच यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते, असे ग्रिफीन यांनी म्हटले आहे.