– सुजाता अष्टेकर, झेडटीसीसी
आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. मात्र अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यासंदर्भात अधिक जनजागृती करण्याची गरज आहे. मृत्यूपश्चात अवयवदान करून साधारण आठ जणांचे आयुष्य वाचू शकते. नेत्रदान, त्वचादान यांसारखे दान करून अनेकांचे आयुष्य आपण बदलू शकतो.
मृत्यूनंतर कोणत्या अवयवांचे दान करता येते आणि कसे करता येते?
एखाद्या व्यक्तीची ‘ब्रेन डेथ’ झाल्यास सर्वाधिक अवयवांचे जसे हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, आतडी, हात या अवयवांचे दान करता येऊ शकते. तसेच नेत्रपटल, हृदयाच्या झडपा, त्वचा, हाडे यांचे दानदेखील करता येते.
‘ब्रेन डेथ’ ही फक्त सरकारमान्य रुग्णालयामध्येच घोषित करता येते. ज्यांचा प्रतिरोपण शस्त्रक्रियेशी संबंध नाही, असे सरकार मान्यताप्राप्त चार डॉक्टर ‘ब्रेन डेथ’ घोषित करतात. ‘ब्रेन डेथ’ व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अवयवदान होते. ‘ब्रेन डेथ’ला मानवी अवयव आणि उती प्रत्यारोपण कायदा-१९९४ नुसार मान्यता आहे.
घरी मृत्यू झाल्यास, सर्वसाधारणपणे नेत्रदान आणि त्वचादान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत होऊ शकते. लवकरात लवकर जवळच्या नेत्रपेढीला आणि त्वचापेढीला कळवणे आवश्यक आहे. तसेच, ‘कडिअॅक डेथ’ म्हणजे हृदय थांबल्याने मृत्यू झाल्यास हाडेही दान होऊ शकतात.
आपण सर्वानी गैरसमज दूर करून अवयवदानाचे सत्य जाणणे गरजेचे आहे.
- अवयवदानानंतर अंत्यविधी करता येतो.
- अवयवदानाने मृतदेहाला विद्रूपता येत नाही.
- ‘अवयवदान’ हा शब्द वापरला गेला आहे, त्यामुळे दान करणाऱ्या कुटुंबीयांना कुठलाही आर्थिक मोबदला दिला जात नाही. हे एक नि:स्वार्थी आणि परोपकारी दान आहे.
- अवयवदानाला मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार मान्यता आहे. हे दान कायद्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच केले जाते.
- अवयवांची खरेदी आणि विक्री हा कायद्याने गुन्हा आहे. दान केलेले अवयव विकले जात नाहीत.
- महाराष्ट्रात अंतर्गत अवयवांचे वितरण विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीद्वारे केले जाते. ती सरकारनिर्मित आणि सरकारमान्य संस्था आहेत.
- राज्य आणि प्रादेशिक स्तरावर अवयवांचे वितरण प्रादेशिक आणि राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था या सरकारी संस्थेद्वारे केले जाते.
१८ वर्षांवरील भारतीय नागरिक प्रतिज्ञापत्र (स्र्’ीॠिी ऋ१े) भरून मृत्यूनंतर आपले अवयवदान व्हावे अशी इच्छा नोंदवून ठेवू शकतो. आपण आपल्या जवळ अवयवदानाचे ‘डोनर कार्ड’ही बाळगू शकते. जेणेकरून नातेवाईकांना आपली इच्छा कळेल.
हे नक्की करा
१) अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरा.
२) डोनर कार्डची प्रिंट घेऊन, त्यावर स्वाक्षरी करून ते सतत आपल्याजवळ बाळगा.
३) डोनर कार्डवरील अवयवदान संस्थेचे क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करा. ते ठळकपणे डायरीत लिहा.
४) आपली इच्छा आपले जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना सांगा. त्यांच्याशी चर्चा करा.
५) मृत व्यक्तीने आधी अवयवदानाचा फॉर्म भरला असला तरी, अवयवदानासाठी जवळच्या नोतवाईकांची संमती आवश्यक आहे.
या वर्षी आपण ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करत आहोत. आपल्या भारत देशाने वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली आहे. या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व देशवासीयांना अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरण्याचे आवाहन केले आहे.
अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या!
http://www.ztccmumbai.org
http://www.mahaayudaan.in
http://www.notto.gov.in