लोकप्रिय वारसास्थळांना आजकाल पर्यटकांचा प्रचंड ओघ असतो. पण अनेकवेळा या स्थळांजवळच फारसे माहीत नसलेले ठिकाण असते. वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश नसेलही पण जरा वाकडी वाट करुन हे पाहणं नक्कीच लाभदायक ठरु शकते. महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात. भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन या मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरी सुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे असेच आहे.