देवी विशेष राधिका कुंटे - response.lokprabha@expressindia.com नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. देवीने महाशक्तीचे रूप धारण करून प्रबळ झालेल्या पापी प्रवृत्तींचा विनाश केला आणि लोकांना अभय दिले अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. त्यातून निर्माण झालेल्या स्थानमाहात्म्यातून ठिकठिकाणच्या देवीमंदिरांना महत्त्व आलं आहे. देशभरातली विविध देवी मंदिरे, त्यांचे स्थानमाहात्म्य यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा, आख्यायिका यांचा आढावा- वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर) वैष्णोदेवीचे उत्तरेकडील प्रचलित नाव मातारानी असे आहे. वैष्णोदेवी हा दुर्गादेवीचाच एक अवतार समजला जातो. हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर लोकप्रिय आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट पर्वतरांगेमधील या मंदिराला दरवर्षी जवळपास एक कोटी भाविक भेट देतात. वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा गावापासून घाट पायी चढावा लागतो. वर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यात्रेकरू कटरा गावाजवळच्या बालगंगा नावाच्या झऱ्यात स्नान करतात आणि मग डोंगर चढू लागतात. वाटेत अदकनवारी हे स्थान लागते. अदकनवारी म्हणजे आदिकुमारी देवी होय. तिथून पुढे भरवघाटी लागते. तिथे भरवाचे लहानसे मंदिर आहे. त्यापुढील घनदाट जंगलाला ‘माता का बाग’ असे म्हणतात. वैष्णोदेवी ही एका गुहेत आहे. गुहेबाहेरच्या एका चबुतऱ्याला विष्णू दरबार म्हणतात. यात्रेकरू त्यावर होम करतात. हा सगळा घाट चढून जाणे शक्य नसते त्यांच्यासाठी घोडी भाडय़ाने मिळतात. वैष्णोदेवी एवढय़ा दुर्गम भागात जाऊन का राहिली, याविषयी एक आख्यायिका आहे. ती अशी की, भरव नावाच्या दैत्याच्या मनात वैष्णोदेवीशी लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण देवीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. भरव बलप्रयोगाने आपला हेतू साध्य करील अशी देवीला भीती वाटली. त्याला चुकवण्यासाठी म्हणून ती डोंगरात पळून गेली आणि अदकनवारी या ठिकाणी लपून बसली. भरव तिचा शोध घेत तिथे पोहोचला. ते पाहून ती डोंगरावर उंच उंच चढत राहिली. अखेरीस एका गुहेजवळ भरवाने तिला गाठलेच. मग मात्र वैष्णोदेवीने आपले उग्र रूप प्रकट केले. भरवाशी झुंज देऊन त्याला ठार मारले. त्यानंतर ती गुहेत शिरून कायमची तिथेच राहिली. वैष्णोदेवीची यात्रा केल्यावर यात्रेकरूला खाली उतरून कटरा गावातील भुवनेश्वरीची पूजा करावी लागते. ती केल्यानंतरच यात्रा सुफल होते, असे मानतात. आणखी एका दंतकथेनुसार आदिशक्तीने आपल्या त्रिशुळाच्या प्रहाराने ही गुंफा तयार केली. या गुहेत महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मीच्या मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीच्या पायापासून पाणी वाहत असते. त्यास बाणगंगा म्हणतात. वैष्णोदेवीबरोबरच या तीन देवतांनाही या ठिकाणी महत्त्व आहे. बासरदेवी (तेलंगणा) नांदेड-निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर बासर हे रेल्वे स्टेशन आहे. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्य़ात हे गाव होते. पुढे ते आंध्र प्रांतात गेले. सध्या ते तेलंगणा राज्यात आहे. या परिसराचे प्राचीनत्व महाभारतपूर्व काळापर्यंत मानले जाते. महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ‘महाभारता’सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले, असे मानतात. व्यासांचे येथे वास्तव्य झाले, त्यावरून गावाचे नाव वासर पडले, त्याचेच पुढे बासर झाले असे सांगितले जाते. नांदेडजवळ असणाऱ्या या मंदिरात महाराष्ट्रातील अनेक भाविक दरवर्षी जातात. तर काही मतांनुसार मुळात या भागात असणाऱ्या मराठी भाषेच्या प्रभावामुळेच या गावाचे नामकरण वासरवरून बासर असे झाले आहे. व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात, अनुष्ठाने करतात. महासरस्वतीचे मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अध्र्या भागात देवघर, गाभारा तर अध्र्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पादुका देवीपासून थोडय़ा अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचे शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठय़ा श्रद्धेने ते प्राशन करतात. मंदिरासमोरच्या टेकडीवर जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे. याच मंदिराशी निगडित एका कथेनुसार कुरुक्षेत्रावरील युद्ध संपल्यानंतर व्यासमुनी, त्यांचे काही अनुयायी निवांतपणे काही दिवस घालवावे म्हणून दंडकारण्यात गेले. तिथे व्यासमुनींनी देवपूजा आणि सरस्वती देवीची आराधना केली. नंतर नंदागिरीचा राजा बिजिअलुदु याने हे सरस्वती मंदिर बांधले. ‘दुग्रे दुर्गट भारी’ या आरतीचा कर्ता नरहरी मालू, श्री शंकराचार्य आणि अनेक योगीजनांनी इथे अनुष्ठान केले होते. तसेच वाल्मीकी ऋषींनी येथेच ‘रामायण’ लिहायला सुरुवात केली, अशीही आख्यायिका आहे. इथे थोडय़ा दूर अंतरावर दत्त मंदिर आहे. असे सांगतात की, ही दोन्ही मंदिरे भुयाराने जोडली गेली होती. राजे-महाराजे या भुयारी मार्गाने येऊन देवांची पूजा करत असत. येथे व्यास महर्षीचे मंदिर आहे, तसेच वाल्मीकींची संगमरवरी समाधीही आहे. सरस्वती मंदिरात एक दगडी स्तंभ असून त्यावर हाताने प्रहार केला तर संगीताचे सप्तसूर ऐकू येतात. त्याला म्युझिक पिलर असे म्हटले जाते. नवरात्रात हा परिसर भाविकांनी फुललेला असतो. देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण निनादत असते. दसऱ्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून मिरवणूक निघते. रस्ते झाडून, सडा िशपडून गावात सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या असतात. तर अनेक जणी आपापल्या दारासमोर पंचारती घेऊन उभ्या असतात. औक्षण अन् फुले उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्याची प्रथा आहे. या सरस्वती मंदिरात अनेक पालक मुलांना शिक्षण सुरू करण्यापूर्वी घेऊन येतात, त्याला अक्षराभिषेक असे म्हणतात. येथे प्रसादात मुलांना हळद खायला दिली जाते आणि पाटीवर अक्षरे लिहिण्याची संथा दिली जाते. दसरा, वसंत पंचमी, राखी पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमा हे दिवस त्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळेच असेल कदाचित, पण मंदिराजवळ हार-प्रसादाऐवजी स्टेशनरीची दुकाने अधिक आहेत. ज्वालादेवी (हिमाचल प्रदेश) हिमाचल प्रदेशातील कांगडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध माँ ज्वालामुखी मंदिर आहे. ज्वालादेवी मंदिर पांडवांनी शोधून काढले अशी कथा प्रचलित आहे. या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डय़ाच्या आतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणी डाव्या आणि मधल्या खडकांतून अशाच तऱ्हेच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसरातील या ज्वाळा माँ महाकाली, अन्नपूर्णा, चंडी, िहगलाज, िवध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजीदेवीचे प्रतीक मानल्या जातात. हिमाचल प्रदेशातील नादौन गावातील ध्यानू भगत नावाचा भक्त ज्वालादेवीच्या दर्शनाला चालला होता. त्या वेळी मुघल बादशहा अकबरचा अंमल त्या भागावर होता. हजारो लोकांसमवेत जात असलेल्या ध्यानू भगतचा अकबराच्या सनिकांना ्नराग आला. त्याला अटक करून अकबरासमोर आणण्यात आले. अकबराने त्याला इतक्या लोकांना घेऊन कुठे चाललास, असे विचारले. त्याने सांगितले की, माता ज्वालादेवीच्या दर्शनाला जात आहे. अकबराने विचारले की, कोण आहे ही ज्वालादेवी? ध्यानूने सांगितले ज्वालामाई सर्व जगाचे पालन करते. देवळातील ज्योती तेल, बत्तीशिवाय सदैव जळत असते. अकबराला आश्चर्य वाटले. ती ज्योत बघण्यासाठी तो स्वत: देवळात गेला. त्याचा विश्वास बसेना. त्याने आपल्या सनिकांना मंदिराचा परिसर पाण्याने भरण्याची आज्ञा दिली. आश्चर्य म्हणजे ज्वालांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. प्रायश्चित्त म्हणून अकबराने ५० किलो सोन्याचा मुकुट देवीस अर्पण केला. परंतु प्रत्येक वेळी तो मुकुट खाली पडत असे. देवीने तो सोन्याचा मुकुट स्वीकारला नाही, असे आख्यायिका सांगते. राजा प्रजापती दक्ष यांच्याकडून यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वाना आमंत्रित करण्यात आले होते. वडिलांच्या वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वत:ला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दु:ख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तिपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका आहे. मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. सर्वात वर शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. इथले गोरख डिब्बी कुंड हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. या कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. गोरखनाथांच्या तपश्चय्रेने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एकदा गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले आणि स्वत: भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवीमाता आजही त्यांची वाट पाहते आहे, अशी आख्यायिका आहे. कन्याकुमारी देवी (तमिळनाडू) पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला िहदी महासागर अशा स्थानी वसलेले कन्याकुमारी. इथे समुद्रतटावर सूर्योदय दिसतो तसाच सूर्यास्तही. किनारपट्टीवर असा योग अन्यत्र कुठेही दिसत नाही. किनारा खडकाळ असून मोठमोठे खडक आहेत. तिन्ही समुद्रपाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येतात. त्यामुळे समुद्रावरची रेतीही तीन रंगांत आढळते. या संगमाजवळच कन्याकुमारीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असले तरी भाविकांना प्रवेश उत्तरदारातूनच करावा लागतो. गोपुरातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडी कोरीव खांबांच्या लांबच लांब रांगा दिसतात. हे मंदिर पांडय़ राजाच्या काळात बांधले गेले असे सांगतात. ही त्यांची कुलदेवता. तर पुराणातील कथेनुसार, वाणासुर हा राक्षस उपासना करून बलाढय़ झाला होता. त्याने देवांकडून अनेक वर मिळविले. तो सर्वानाच छळू लागला; तेव्हा सर्व जण विष्णूला शरण गेले. मात्र विष्णूने वाणासुराचा अंत देवीच करू शकेल असे सांगितले. वाणासुराला अमरत्वासाठी अनेक वर प्राप्त असले तरी त्याचे मरण कुमरिकेच्या हाती होते. तेव्हा पार्वतीदेवी कुमारीच्या रूपात इथे अवतरली आणि तिने वाणासुराचा अंत केला. आपल्या नियोजित वराची वाट पाहात ती इथेच उभी राहिली. मात्र तिचा वर आलाच नाही. असेही सांगतात की, वाणासुरानेच तिला मागणी घातली. त्यामुळे चिडून युद्धासाठी आव्हान देत हातातील चक्राने तिने वाणासुराला ठार केले. विविध अलंकारांनी युक्त आणि अतिशय सौष्ठवपूर्ण अशी ही मूर्ती आहे. तिच्या नाकातील हिरा इतका तेजस्वी आहे की, समईच्या प्रकाशातही त्याची आभा मोहून टाकते. पूर्वेतील दारातून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे हा हिरा इतका चकाकतो की मूर्ती दिसणे अशक्य होते; म्हणून हे दार बंद ठेवण्यात येते. मनसादेवी (उत्तराखंड) देवीचे हे मंदिर हरिद्वारजवळील बिल्व पर्वतावर आहे. हे ठिकाण शिवालिक पर्वतरांगांमध्ये आहे. ही हिमालयाची दक्षिणेकडील सर्वात शेवटची रांग आहे. बिल्व पर्वताच्या समोर असलेल्या नील पर्वतावर चंडीदेवीचे मंदिर आहे. असे मानले गेले आहे की, देवी मनसा आणि चंडी ही पार्वतीचीच दोन रूपे आहेत अन् ती नेहमी एकमेकांजवळच राहतात; म्हणून त्यांची स्थाने जवळ जवळ आहेत. त्या दोन्ही ठिकाणी रोपवेने जायची सोय आहे. मनसादेवी शिवाच्या मनातून उत्पन्न झालेली शक्ती आहे. मनसा म्हणजे इच्छा. ती मनोकामना पूर्ण करते. ती वासुकी नागाची बहीण आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर दमलेल्या देवीने इथे विश्रांती घेतली, अशी गोष्ट सांगितली जाते. गाभाऱ्यात एकूण तीन मूर्ती आहेत. सर्वात मोठी असलेली मूर्ती गायत्रीदेवीची आहे. तिच्या चरणांजवळ आपल्या डाव्या हाताला काळी मूर्ती महिषासुराची आहे आणि उजव्या बाजूला केशरी रंगाचा जो तांदळा आहे, ती म्हणजे मनसादेवी. नयनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश) हे मंदिर हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यत आहे. मंदिरात प्रवेश करताच हनुमानाची उंच मूर्ती आहे. या भागात मंगळवार हनुमानाचा वार म्हणून पाळला जातो. डावीकडे माता नयनादेवीचे मंदिर आहे. तिथे कालिमाता, नयनादेवी आणि गणेशाची मूर्ती आहे. मंदिराचा परिसर आटोपशीर आहे. नयनादेवीसोबत भगवान शंकर, नवग्रह आणि शनिदेवाचे मंदिर परिसरात पाहायला मिळते. १८८० च्या भूस्खलनात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, त्यानंतर त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. ननी तळ्याकाठी शक्तिपीठांच्या गोष्टीनुसार देवी सतीचे डोळे पडले होते. त्यामुळे डोळे म्हणजे नयन आणि त्यावरून नयनादेवी असे नामकरण होऊन देवीचे वास्तव्य आणि तलाव यावरून ननिताल नाव तयार होऊन हे मंदिर स्थापन करण्यात आले. इथे अनेक र्वष जुना िपपळ वृक्ष पाहायला मिळतो. इथे दोन्ही नवरात्र (चत्र व अश्विन महिना) मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात. जीणमाता (राजस्थान) जीणमाता मंदिर राजस्थानातील सिकर गावात आहे. जयंती या नावानेही जीणमातेला ओळखले जाते. जीणमाता दुर्गादेवीचा अवतार आहे. सिकर जिल्हा राजस्थानातील घनघोर जंगल म्हणून ओळखला जातो. तीन पहाडांमध्ये जीणमातेचे मंदिर आहे. तिच्या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. त्यानुसार मुघल बादशहा औरंगजेबाला जीणमातेसमोर नतमस्तक व्हावे लागले होते. जीणमातेचे मंदिर तोडण्याचा आदेश औरंगजेबाने आपल्या सनिकांना दिला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. भक्तांनी देवीला साकडे घातले आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भक्तांचा पुकारा ऐकून देवीने एक चमत्कार केला. लाखो मधमाश्यांचा थवा देवळाच्या दिशेने आला आणि त्यांनी मुघल सनिकांचा कडाडून चावा घेतला. त्यात औरंगजेबही होता. त्याच्या वैद्यांनी त्याला मातेची माफी मागण्याचा सल्ला दिला. त्या बदल्यात देवीला अखंड नंदादीपासाठी तेलाची व्यवस्था करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर औरंगजेबाची प्रकृती सुधारली, असे सांगितले जाते. खूप काळ दिल्लीहून दर महिन्याला सव्वा मण तेल औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही येत असे. जीणमातेच्या सुंदर प्रतिमेबरोबर शिविलग आणि नंदी विराजमान आहेत. नवरात्रात जीणमातेच्या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात. मणीबंध शक्तिपीठ, पुष्कर (राजस्थान) राजस्थानातील ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्करपासून काही किलोमीटर अंतरावर मणीबंध नावाचे गाव आहे. या गावातील गायत्री टेकडीवर गायत्रीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार, राजा प्रजापती दक्षाच्या घरात पार्वतीने (सती) जन्म घेतला. तिचे लग्न शिवाशी झाले. राजा दक्षाने एका यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्याने सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण आपल्या जावयाला आणि मुलीला बोलावले नाही. त्यामुळे रागावलेली सती आपल्या पित्याकडे जाब विचारायला गेली. तेव्हा त्याने शिवाची यथेच्छ िनदा केली. या अपमानाने क्रोधित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी मारून प्राणत्याग केला. ही गोष्ट शिवाला कळल्यावर त्याने तिसरे नेत्र उघडले आणि प्रचंड संहार सुरू केला. सतीचे पाíथव उचलून त्याने भारत भ्रमणाला सुरुवात केली. शिवाचे हे रूप पाहून सर्वजण विष्णूला शरण गेले. विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते भारतात ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तिपीठे तयार झाली. वेगवेगळ्या पुराणांत शक्तिपीठांची संख्या वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी मनगट पडले होते, त्या ठिकाणी मणीबंध हे शक्तिपीठ तयार झाले. दुर्गादेवीच्या इथल्या रूपाला गायत्री या नावाने ओळखले जाते. गायत्री मंत्राचा जप करून या शक्तीची उपासना केली जाते. मंदिर साधेच असून गाभाऱ्यात सती, गायत्री आणि कुंडलिनीमाता अशा तीन मूर्ती आहेत. दक्षिणेश्वर काली मंदिर (कोलकाता) दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकात्याच्या दक्षिणेश्वर भागात असलेले एक मोठे मंदिर आहे. हुगळी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या या मंदिरामध्ये काली देवीचे प्रमुख मंदिर तसेच शंकर व इतर देवतांचीही मंदिरे आहेत. इ.स. १८५५ मध्ये बांधलेल्या या मंदिरामध्ये प्रसिद्ध भारतीय योगी रामकृष्ण परमहंस यांनी अनेक काळ पौरोहित्य आणि कालीपूजन केले होते. इथे त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले, असे म्हटले जाते. मंदिराच्या आवारात परमहंस यांच्या स्मृतींचे जतन करण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना राणी रासमणी यांनी केली. लहान वयात पतीचे निधन झालेल्या राणी रासमणी यांनी त्यांच्या यजमानांमागे जमीनदारीची जबाबदारी चांगल्या रीतीने निभावली. िहदू पुराणकथांतील उल्लेखानुसार काली म्हणजे शिवपत्नी, आदिशक्ती, पार्वतीचा एक उग्र अवतार. काली या नावाबाबत तसेच तिने शुंभ-निशुंभ, शंखचूड, दारूकासुर, महिषासुर इत्यादी दैत्यांना मारल्याबाबतच्या विविध कथा पुराणांतून आहेत. काल म्हणजे शंकर, त्याची पत्नी म्हणून काली. जन्मत: तिचा वर्ण काळा होता म्हणून काली. शंकराच्या कंठातील विषातून तिची उत्पत्ती झाली म्हणून काली. पार्वतीने स्वत:च्या शरीरापासून कोश टाकला, तो कोश म्हणजेच काली; तिलाच कौशिकी असेही म्हणतात. अशा तिच्या नावाबाबतच्या कथा आहेत. कालीतंत्रात शवारूढ, चतुर्भुज, नरमुंडमालाधारी, स्मशानवासिनी अशी तिची रूपे वर्णिली गेली आहेत. चामुंडादेवी (कर्नाटक) पुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज म्हैसूर शहर वसलेले आहे, त्याच जागी होती असे म्हटले जाते. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुद्धा दिवसेंदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्यांचा उन्माद चढला. त्याच्या जुलमाने संत्रस्त झालेले प्रजाजन आणि देवही जगन्मातेला शरण गेले. आपले संरक्षण करण्यासाठी त्यांनी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला. त्यानंतर भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. म्हैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असे नाव आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्वाचे स्थान अशा त्रिवेणी संगमामुळे इथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. मंदिराचे आवारात जवळपास २०-२५ फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा उभा आहे. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देवदेवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्ती त्यावर आहेत.