01khadiwaleसर्वसाधारणपणे असा समज असतो की आजारी पडल्यावरच फळे खायची असतात. प्रत्यक्षात मात्र फळांमध्ये इतके विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की निरोगी राहायचे असेल तर फळांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.

पपई
पपई हे खऱ्या अर्थाने भारतीय फळ नव्हे, पण आज सर्वत्र सदासर्वदा मिळणारे, अतिशय रुचकर व पोट भरू शकणारे फळ म्हणून उपयोगात आहे. जेवणानंतर दोन फाका खाल्ल्या की फळ खाल्ल्याचे समाधान मिळतेच. शिवाय या फळांचा पाचक म्हणून प्रमुख गुण आहे. फळांमध्ये पाचक म्हणून पपईचा क्रमांक खूप वर लागतो.
पपईच्या झाडाचे मूळ, पाने, बिया, कच्ची पपई, पपईचा चीक व पिकलेली पपई सर्वच औषधी गुणांचे आहेत. पपईच्या मुळांचा काढा मूतखडय़ावर उपयुक्त आहे. मुळे नेहमी मिळणे शक्य नाही. त्यामुळे वाया गेलेल्या पपईच्या मुळाची जाळून राख करावी. पाण्यात मिसळून नियमित घ्यावी. पपईच्या पानांच्या रसात कृमिघ्न गुण आहेत. त्यामुळे त्याचा रस लहान प्रमाणात घेतल्यास नाडीचा वाढलेला वेग कमी होतो. शरीरातून घाम व लघवी जास्त प्रमाणावर शरीराच्या बाहेर पडतात. स्थूल व्यक्तींनीच याचा प्रयोग करावा. कृश व्यक्तींनी याचा उपयोग करू नये.
पपईचा चीक पचनसंस्थेचे कार्य, विशेषत: आमाशयाचे कार्य सुधारण्याकरिता उपयुक्त आहे. याच्या वापराने आमाशयातील साठलेला कफ विरघळतो. गोल व लांबट जंतांकरिता ताज्या पपईचा चीक काढून त्याची वाळलेली पूड पन्नास ते शंभर मिलिग्रॅम या डोसात लहान बालकांकरिता व मोठय़ांकरिता एक ग्रॅम हा डोस वापरावा.
यकृत, प्लीहा यांची जुनाट सूज कमी होण्यासाठी पपईच्या चिकाचा उपयोग साखरेबरोबर करावा. येथे डोस किमान पाच गॅ्रम पाहिजे. जीर्ण इसब, गजकर्ण, नायटा, अर्बुद, कफप्रधान कठीण गळू या विकारात पपईच्या चिकाचा बाह्येपचार लेप म्हणून उपयोग होतो. ताज्या पपईचा चीक अनेक औषधांत आतडय़ांची सूज कमी करण्याकरिता वापरतात.
कच्ची पपई पोटात दिल्यास बाळंतिणीस दूध सुटते. बाहेरून लेप लावल्यास स्तनाच्या दुधाच्या गाठी कमी होतात. रक्तातील प्लेटलेट काऊंट कमी असल्यास पपईच्या मोठय़ा हिरव्या पानांचा रस प्यावा. पिकलेल्या पपईचे फळ खावे.
पिकलेली पपई गर्भवतीने खाऊ नये. कारण गर्भाशयाचा संकोच करून गर्भपात करण्याचा गुणधर्म पपईत आहे. हा गुण गेली अनेक वर्षे भारत व इतर उष्ण कटिबंधातील खेडोपाडीच्या स्त्रियांना माहीत आहे. याचा उपयोग होण्याकरिता पपई मोठय़ा प्रमाणावर दीर्घकाळ खावी लागते. पपई उष्ण आहे का नाही हा वादग्रस्त विषय आहे. पण पपई पौष्टिक व पाचक अशा दोन्ही गुणांची आहे. पपईमधील चीक किंवा पेप्सीन काढून घेतल्यास पपई पाचक ठरू शकते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

पेरू
हे पौष्टिक फळ आहेच. याला बहुबीज असे नाव आहे. पेरूच्या पानांचा काढा स्त्री-पुरुषांचे अंग बाहेर येणे, योनी किंवा गुदभ्रंश या विकारात फार उपयुक्त आहे. याच्या पानांच्या काढय़ाची पट्टी किंवा या काढय़ात शिजवून सिद्ध केलेल्या तेलाची पट्टी योनी किंवा शौचाच्या जागेवर ठेवली तर बाहेर येणारी इंद्रिये आक्रसतात. शस्त्रकर्म टळते.
पेरू हे गरिबाकरिता टॉनिक आहे. कमी बियांचा व आत लाल रंग असलेला चवदार पेरू केव्हाही चांगला. पेरूमुळे खोकला बळावतो. अलाहाबाद, कानपूर, लखनौ इकडे कितीही पेरू- अमरूद खाल्ले तरी खोकला कफ होत नाही. हा तेथील हवेचा परिणाम आहे.

फणस
‘आम्ही खातो गरे तुम्ही खा आठोळ्या’ पण आठोळ्यांची उपवासाची रस भाजी भन्नाट होते. हे किती लोकांना माहिती आहे? मग फणसाच्या आठोळ्यांचे पीठ शारीरिक श्रम करणाऱ्यांकरिता मोठे टॉनिक आहे. कोकणासारख्या प्रदेशात पूरक अन्न म्हणून प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता आठोळ्यांचे पीठ व फणसपोळीचा वापर जरूर करावा. कापा फणस कडक व कमी गोड; बरका फणस गोड पण पातळ गरे असणारा. फणसाच्या गऱ्याचा सुधारसासारखा उत्तम पाक होतो. मधुमेहींनी फणस टाळावा.

बोर
बोरांच्या विविध जातींतील आंबटगोड बोरेच औषधी गुणाची आहेत. त्यांचे वाळवून केलेले चूर्ण तोंडाला चव आणते. पोटात वायू धरणे, वारंवार जुलाब होणे, संग्रहणी, कॉलरा या विकारात बोर चांगले फळ आहे. पण फार मोठय़ा प्रमाणावर बोरे खाल्ली वर पाणी प्यायलो की उलटे डहाळ होतात. बोरे खाल्ल्यावर कधीही पाणी पिऊ नये. बोरकूट व सोबत जिरेपूड, तोंडात घास फिरत असल्यास उपयोगी पडते. मुंबईत वाळलेली बोरे मिळतात. तसेच सर्वत्र ‘चनिया मणिया’ म्हणून छोटी छोटी आंबट-गोड चवीची बोरेही सिझनमध्ये एकवेळ तरी खावीत. १९६६ ते १९६८ मी अरुणाचल प्रदेशात ‘तेजू’ या पर्वतीय प्रदेशात होतो. तेथे सर्वत्र फक्त वेगवेगळय़ा जातीच्या बोरांचीच लहान-मोठी झुडपे होती. त्याची आठवण इथे येते. फीट येणाऱ्या कृश रुग्णांकरिता हे फळ चांगले टॉनिक आहे. बोरे लिंबू, जांभळे, डाळिंब, कवठ यांच्या रसात किंवा चूर्णाबरोबर घोळलेला ओवा चूर्ण उत्तम पाचक औषध होय.

मोसंब
मोसंब हे फळ वजन वाढविण्याकरिता म्हणून आजारी माणसाला देण्याचा प्रघात आहेच. त्याचा ज्यूस करून देण्याचे फॅड आहे. त्याऐवजी त्याच्या फोडी खाणे केव्हाही चांगले. कोणत्याही ज्यूस किंवा रसात हवेच्या संपर्काने लगेच विकृती होते. मोसंब थंड गुणाचे असून खूप चहा पिणे, विडय़ा, सिगरेट ओढणे किंवा जागरण यामुळे शरीरात उष्णता वाढते त्यावर अक्सर इलाज आहे. अशा पेशंटची मलावरोध, संडासला साफ न होणे ही तक्रार असल्यास एक दिवस दोन्ही जेवणानंतर एक एक मोसंब खाऊन पाहावे. नक्कीच फायदा होतो. नेहमी पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी मात्र मोसंब्याचा रस टाळावा किंवा त्याबरोबर मिरेपूड घ्यावी. मोसंब्याची साल वाळवावी. केसांतील उष्णतेमुळे उत्पन्न झालेल्या फोडांकरिता त्या सालीच्या चूर्णाचे उकळून पाणी आंघोळीच्या वेळेस वापरावे. केसांतील व्रण भरून येतात. जुन्या बाराचे, पावलीची खूण असलेले, वर गोल वर्तुळ असलेले मोसंबेच वापरावे. मधुमेहींनी मोसंब टाळावे.

सफरचंद
रोज एक सफरचंद खा व रोगाला दूर ठेवा. अशी सफरचंद भक्तांची धारणा आहे आणि ती वाजवी आहे. थंड हवामानातील हे फळ तृप्तिकारक आहे. जुलाब थांबावे व शरीराला बल यावे याकरिता वाफारून सफरचंद खावे. रक्तपित्त, क्षय, उर:क्षत, थुंकीतून रक्त पडणे, वजन अकाली घटने, वारंवार जुलाब होणे, शरीराची भगभग, रात्रौ स्वस्थ झोप न लागणे, खूप लाळ सुटणे, फाजील तहान, संग्रहणी, आतडय़ांचे विकार, मुखपाक, आतडय़ांना व्रण असणे, तिखट आहाराने मांसल आवरण नष्ट होणे, मद्यपान व धूम्रपानाने शरीराची हानी होणे या तक्रारींवर सफरचंद हा उत्तम उतारा आहे.
मध, सफरचंद रस व जोडीला वेलची, लवंग, दालचिनी, नागकेशर, सुंठ, केशर असे सुगंधी पदार्थ आपापल्या कुवतीप्रमाणे मिसळून एक उत्तम टॉनिक तयार होते. ज्यांना निश्चयाने वजन वाढवायचे आहे त्यांनी वरील प्रयोग जरूर करावा. सफरचंदाबरोबर प्रकृतीनुरूप सुगंधी द्रव्ये मिसळावीत. म्हणजे सफरचंद कधी बाधत नाही. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत न बाधणारे, वजन वाढवणारे फळ म्हणून सफरचंद प्रसिद्ध आहे. मधुमेहींनी सफरचंद खाण्यास हरकत नाही. मी दिल्लीत असताना रस्त्यावरचे फळ विक्रेते सफरचंदाच्या फोडी कापून त्यावर किंचित लिंबू पिळून, कणभर मीठ, मिरची पेरून तुलनेने अल्प दरात खवय्या ग्राहकांना देताना पाहात असे. हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागातून येणाऱ्या सफरचंदांना अधिक चांगली चव असते व ती आपल्याकडच्या सफरचंदापेक्षा अधिक काळ टिकतात, असा माझा अनुभव आहे.
सफरचंदाच्या जातीतील, कमी गोडवा असणारे नाशपती तुलनेने स्वस्त असते. भरपूर शारीरिक श्रम करण्याकरिता नाशपती सफरचंदाचेच गुण देते. पण ज्यांना बौद्धिक काम खूप आहे, मगजमारी डोकेदुखी आहे त्यांनी सफरचंद खावे.

चिक्कू
चिक्कू सर्व तऱ्हेने कफवर्धक फळ आहे. केळय़ांमधील कफसंबंधी दोष चिक्कू या फळात नाही. त्वच्चाविकार विशेषत: कोड, इसब, गजकर्ण या त्वचाविकारांत केळय़ाऐवजी चिक्कू हे फळ खावे. वजन वाढविणे, तृप्ती, दाह कमी करणे याकरिता चिक्कू उपयुक्त फळ आहे.

सीताफळ
सीताफळ मधुर, गुणाचे असून हृदयाला हितकर आहे. शरीरात कफ वाढवते. शरीरातील स्नायूंना बळकटी आणते. शरीर पुष्ट करते. वजन वाढविण्यास मदत करते. अधिक प्रमाणात खाल्ल्यास पोटात वायू वाढतो. पित्ताचे विकारात सीताफळ फार उपयुक्त आहे. शरीराचा दाह होत असल्यास सीताफळ फार उपयुक्त आहे. शरीराचा दाह होत असल्यास सीताफळ रात्रभर उघडय़ावर ठेवावे. दवामध्ये भिजलेले असे सीताफळ पहाटे खावे. भगभग होणे, धूम्रपान, दारू यामुळे होणाऱ्या दाह विकारात सीताफळ जरूर खावे. शरद ऋतूत उन्हात फिरून पित्ताचा त्रास होणे, फार तहान लागणे, थकवा, डोके गरगरणे या तक्रारींकरिता सीताफळ उपयुक्त आहे. खूप कप खोकला असणाऱ्यांनी सीताफळ टाळावे. अलीकडे सीताफळ रबडी हा अत्यंत रुचकर पदार्थ खूप प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांतून सर्रास विकला जातो. सीताफळाच्या गरापासून उत्तम आइस्क्रीमही बनवले जाते.
सीताफळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात उकळून त्याने केस धुतल्यास लिखा, उवा मरून जातात. हे पाणी डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.
कोंडा, खवडे यांचा ज्यांना नेहमी त्रास आहे, त्यांनी शिकेकाई व सीताफळाच्या बिया एकत्र कुटून त्याच्या पाण्याने केस धुवावे. मूत्राघात विकारात सीताफळाची मुळी उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे. काळपुळी किंवा असह्य़ ठणका देणाऱ्या गळवांवर सीताफळाची पाने ठेचून बांधावीत. पूवाचा निचरा होऊन वेदना थांबतात.

संत्रे
नागपुरी संत्रे सर्वाच्याच आवडीचा विषय. पण एकदम गोड संत्री हल्ली दुर्मीळ झाली आहेत. घाईने फळ अकाली पिकवून व खूप औषधांचा झाडांवर वापर यामुळे संत्रे आंबट राहते. गोड संत्रे म्हणजे उत्तम पाचक व पुन्हा भूक उत्पन्न करणारे मोठे टॉनिक आहे. इन्स्टंट हुशारी येते. संत्र्याच्या रसाबरोबर मिरेपूड अवश्य वापरावी. त्वचेला तेज पाहिजे असेल, रक्त लवकर वाढण्याची गरज असली तर, विशेषत: मेनोपॉज काळात, स्त्रियांच्या चाळिशीच्या काळात संत्रे फार उपयुक्त आहे. ताज्या संत्र्यापासून घरी तयार केलेले ऑरेंज ज्यूस केव्हाही चांगले. प्रवासात संत्र्यापासून बनविलेल्या ऑरेंज टॉफी किंवा ऑरेंज लिमलेट गोळ्या चांगलीच सोबत करतात. संत्र्याच्या वाळलेल्या सालीचा काढा केसातील कोंडा, खाज याकरिता केस धुवायला वापरावा.
ऊस
मानवी जीवनाच्या हजारो वर्षांच्या प्रवासात ज्यांना उत्क्रांती तत्त्वज्ञानाचा पुरावा पाहावयाचा असेल त्यांनी उसाकडे पाहावे. या पृथ्वीवर प्रथम कोणत्या तरी गवताचे स्वरूप असलेल्या वनस्पतीचे आजचे उत्क्रांत स्वरूप आपले सर्व जीवन व्यापून आहे. ऊस आहे म्हणून जीवनात गोडी आहे.
दर क्षणी शरीराला एनर्जी किंवा पेट्रोल लागते. ते पेट्रोल उसामुळे शरीराला मिळते. कावीळ, यकृतवृद्धीचे विकार, उदर, जलोदर, पांथरी वाढणे, वजन अकाली घटणे या विकारांत पथ्यपाणी खूप असते. त्यामुळे अन्न नकोसे वाटते. अशा वेळी उसाचा उपयोग होतो. विशेषत: कावीळ विकारात उसाचे तुकडे करून ते चावून चावून खावेत. बाजारातील माश्या बसलेला ऊस किंवा गुऱ्हाळातील उसाचा रस जुलाब, टाइफाईड, कॉलरा या रोगांना कारण होऊ शकतो. कावीळ किंवा लिव्हर विकारात रोज फक्त सबंध ऊस चावून खाल्ला तर औषधाशिवाय रोग लवकर बरा होतो.
लघवीची आग होणे, लघवीतून रक्त जाणे, तिडीक मारणे या विकारात नियमित ऊस खावा, लघवी साफ होते. पायावरची सूज कमी होते. कमी रक्तदाब, मुंग्या येणे, चक्कर, फेकल्यासारखे पडणे या विकारांत उसाचे एक दांडके चावून खावे. मूतखडा विकारात उसाच्या मुळांचा काढा चहाऐवजी घ्यावा.
उसाचा शिरका- आपल्या देखरेखीखाली उसाचा अर्धा लिटर रस काढून घ्यावा. त्यात चवीपुरते सुंठ व मिरेपूड मिसळावी. पाऊण लिटरच्या बाटलीत हे मिश्रण ठेवून द्यावे. वरचे झाकण एक आटा सैल असावे. आतील गॅस बाहेर निघून जायला वाव हवा. वीस दिवसांनंतर बाटलीत रस गाळून घ्यावा. वर बुरशी आली असली तर ती अलगद काढून टाकावी. पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, गॅस धरणे, अजीर्ण, अपचन, अरुची, अग्निमांद्य, ढेकरा इत्यादी आमाशयाच्या तक्रारींवर हा उसाचा शिरका उत्तम औषध आहे. जेवणानंतर गरजेप्रमाणे १० ते २० मिली एवढय़ाच प्रमाणात घ्यावे.
उसापासून बनणाऱ्या पदार्थात खडीसाखर श्रेष्ठ आहे. चांगली पत्री खडीसाखर ही कफ होऊ देत नाही. त्यामुळेच वृद्ध माणसाच्या न हटणाऱ्या कफ, दमा, खोकला, आवाज बसणे, थकवा याकरिता खडीसाखर व लवंग आलटून पालटून चघळणे हा उत्तम उपाय आहे. गायक, वक्ते, शिक्षक यांच्या स्वरयंत्रावर ताण पडू नये म्हणून त्यांनी खिशात तंबाखू, सिगरेटऐवजी खडीसाखर, लवंग ठेवावी. चांगली खडीसाखर दुधात बनते. सोडा प्रक्रियेत बनलेली खडीसाखर औषधी उपयोगाची नाही.
उसापासून बनणाऱ्या पदार्थात काकवी हा पदार्थ कनिष्ठ समजला जातो, पण ज्यांना शारीरिक श्रम खूप आहेत. थकवा येऊन चालत नाही. काम खूप केले पाहिजे त्यांच्याकरिता काकवी हे ‘स्वस्ताईचे टॉनिक’ आहे. काकवी तुलनेने उष्ण आहे. कफ व पित्त दोन्ही वाढते.
उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात. गूळ बनताना ती द्रव्ये नष्ट होत नाहीत. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वत्र साखरेऐवजी गूळच वापरावा. शरीराला लागणारी, दर क्षणाला आवश्यक असणारी केमिकलविरहित ‘चैतन्याची ऊब’ गुळामुळे मिळते. गुळाने मलावरोध होत नाही. तोंडाला चव येते. शरीर गार पडत नाही. रक्तदाब, चक्कर, गरगरणे यावर गूळ हा उत्तम उपाय होय. उन्हाळ्यात कडक उन्हाच्या परिणामांपासून लांब राहण्याकरिता गूळ खाऊन बाहेर पडण्याचा पूर्वी प्रघात होता.

– वैद्य प. य. खडीवाले वैद्य