भविष्य विशेष
डॉ. धुंडिराज पाठक – response.lokprabha@expressindia.com

केवळ गुणमेलन करून झालेले विवाह यशस्वी ठरतातच असे नाही. कारण एकूण कुंडलीमेलनामधील गुणमेलन हा एक भाग आहे. शिवाय ३६ गुणांपकी ‘न जमलेल्या गुणांची तडजोड कशी करावी’ हे सांगणे हे खऱ्या समाजाभिमुख ज्योतिषाचे कर्तव्य आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

साधारण १९६०-७० च्या दशकात किंवा त्याअगोदर जन्माला आलेली पिढी बऱ्याच प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेली आहे. नंतरच्या पिढय़ांना मात्र कमी माणसांसोबत राहायला मिळाले. विभक्त कुटुंबाच्या संकल्पनेमध्ये दोन अपत्य तर पुढे जाऊन एकच अपत्य अशी संकल्पना आली. या ८० नंतरच्या दशकात जन्माला आलेल्या पिढय़ांचे वेगळे प्रश्न सुरू झाले.

घरात एक किंवा फार तर दोघे जण असल्यामुळे वाट्टेल त्या गोष्टी, वाट्टेल त्या वेळेला आपोआप मिळत गेल्या. ‘आमच्या आयुष्यात आम्हाला या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या निदान आमच्या मुलांना तरी देऊ’ या पालकांच्या दृष्टिकोनामुळे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करावे लागते याची जाण त्यामानाने या नंतरच्या पिढीला कमी राहिली. अर्थातच तडजोडीच्या शक्यता खूपच कमी होत गेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून वैवाहिक जीवनातही जी तडजोड करावी लागते ती तडजोड या नंतरच्या पिढय़ांना कमी प्रमाणात माहिती झाली. यामुळेही अलीकडे घटस्फोटांचे प्रमाण भलतेच वाढलेले आहे.

आपल्या करिअरकडे लक्ष देणाऱ्या या पिढय़ांनी वैवाहिक जीवनाला त्यामानाने दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्राधान्यक्रमावर टाकले. अर्थातच स्वतचे शिक्षण, करियर, पसा, प्रतिष्ठा, प्रॉपर्टी या गोष्टींना महत्त्व दिले. ही गोष्ट चांगली असली तरी कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी किशोरवयीन अवस्थेत जे संस्कार व्हायला हवे असतात ते कुठेतरी कमी पडले, याची जाणीव आमच्यासारख्या अगोदरच्या पिढीला निश्चितच होते. एकदा का चांगले शिक्षण व पदवी हाती पडली, चांगला पगार मिळवू लागली की मुलं मी वाट्टेल ते करू शकतो, मला कोणाची गरज नाही या मानसिकतेकडे वळू लागतात. त्यामुळे दुसऱ्याला कमी लेखणे, त्याच्या मताला किंमत न देणे व दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणे या गोष्टी वाढत जाऊन शेवटी अरेरावी सुरू होते.

कुंडलीवरून व्यक्तीची मानसिकता बघता येते. कोणत्या प्रसंगात ही व्यक्ती कसे निर्णय घेईल किंवा तिची प्रतिक्रिया कशी असेल याचा बऱ्यापकी अंदाज पत्रिकेवरून अभ्यासू ज्योतिषाला घेता येतो. कुंडलीवरून सर्वसाधारण आढावा घ्यायचा झाल्यास प्रत्येक राशीचे गुणधर्म आज-काल आंतरजालावरून किंवा अनेक पुस्तकांवरून आपणास अभ्यासता येतात. लग्न राशी, चंद्र राशी व कुंडलीतील महत्त्वाचे ग्रहयोग यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्यावरून त्याच्याकडे असलेल्या दोषांवर कशी मात करता येईल व गुणांमध्ये वृद्धी कशी करता येईल, तसेच जोडीदाराला समजून घेताना कुठे कमीपणा घ्यावा आणि कुठे स्वतचे मत पुढे न्यावे याचा योग्य सल्ला तज्ज्ञ ज्योतिषाला नक्की देता येतो.

केवळ गुणमेलन करून झालेले विवाह यशस्वी ठरतातच असे नाही. कारण एकूण कुंडलीमेलनामधील गुणमेलन हा एक भाग आहे, तो सर्वस्वी नाही. शिवाय ३६ गुणांपकी ‘न जमलेल्या गुणांची तडजोड कशी करावी’ हे सांगणे हे खऱ्या समाजाभिमुख ज्योतिषाचे कर्तव्य असते. ज्या गोष्टींमध्ये सूर जुळणार आहेत त्या गोष्टी तर ठीकच आहेत, त्यातून त्यांचे चांगले होईलच. पण जेथे न जुळणारे गुण असतात त्यातली तडजोड शिकवणे महत्त्वाचे ठरते.

सर्वसामान्यांना आपली राशी कोणती हे माहीत असते. त्यावरून त्यांना एकूणच आयुष्यात व विशेषत वैवाहिक जीवनात कोणती तडजोड करणे गरजेचे असते याची ढोबळ माहिती पुढे देत आहे.

मेष, सिंह, धनू या अग्नी राशी म्हणून ज्योतिष शास्त्रात मान्यताप्राप्त आहेत. या राशींना सर्वसाधारणपणे दुसऱ्या कोणाचे ऐकून घेणे आणि मान्य करणे सहसा आवडत नाही. त्यांना स्वतचा अधिकार गाजवायला मुळातच नेहमी आवडते. त्यामुळे या राशी गटांनी आपल्यापेक्षा चांगले बुद्धिमान लोक असतात यावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. बाहेरच्या व्यवहारी जगात किंवा करिअरमध्ये असा अधिकार गाजवणे हा गुण ठरतो, पण वैवाहिक व कौटुंबिक जीवनात मात्र तसे होत नसते. घरामध्ये प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीबरोबरच आपली भूमिका बदलते, याची जाण ठेवणे आवश्यक असते. आईसमोर ते मूल असते, भावासमोर बहीण असते, बायकोसमोर नवरा असतो किंवा नातवासमोर आजी-आजोबा म्हणून असतो. त्यामुळे या प्रत्येकाशी संवाद साधताना वेगवेगळ्या भूमिकेत जावे लागते. बाहेर आपण भले मोठय़ा अधिकाराच्या पदावर असला तरी बाहेरचा मानसन्मान, अधिकार, पद ही सगळी झुले घरात येण्यापूर्वी बाहेर ठेवावी लागतात. तरच घराला घरपण येते. अहंकाराचा फटका या राशींना जास्त बसत असतो. त्यामुळे कुठे अहंकार गाजवायचा अन् कुठे थांबायचे हे कळायला हवे. तरच निखळ आनंद घेऊ शकतात.

वृषभ, कन्या आणि मकर या राशींना व्यवहारी राशी म्हणून संबोधले जाते. खाओ, पिओ, मजा करो. प्रत्येक ठिकाणी हिशेब ठेवणे, जेवढय़ास तेवढे राहणे आणि कोणतीही गोष्ट पशात मोजणे हा यांचा स्वभाव असतो. भौतिक सुखाकडे जास्त लक्ष असते. नाचेंगे, गायेंगे, खायेंगे, पियेंगे ऐश करेंगे और क्या? हे यांचे तत्त्वज्ञान असते. पण वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात व्यवहारापेक्षा भावनेला स्थान असते. तिथे कोणत्याही व्यवहार आणून चालत नसतो. अन्य सदस्यांच्या भावना जपणे हे यांच्यासाठी आवश्यक असते, ते शिकावे लागते.

मिथुन, तूळ आणि कुंभ राशी गटांना बौद्धिक राशी संबोधले जाते. कोणत्याही गोष्टीचा नीट विचार केल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत. प्रत्येक निर्णयापूर्वी त्याच्या चांगले-वाईट परिणामांची व्यवस्थित नोंद घेणार. आणि त्यातूनच योग्य असे पावले टाकणार. या बाबी व्यवहारात जास्त उपयोगात येतात, तसेच वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही उपयुक्त ठरतात. सारासार विवेक चांगला असल्याने यांना फारसे प्रश्न येत नाहीत. मात्र कोणत्याही गोष्टीची अतिचिकित्सा केल्यास त्यातून संशयाचे वातावरण निर्माण होते. आणि ‘धड ना समोरच्याला आनंद न आपल्याला आनंद’ अशी स्थिती निर्माण होते. कुठे थांबायचे हे कळले तर या राशींनाही आनंदाच्या अनेक पायऱ्या ओलांडता येतात.

कर्क, वृश्चिक, मीन या जलराशी समजल्या जातात. तसंच या भावनाप्रधान राशीही म्हटल्या जातात. संसार करण्यास, प्रपंच करण्यास या राशींना अतिशय चांगले जमते. मात्र यांच्याकडून भावनांचा अतिरेकही बऱ्याचदा होतो. अति काळजी, अतिप्रेम हे घातकच असते ना. शिवाय सगळीकडे भावनांचे दोर बांधून चालत नसते, हे यांना सांगावे लागते. नातेसंबंधात भावनांची गरज असली तरी व्यवहार मात्र भावनांवर चालत नाहीत. त्यामुळे नको तिथेसुद्धा भावना गुंतवल्यास प्रश्न निर्माण होतात. त्यातल्या त्यात मीन राशीला केवळ दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते. या राशींच्या लोकांना स्वार्थ शिकवावा लागतो.

ढोबळ मानाने प्रत्येक राशींचा गुण-अवगुण वरीलप्रमाणे नोंदवता येतो.

पत्रिकेमध्ये काही ठळक ग्रहयोग असतात. त्यांचा परिणाम हा अनेक बाबतीत होत असतो. शनी-मंगळ युतीत किंवा एकमेकांच्या दृष्टी योगात असतील तर अशा लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. या लोकांनी चुकूनही लॉटरीचे तिकीट घेऊ नये. सट्टा, लॉटरी, जुगार या वाटेला जाऊ नये. आपल्याला अनेक बाबतीत भोगच भोगायचे आहेत ही जाणीव ठेवावी. किंबहुना हे आयुष्य आपल्याला गत जन्मातील पाप कमी करण्यासाठी, संपवण्यासाठी म्हणजेच शुद्धीकरणाच्या प्रक्रियेकरता मिळाले आहे यावर विश्वास ठेवावा. अर्थात या शनी, मंगळाचा परिणाम वैवाहिक जीवनातही होत असतो. सतत असंतुष्टता ही गोष्ट प्रकर्षांने दिसून येत असते. त्यामुळे कोणत्याही मोठय़ा प्रयत्नात कधी थांबायचे हे आधीच ठरवणे हितकारक असते. आपल्या मर्यादा वेळीच ओळखणे बरेच नुकसान थांबवता येते.

रवी, चंद्र, बुध, मंगळ, गुरू व शुक्र यांपकी कोणता एक किंवा अनेक ग्रह राहूबरोबर असतील तर हा त्या दृष्टीने शापित योग समजला जातो. त्या ग्रहाच्या दृष्टीने मिळणाऱ्या फळांमध्ये वैगुण्य येत असते. शुक्र राहू योग असेल तर वैवाहिक जीवनात असमाधान राहणार हे गृहीत धरावे लागते. मंगळ राहू योगात वास्तुदोष स्वीकारावे लागतात. चंद्र राहू योगात मानसिक नराश्य येऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. बुधगुरू योगात एखादा त्वचेचा विकार किंवा मानसिक विकार येऊ शकतो. गुरू राहू योगात सार्वजनिक जीवनात कधी ना कधी मोठा लोकापवाद येतो. मन शांत राहत नाही. तर रवी राहू योगामध्ये सरकारी अधिकाऱ्यांशी कधीही वितुष्ट न घेणे हितकारक ठरते.

कुंडलीवरून वैवाहिक सौख्याचा विचार हा अतिशय विस्तृत व तांत्रिक स्वरूपाचा आहे. त्यातील सर्वसामान्यांसाठी समजेल असे काही मुद्दे वर दिले आहेत. त्यावरून लगेचच आपल्या पत्रिकेत तसे आहे असे समजणे ही टोकाचे ठरू शकते.

आपला मानव जन्मच मुळात तडजोडीचा आहे. आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टींबाबत तडजोड करावीच लागते. शक्य असेल आणि मिळेल त्याच्याकडून मदत घेणे गरजेचे असते. अशा तडजोडीतूनच आयुष्य घडत असते. त्यातही वैवाहिक जीवन हे तर तडजोडच असते. विशेषत मुलगी आपले २०-२५ वर्षांचे आईवडिलांकडचे आयुष्य पूर्णत सोडून नवऱ्याच्या घरी, म्हणजे पूर्णत नवीन लोकांच्या सोबत, नवीन घरात राहायला येते. ही तिच्या दृष्टीने असलेली सगळ्यात मोठी तडजोड असते. ही गोष्ट नवऱ्याने लक्षात घेणे गरजेचे असते. तरीही विवाहसंबंधात दोघांकडूनही योग्य मानसिक आदानप्रदान आणि हितसंबंधांची जाण ठेवून वैवाहिक जीवन व्यतीत करायचे असते.

आपले जीवन हे आपले एकटय़ाचे नसते. तर ते स्वतबरोबरच संपूर्ण कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी सुद्धा असते. ही जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असते.

आजकाल वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या तीव्र प्रश्नांची कारणे अनेक आहेत.

सगळ्यात मोठे कारण म्हणजे संवाद हरपलेला आहे. आजकाल आम्ही पूर्वीच्या मानाने खूप बोलतो आहोत, नाही असे नाही. पण घरातल्यांशी न बोलता आपल्या हातात असलेल्या मोबाइलवरून आपण बाहेरच्यांशी बोलत आहोत. त्यामुळे घरांमध्ये सुसंवाद तर सोडाच, पण साधा संवादही घडत नाही. एकमेकांना समजून घेणे होत नाही. एकमेकांच्या सुखदुखामध्ये आपले योगदान दिले जात नाही. त्यातून दरी निर्माण होते. आपले दुख ऐकून घेणारा आता ‘आपला’ असा कोणीच नाही, हे दुख जास्त सतावत असते. त्यातून अशा ‘आपल्या’ वाटू शकणाऱ्या माणसांचा शोध बाहेर घेतला जातो आणि या नातेसंबंधांचे तीनतेरा वाजायला सुरुवात होते.

त्यागमय जीवन हे आजकाल दुरपास्त होत चालले आहे, हेही वैवाहिक जीवनातील विसंवादासाठी एक कारण आहे. २०-३० वर्षांचा संसार होऊनही आम्हाला पती-पत्नी म्हणजे काय, हेच माहीत नसते. पत्त्युर्न यज्ञ संयोगे स पत्नी। अशी पतीपत्नीची व्याख्या आपल्याकडे आहे. पती-पत्नीमध्ये फक्त एका नकाराचा फरक आहे. हा नकार यज्ञरूपी आहे. यज्ञ म्हणजे त्याग. ‘तुझ्या आवडीसाठी मी माझ्या काही गोष्टी सोडून देणार’ असे दोघांनी एकमेकांना म्हणणे. वैवाहिक जीवन हे सहजीवन असते. ‘दोघांचे मिळून’ असते. एकमेकांप्रती असलेले प्रेम, निष्ठा, आदर हे जास्त महत्त्वाचे ठरतात. एकमेकांचे अस्तित्व स्वतंत्र आहे. तरीही एकमेकांशी पूरक आहे. या गोष्टींचा अभ्यास आजकाल वाढणे गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रातूनही या गोष्टींसाठी काही उपाय करता येतात. शयनगृहात गुलाबी रंगाचा वापर वाढवणे. शयनगृहातील टीव्ही, अभ्यासिका, पेपरवाचन, पुस्तकवाचन इत्यादी गोष्टी वैवाहिक जीवनाला पूरक नसतात त्यामुळे जोडप्यांच्या शयनगृहात आम्ही या गोष्टी टाळायला सांगतो. एकमेकांसाठी वेळ देण्याची ती जागा असते.

घरात सतत सकारात्मक बोलणे आणि एकमेकांविषयी मनामध्येही सद्भाव ठेवणे यातूनही हा विसंवाद कमी होऊ शकतो. घटस्फोटांच्या प्रश्नावर समाजातील सगळ्यांनी मिळून आता फार मोठे काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण मूल होण्यापूर्वीच घटस्फोट झाला तर गोष्ट वेगळी असते. परंतु मूल झाल्यानंतर घटस्फोट झाला तर ते मूल एकाच पालकाच्या घरी वाढत असते. या एकपालकत्वाखाली वाढणाऱ्या मुलांना भावना कशाशी खातात हेही कळेनासे झाले आहे. कोणतीही गोष्ट मिळणे हा ते अधिकार समजत आहेत. त्यातून त्यांची वृत्ती िहसक होत चालली आहे. त्यातही त्यांच्या हातातले खेळ म्हणजे ताशी ४००-५००च्या वेगाने पळणाऱ्या त्या मोबाइलमधल्या गाडय़ा किंवा हातात हजार गोळ्या असलेली स्टेनगन आणि समोर येईल त्याला गोळ्या मारत सुटलेले त्या खेळातले ते ‘शूरवीर’. अशाच गोष्टी व्यवहारात आहेत असा त्यांचा त्या नकळत्या वयात समज होत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना प्रेम, भावना, दुसऱ्याची जाणीव या गोष्टी शिकवाव्या लागत आहेत. हे असेच चालू राहिले तर मला पुढे एक भयंकर दृश्य दिसतेय. समजा तुमच्या सोसायटीमध्ये ५० कुटुंबे आहेत आणि त्यातील निम्म्या कुटुंबांमध्ये असे एकपालकत्वाखाली वाढणारी मुले आहेत. भले तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्याल. प्रेम, आदर शिकवाल. पण ही सगळी मुले जेव्हा खाली मदानात खेळत असतील तेव्हा न जाणो कदाचित कधी रागाच्या भरात हा एकपालकत्वाखाली वाढलेला मुलगा तुमच्या मुलाशी हमरीतुमरीवर येईल हे सांगता येणार नाही.

मुलांवर सगळे संस्कार नीट होण्यासाठी त्यांना आई आणि बापाच्या एकत्र प्रेमाची गरज असते. त्यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे.