मुलांसाठी आई म्हणजे हळवा कोपरा आणि बाबा म्हणजे फादर फिगर.. पण हेच बाबा सतत चिडलेले, ओरडणारे असले तर त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो.

आज अनेक घरांत मुलांची आई त्यांचा अभ्यास घेते, त्यांचं काही हवं नको ते पाहाते; शाळेतल्या पालकसभांना हजर राहाते. मुलांचे छंदवर्ग, शिकवण्या ठरवण्याबाबतची उस्तवारीही ती करते. या मुलांची जडणघडण बिनबोभाट होत गेली, तर त्याचं श्रेय आईला मिळणं अपवादात्मक घरांतून घडतं. पण जर ती मुलं अभ्यासात मागे पडू लागली, किशोरवयात येताच ती थोडं गैरशिस्त, बेपर्वाईनं वागली, तर त्याचा दोष मात्र आईच्या माथी मारला जातो. संगोपनात आईकडूनही काही चुका घडतातच. त्या मी मागील लेखात मांडल्या होत्या. पण मुलांच्या जडणघडणीवर त्यांच्या बाबांचा ठसाही उमटतच असतो. म्हणूनच इतर सर्व जबाबदारी जरी मुलांच्या आईनं कसोशीनं पार पाडली, तरी वडिलांच्या चुकांमुळे किशोरवयात येताच मुलं बिथरू लागतात. बाबा जाणूनबुजून या चुका करत नसतात. या चुका घडताहेत हेच त्यांना जाणवत नाही कारण संगोपनशास्त्राबाबतचं त्याचं अज्ञान. म्हणूनच आपण थोडं संगोपनाचं गणित बाबांच्यामुळे चुकतं ते कसं, त्याकडे आता पाहू या.
निहालचे बाबा एस.एस.सी.ला पहिले आले होते. नंतर आय.आय.टी.तही त्यांना सहज प्रवेश मिळाला होता. तिथंही ते चमकले होते. शिक्षण संपताच त्यांना मनपसंत, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. मनाजोगती पत्नी मिळाली. मग निहालचा जन्म झाला. बाबांच्या इथवरच्या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट मात्र राहून गेली होती. अभ्यास एके अभ्यास करताना त्यांचं व्यक्तिमत्त्व एकांगी बनलं होतं. इतरांच्या भावभावना त्यांना समजत नसल्यानं ते त्यांची दखल घेत नसत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी जमवून घेणं, त्यांनी आखलेल्या धोरणांनुसार काम करणं त्यांना जमेना. ते सतत नोकऱ्या बदलत राहिले. आज त्यांना वाटलं, की हुशार आणि गुणी असूनही त्यांचं नशीबच वाईट आहे. घरी दारी कुणीही त्यांच्याशी जमवून घेत नाही. माणसं ही अशी वाईटच असतात, हे त्यांचं ठाम मत ते सतत व्यक्त करत राहतात. निहालनं मात्र आय.आय.टी.त गेलंच पाहिजे, असं त्यांना वाटतं. तो अभ्यासात हुशार आहे. डॉक्टर व्हावंसं त्याला आता वाटतंय. पण बाबांपाशी तो तसं सांगू गेला, की आजचे डॉक्टर कसे कामचुकार आणि भ्रष्ट असतात, हेच त्याला ते पटवत राहतात. निहालला वाटतंय, की आज भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा सर्वत्रच दिसतो आहे. पण तरीही माणसाची प्रगती होते आहे, जीवनमान सुधारतं आहे. त्याअर्थी प्रत्येक उद्योग व्यवसायात कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि इतरांशी सहकार्य करत स्वत: पुढे जाणारी माणसं असणारच. अशी व्यक्ती बनणं त्याला सर्वाधिक महत्त्वाचं वाटतं. बाबांच्या निराशेला नशिबापेक्षा त्यांचा आत्मकेंद्री, इतरांना कमी लेखण्याचा स्वभाव कारणीभूत असावा, असं त्याला वाटतं. बाबा जेव्हा त्याच्या गणितातील कमी मार्काबद्दल त्याला टाकून बोलतात, तो सामान्य माणसासारखी फालतू करिअर निवडणार, त्याला सामान्य कॉलेजातच प्रवेश मिळवणार असं सतत म्हणून ते त्याला नाउमेद करत राहतात; तेव्हा बाबांविषयी त्याच्या मनात चीड निर्माण होते, त्याला त्यांच्याशी भांडावंसं वाटतं. पण त्यांचा अहंमन्य, अरेरावी करण्याचा स्वभाव ठाऊक असल्यानं तो गप्प राहतो. अशा वेळी त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात- माणसाचं यश म्हणजे नेमकं काय? आय.आय.टी.ला असं काय सोनं लागलंय? आयआयटीयन्स फक्त अभ्यासात हुशार असतील, म्हणून सरसकट चांगली माणसं बनलेले असतात का? अभ्यासात चमकण्यापलीकडे इतर सार्थक नसतंच का? या सर्व प्रश्नांवर विचार करकरून तो पार गोंधळतो. अगदी कावून जातो. मग मात्र एक भीतीदायक प्रश्न त्याला भेडसावू लागतो. त्याच्या मनात येत राहातं, की मी बाबांच्या मते सामान्य बुद्धीचा आहे. आय.आय.टी.ला प्रवेश मिळवणं माझ्या कुवतीपलीकडचं आहे. तो प्रवेश न मिळाल्यानं मी बाबांच्या मनातून कायमचा पार उतरेन की काय? मी त्यांच्या इवल्याशा का होईना पण मिळतंय त्या प्रेमाला कायमचा पारखा झालो तर? या भीतीने कावराबावरा झाल्यावर तो एक तर टीव्ही पाहात बसतो, नाही तर वेळोवेळी झोपून जातो. त्याचे बाबा फार वेळ घरात नसतात. घरी असले, तरी लॅपटॉपवर त्यांचं काम सुरूच असतं. निहालला तर या वयात बाबांनी आपल्याशी थोडा वेळ तरी प्रेमानं गप्पा माराव्या असं वाटतं. तो बाबांच्या निरपेक्ष प्रेमाला आसुसलेला आहे.
रोहनचे बाबाही असेच सतत कामात असतात. त्यांची नोकरी फिरतीची असल्यानं महिन्यातले
१५-२० दिवस ते इथं नसतातच. घरी असतात, तेव्हा ते खूप थकलेले असतात. रोहनला शाळेतील मुलं खूप सतावतात. त्याची सतत हीन पातळीवर मस्करी करतात. ते त्याला लडकी, लडकी म्हणून सतावतात. तो खूप घाबरून गेला आहे. परवा सुटीवर गेला असताना त्याच्या हातून कॅमेरा हरवला. बाबा चिडले. स्वत:ची दमछाक झालेली असल्यानं घरातले महत्त्वाचे प्रश्नही ते उतावळेपणानं हाताळतात. शाळेत हैराण झालेल्या आपल्या किशोरवयीन मुलाचा प्रश्न आज गंभीर बनला आहे, हे बाबांना आईनं वारंवार सांगूनही उमगतच नाही. बाबा स्वत: ‘स्व’स्थ नसल्यानं त्यांचा लॅपटॉप एकदा टॅक्सीत राहिला होता. मोबाइल पावसाच्या पाण्यात पडून एकदा फुकट गेला होता. तरीही बाबा त्यांच्या अस्वस्थपणापायी ही हरवाहरवी घडते, हे वास्तव ध्यानात घेत नाहीत. त्यामुळे त्यांचं स्वत:चं ‘स्व’स्थ असणं हे या घडीचं अग्रक्रमावरचं कर्तव्य त्यांना उमगत नाही. मुलाच्या या वयातल्या अशा पराकोटीच्या अस्वस्थपणाचं गांभीर्यही त्यांना त्यामुळेच समजत नाही. उलट त्यांनी रोहनला बजावलं, ‘‘आता नवा कॅमेरा मिळणार नाही. पैसे काही झाडाला लागत नाहीत.’’ रोहन खूप घाबरला आहे. बाबांच्या दटावणीनं त्याची भीती वाढली आहे. त्याला वाटतं, की तो बाबा म्हणतात तसाच युसलेस् आणि बेजबाबदार आहे. एकेकदा त्याला असंही वाटतं, की शाळेतली मुलं चिडवतात तसा तो पुरुष बनायलाच असमर्थ आहे की काय? अशी भीती मनात दाटून आली, की त्याला वाटतं मरून जावं. थोडा शांत असतो, तेव्हा त्याच्या मनात वेगळेच विचार येतात. त्याला सतत प्रश्न पडत राहतात? खरा पुरुषार्थ कशात आहे? बाबांसारखा अधिकार घरात गाजवण्यात? की पुरुषासारखं उंचनींच, राकट, राबस दिसण्यात? पुरुषानं राकट दिसावं हे खरं असेलही, पण म्हणून त्यानं इतरांचं सुख, दु:ख, भीती याबाबत इतकं अलिप्त असणं स्वाभाविक आणि उचित असतं का? मी बेजबाबदार आहे म्हणताना स्वत:च्या अतिमहत्त्वाच्या वस्तू हरवणारे बाबा स्वत: तितकेच बेजबाबदार नाहीत का? की या हरवाहरवीमागे बेजबाबदार असण्याऐवजी इतरच काही कारणं असतात? विचार करकरून त्याच्या मेंदूचा पार भुगा होतो. मग तो स्वत:चे केस उपटत बसतो.
सोनल लवकरच वयात आलीय. आज ती जेमतेम बारा-तेरा वर्षांची आहे. तिचे बाबा तिचे खूप लाड करतात. ती म्हणेल, मागेल ते सारं पुरवत राहतात. लहान होती तेव्हा तिला आईपेक्षा बाबाच जास्त आवडायचे. पण अलीकडे मात्र तिला आई जास्त आवडू लागली आहे. बाबांचं वागणं अनेकदा तिला बुचकळय़ात टाकतं. बाबा तिला लाडानं म्हणतात, ‘‘सोनू, तूच माझा मुलगा.’’ सोनू एकुलती एक. तिला भाऊ नाही. भाऊ असता, तर तिला आवडलाच असता. पण बाबांनी तिला मुलगा मानण्यानं मात्र तिला प्रश्न पडतो की मुलगी असण्यात कमीपणा आहे का? मुलगे जे, जे करू शकतात ते सारं तर मुलीही करतातच की! मग मी मुलगी असणं बाबांना का पुरेसं वाटू नये? ती आता त्यापुढचाही विचार करते आणि बाबांना समजून घ्यायला जाते. पण त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. बाबा आईवर प्रेम करतात. आई नेटकेपणे संसार करते याचं ते कौतुक करतात. संसार दोघांचा असतो नं? मग बाबा आई ‘माझा’ संसार छान सांभाळते असं का म्हणतात? बाबांची आई डॉक्टर. तिनं आजोबांच्या पश्चात बाबांना वाढवलं, शिकवलं. बाबा ते साऱ्यांना सांगतातही. पण आजीशी प्रत्यक्ष वागताना मात्र सोनलला त्यात कधीही आदर व्यक्त होताना दिसत नाही. सोनलची आईसुद्धा अधिकारीपदावर आहे. ती तिच्या पुरुष सहकाऱ्यांबद्दल नेहमी आदरानं बोलत असते. बाबांशी वागताना तर तिच्या मनातला आदर ओसंडून वाहताना सोनू पाहाते. बाबा मात्र त्यांच्या स्त्री सहकाऱ्यांविषयी, सोनलच्या मावशी, आत्या, काकू यांच्या कर्तृत्वाविषयी कौतुकानं कधी बोलत नाहीत. जमेल तेवढी हेटाळणीच ते करतात. ‘स्त्रियांना कर्तृत्वाचा माज चढलाय आजकाल,’ हेच त्यांचं आवडतं वाक्य. सोनलला बाबांच्या या तिटकाऱ्याचं कारण समजत नाही. स्त्रिया कर्तृत्ववान दिसल्या, तरी त्यात काही तरी कुठे तरी अपूर्णताच असणार असं तिला वाटू लागलंय. मग ती उगीचच पुरुषी थाटात बोलू जाते. पुरुषी पेहराव घालू पाहाते. मुलग्यांसारखी ‘बिनधास्त’ वागू जाते. आणि ते पाहून नाराजी दाखवत तिला दाटतात तेही बाबाच. सोनलचा हल्ली या बाबतीत प्रचंड गोंधळ उडू लागला आहे. मुलगी असणं हे बरं की वाईट? मुलगी म्हणून आपण अपूर्णच असतो असं काहीसं तिला हल्ली वाटू लागलंय.

बाबांनी थोडं स्वत:च्या वर्तनाकडे, प्रतिसादाकडे पहायची हीच वेळ आहे. आपण घरात फार नाही म्हणून आपल्या वागण्याचे पडसाद मुलात उमटतच नाहीत, असं त्यांना वाटतं का? पैसे पुरवणं म्हणजेच संसार करणं का?

अर्जुन आणि मुक्ता ही भावंडं, त्यांचं छान चौकोनी कुटुंब आहे. सगळे एकमेकांशी आदरानं, प्रेमानं वागतात. त्यांच्या घरात मोकळं, पारदर्शक वातावरण आहे. बाबा दोन्ही मुलांचे भरपूर लाड करतात. त्यांची आई पूर्णवेळ गृहिणी आहे. शेजारच्या फ्लॅटमध्ये मुलांचे आजी-आजोबा आणि एक थोडासा अपंग काका असे राहतात. काका स्वत: सारं काही करू शकतो. तो द्विपदवीधर आहे, पण त्याचं उत्पन्न बेताचंच आहे. आजी- आजोबांचा खर्च या मुलांच्या बाबांना करावा लागतो. त्यांचं दुखलं खुपलं या मुलांची आई आनंदानं सांभाळते. बाबांना ऑफिसात खूप काम पडतं. जगभर आलेल्या मंदीमुळे त्यांच्या व्यवसायातही त्याचं सावट जाणवतंच आहे. पण हे कायमचं नाही, असंही बाबा सांगत असतात. बाबांचा स्वभाव अवास्तव काळज्यांचं ओझं वाहणारा. त्यामुळे ते सदैव ताणाखाली आणि चिडचिडे. ते त्यांच्या आईबाबांवर भरपूर खर्च करतात. त्यांना आणि भावालाही ते आर्थिकदृष्टय़ा काहीही कमी पडू देत नाहीत. पण पत्नी, मुलं, आईवडील आणि भाऊ या साऱ्यांसाठी आपण एकटे राबतो, ही सगळी आयतोबा आहेत, असं ते सारखं म्हणत राहतात. आजोबांनी एखादं पुस्तक मागितलं किंवा आईनं घरासाठी पडदे शिवणं आवश्यक झालंय, असं म्हटलं की ते चिडतात. त्यांना ‘आयतोबा’, ‘खायला काळ आणि भुईला भार’ असं म्हणून हिणवतात. ‘मी तो हमाल, भारवाही’ ही ओळ त्यांच्यावर फेकतात.
अर्जुन आणि मुक्ता अनेकदा याबाबत बोलतात. एरवी सर्व बाबतीत हुशार असणारे, मित्रमंडळीत, नातेवाईकांत आवडते असणारे, सर्वासाठी पैसा सढळ हातानं खर्च करणारे, आपले बाबा इतके हुशार असताना, गाठीशी भरपूर सेव्हिंग्ज असताना त्यांना कसली भीती वाटते आहे, हे या मुलांना समजत नाही. जागतिक मंदीपायी अनेकांच्या कंपन्या बुडाल्या आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत, हे बाबाच त्यांना सांगतात. मग मंदीची झळ आपल्याला फारशी लागलेलीच नाही. आपल्या जीवनशैलीवर त्याचा जराही परिणाम झालेला नाही, हे वास्तव बाबांना कसं समजत नाही? नोकरी गेल्यानं अर्जुनच्या मित्राच्या बाबांना डिप्रेशन आलंय. मुक्ताच्या मैत्रिणीच्या बाबांना धंद्यात खोट आल्यामुळे राहता अर्धा फ्लॅट विकावा लागलाय, त्यामानानं आपण सुरक्षित असताना घरात कायम असं बिथरलेलं, अस्वस्थ वातावरण का? आईला विचारलं, की ती म्हणते की ती नोकरी व्यवसाय करत नाही, हेच तिचं चुकलं. तिनं नोकरी केली असती तर मुलांची, आजीआजोबांची उस्तवारी इतकी छान कुणी पार पडली असती हे मुलांना समजत नाही. आजी-आजोबांकडे गप्पा मारताना कधी हा विषय निघाला, की ते म्हणतात, ‘‘बाळांनो. मरण लवकर हवं असं रोज देवाला सांगतोय. हातीपायी धड आहोत, तोवर ने म्हणतोय आम्ही त्याला, पण त्याला ते ऐकूच जात नाही.’’ काका तर हा विषय निघाला, की सरळ दुसऱ्या खोलीत निघून जातो. मुक्ता आणि अर्जुन या साऱ्यांपायी वैतागलेत, घाबरलेत. त्या दोघांना जमेल तेवढं घराबाहेर राह्यलाच आवडू लागलंय. त्यापायी अलीकडे आईही त्यांना रागवायला लागलीय.
या सर्व बाबांनी थोडं स्वत:च्या वर्तनाकडे, प्रतिसादाकडे पाह्यची हीच वेळ आहे. आपण घरात फार नाही म्हणून आपल्या वागण्याचे पडसाद मुलात उमटतच नाहीत, असं त्यांना वाटतं का? पैसे पुरवणं म्हणजेच संसार करणं का? स्वत:च्या अकारण, अवास्तव चिंता करण्याच्या स्वभावापायी स्वत:प्रमाणे घरातील सर्वाचंच स्वास्थ्य आणि आनंद हरपतो आहे, याचं भान त्यांना आहे का? मुक्ता, अर्जुन, त्यांची आई, आजी, आजोबा आणि काका यांच्या इतकेच हे सर्व प्रश्न मलाही पडतात आणि खूप अस्वस्थ करतात.