आपली जन्मतारीख, महिना आणि वर्ष यावरून आपला भाग्यांक काढता येतो. कोणत्या अंकाचे कोणत्या अंकाशी जमू शकते अथवा जमू शकत नाही, याबद्दल अंकशास्त्राकडून मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे त्याच्या साहाय्याने आपण आपल्या वैवाहिक जीवनाचे व्यवस्थापन करू शकतो.
अंकशास्त्रावरून वैवाहिक जीवनाविषयी मार्गदर्शन करताना, प्रथम जन्मतारखेचा संपूर्ण प्रभाव एकमेकांवरती कसा आहे, हे बघून पुढचे मार्गदर्शन करता येते. मुख्य म्हणजे आपल्या जन्मतारखेला जोडीदाराची जन्मतारीख अनुकूल असेल, तर त्याची आणि आपली स्पंदने काही प्रमाणात अनुकूल होतात. ती अनुकूल नसतात तेव्हा न पटणे, वादविवाद, टोकाचे विचार, सतत कटकटी अशा गोष्टी घडतात.
भाग्यांक आणि प्रारब्धांक
अंकशास्त्रात जन्मतारीख, जन्ममहिना, जन्मवर्ष यांना अत्यंत महत्त्व आहे, कारण त्यावरून तुमचा भाग्यांक आणि प्रारब्धांक समजतो. भाग्यांकावर आपले जास्तीत जास्त लक्ष असावे. त्याचा अधिकाधिक उपयोग जीवनात केल्यास खूप फायदा होतो.
भाग्यांक म्हणजे आपल्या जन्मदिनांकाची एक अंकी बेरीज. प्रारब्धांक म्हणजे जन्मतारीख + जन्म महिना + जन्मवर्ष यांची एक अंकी बेरीज.
उदा. २४ मार्च १९७३ रोजी जन्मलेल्या व्यक्तीचा भाग्यांक = ६ (२+४), तर प्रारब्धांक (२४ + ३ + १ + ९ + ७ +३) दोन येतो.
भाग्यांकाची वैशिष्टय़े
१ : हुशार, उत्साही, स्वाभिमानी
२ : चंचल, अस्थिर, भावनाप्रधान, प्रेमळ , लाजरा
३ : महत्त्वाकांक्षी, तत्त्वज्ञानी, हुकूमशाही वृत्ती
४ : उत्साही, टापटीपपणा, हट्टीपणा
५ : धूर्तता, व्यवहारचतुरता, साशंक वृत्ती
६ : प्रेमळ, लहरी, ऐक्याची भावना
७ : सहनशील, अस्वस्थ, चिंतन-मनन करणारा
८ : पद्धतशीरपणा, व्यावहारिक वृत्ती, अधिकार
९ : धाडसी, उतावळेपणा, ताकदवान आणि आक्रमक
विवाहाच्या वेळी ‘सप्तपदी’ म्हणजेच सात पावलांची साथ ही जन्मभराची साथ असते. आपल्यातील कमतरता जोडीदार भरून काढतो. अंकशास्त्रात जेव्हा जोडीदाराची तारीख बघतो, तेव्हा एकमेकांकडे नसलेल्या अंकांची साथ दुसऱ्याकडून मिळत असेल, तर जीवनात एकमेकांच्या साथीने पुढे जातात. त्याच्या उलट जर दोघांच्याही जन्मतारखेत सारखेच अंक
नसतील, तर अत्यंत कष्टाने, महत्प्रयासाने आपण त्या अंकांचे गुणधर्म खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
उदा. नवरा आणि बायकोच्या जन्मतारखेत चार अंक नसेल तर लक फॅक्टर म्हणजे नशिबाची साथ कमी असते. अति कष्ट करावे लागतात. सात अंक नसेल तर काम होण्यापूर्वीच त्याची वाच्यता केल्यास, ते काम पूर्णत्वाला जात नाही. अडथळे येतात किंवा ते सोडूनही द्यावे लागते. म्हणजेच आपल्यातील एखादी उणीव, जोडीदाराने जर भरून काढली, तर आपल्यालाही त्याचा सार्थ अभिमानच वाटतो. खरंय ना, बघा आपणही कधी तरी काही कामासाठी एकटे बाहेर जातो. काम खरे तर साधेच असते, पण काही केल्या होत नाही. जेव्हा जोडीदाराला घेऊन जातो, तेव्हा झटक्यात काम होते आणि आपल्यालाही मग ऐकायला लागतेच, हे काय? मी आल्यावर कसे लगेच झाले? तू केलेच नसशील इ. इ.
नैसर्गिक अंक कुंडली कोष्टक
आपल्या जन्मतारखेचे अंककुंडलीत रूपांतर करून घ्यावे. यावरून आपल्याकडे कोणत्या ग्रहांचा, कोणत्या गुणांचा अभाव आहे, हे समजले तर जाणीवपूर्वक त्या गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केल्यास जातकाचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. वरील कोष्टकाच्या आधारे आपण नैसर्गिक अंक कुंडली मांडू शकतो. अंककुंडलीत जन्मवर्षांचे पहिले दोन अंक घेतले जात नाहीत. जन्मतारखेतील इतर अंक हे वरील कोष्टकात ज्या रकान्यात असतील तेवढे अंक तसेच ठेवावेत. ते सोडून इतर अंक त्या कोष्टकातून काढून टाकावेत. एखादा अंक दोन वेळा येत असेल तर तो अंककुंडलीत दोनवेळा मांडावा.
म्हणजे या कुंडलीत दोघांकडे मिळून सहा या अंकाचा अभाव आहे. जे अंक पतीकडे नाहीत ते पत्नीकडे आहेत.
अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे जसे आम्हाला भेटतात तसेच अनेक जण असेही भेटलेत, की त्यांनी काहीही न बघता लग्नं केलीत, तरी त्यांचे छान चाललेय, तर मग हे कसे काय? असा प्रश्न येतो, अशा वेळी त्यांच्या तारखा त्यांना अनुकूल असलेल्या आढळल्यात आणि महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नींची नावे जर एकाच आद्याक्षराने सुरू होणारी असतील, तर त्यांचेही एकमेकांशी खूप छान जमते, कारण अंकशास्त्रात प्रत्यक्ष आद्याक्षराला एक अंक दिलेला आहे. त्यांची स्पंदने एकमेकांना अनुकूल होत असतील, तर त्यांचे मस्त जमते. माझी एक विद्यार्थिनी मला म्हणाली, की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण पत्रिकेनुसार आम्ही एकमेकांना कुठेच योग्य नाही; पण मग आमचे कसे जमते, हा विचार माझ्याही मनात आला होता. मात्र आद्याक्षरांमुळे ते सहज शक्य होते. पूर्वीच्या काळी मुलीचे नाव मुलाच्या नावावरूनच ठेवले जायचे. सध्या मुलींना त्यांचे नाव बदलायचे नसते. ‘आम्हीच का म्हणून आमचे नाव बदलायचे’ असा आक्षेप घेत असतात. त्यामुळे जे आहे तेच नाव पुढे चालू राहाते. आपल्या आजूबाजूला सहज बघितलेत, तरी एकाच आद्याक्षराने नाव सुरू असलेल्या पती-पत्नींमध्ये एकोपा, प्रेम आढळून येईल. त्यांच्यात मतभेद फार तीव्र स्वरूपाचे नसतात.
नावाचा अपभ्रंश करू नका
जसे आद्याक्षराचे आहे, तसेच आपल्या नावाचेदेखील. ते जर जन्मतारखेला अनुकूल नसेल, तर आपण नुसतेच प्रयत्न करत राहातो आणि यश आपल्यापासून कोसो दूर असते. आपले आणि जोडीदाराचे नाव जर सुयोग्य अंकावर येत नसेल, तर योग्य तो बदल करून घेणे गरजेचे आहे, कारण यशासाठी जेवढी मेहनतीची गरज आहे, तेवढीच नावाचीसुद्धा. वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी जोडीदाराला त्याच्या नावानेच हाक मारावी. लाडाने ठेवलेल्या नावांमुळे, त्याच्या नावातील स्पंदनांचा योग्य तो वापर होत नाही. त्यामुळे आपल्या नावाचा अपभ्रंश न होता ते सर्वाकडून व्यवस्थित कसे उच्चारले जाईल, हे बघणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण आपल्या नावाला ‘वलयांकित करणे’ हे सर्वप्रथम आपल्याच हाती असते.
नावाच्या स्पेलिंगमधला बदल हा जन्मतारखेनुसार फक्त आणि फक्त अंकशास्त्राद्वारेच करता येतो. नावातील बदल अंकतज्ज्ञाकडूनच करून घेणे श्रेष्ठ.
प्रत्येक व्यक्तीला कोणता अंक शुभ असेल, हे त्याच्या संपूर्ण जन्मतारखेवरूनच सांगावे लागते. त्यामुळेच आपली जन्मतारीख ही आपल्याला खूप काही गोष्टी सांगत असते. त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणे मात्र गरजेचे आहे.
विवाहामुळे व्यावहारिक आणि मानसिक स्तरावर अनेक चढउतार प्रत्येकाला अनुभवास येतात. त्यामुळे विवाहाचा विचार करताना शारीरिक सुदृढता, मानसिक आरोग्य, आर्थिक स्तराचाही विचार करणे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी महत्त्वाकांक्षा, कार्यक्षमता काय आहेत हे जाणून घेतल्यास दोघांनाही त्याचा खूप फायदा होतो. पती-पत्नी एकत्र राहत असले तरी एकमेकांच्या स्वभावातील काही पैलूंबाबत ते अनभिज्ञच असतात, हे अनुभवास येते. जेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात, तेव्हा फार आश्चर्यचकित होऊन जातात.
एक जोडपे, त्यांना होणाऱ्या काही त्रासाबद्दल बोलत होते. बाईंची त् २ आणि यजमानांची २१ तारीख होती. इतर काही बोलणे सुरू होण्यापूर्वीच बाईंना म्हटले की, तुम्हाला आर्थिक विवंचना फार जाणवते. गरज नसताना त्याचे टेन्शन फार घेताय. त्या म्हणाल्या, यजमान केलेल्या गुंतवणुकीविषयी, भविष्यकालीन योजनांबद्दल काहीच बोलत नाही. दोन नंबरला प्रेमळ पार्टनर, आर्थिक सुबत्ता, सर्व सुखसोयींनी युक्त जीवन अपेक्षित असते. २१ तारीख असल्यामुळे यजमानांना सांगितले, किमान आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन, कुठे काय गुंतवणूक केलीय एवढेच सांगा. उद्या अचानक काही घडल्यास, आपल्याला काहीच माहीत नाही या अतिरिक्त चिंतेने त्या आजारपणाकडे झुकणार आहेत. तसेच आर्थिक गोष्टींसोबतच त्यांना वेळ आणि प्रेमही द्या. तुम्ही निवृत्त झाल्यावर त्यांना वेळ देऊ म्हणता, पण तोवर त्याही पुन्हा मुलांच्या संसारात गुंतून, नातवंडांची जबाबदारी आली, तर वेळ कसा काढणार हेही लक्षात घ्या. कळत-नकळतपणे आपण बायकोला गृहीत धरून अन्याय करत होतो, हे त्यांच्याही लक्षात आले. नावाच्या स्पेलिंग मधला बदल करून दिला आणि दोन महिन्यांनी फोन करून मानसिक ताण खूपच कमी झाला असून, यजमानांना समजून घेऊन वागतेय असा निरोप त्यांनी दिला.
कोणताही अंक हा कधीच वाईट नसतो. वैवाहिक जोडीदार आपल्या अंकांशी सुयोग्य नाही, म्हणजे तो चांगला नाही, असे नसून त्याची आपली स्पंदने एकमेकांना अनुकूल नसतात. त्याची माहिती घेऊन, त्याला योग्य ती स्पेस देऊन जर तुम्ही वागायला सुरुवात केलीत, तर, काही अंशी तुम्हाला येणारा ताण, मानसिक थकवा हादेखील कमी व्हायला सुरुवात होते. कारण प्रत्येक अंकाची आपली स्वत:ची अशी काही वैशिष्टय़े गुणधर्म, गुणदोष आहेत. त्यानुसारच ते आपले जीवन जगत असतात.
ज्यांचा जन्म जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्यांत झालाय त्यांचे एकमेकांशी चांगले जमते. फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर हा एक गट तर मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर महिन्यांचा अजून एक गट आहे. प्रत्येक गटानुसार एकमेकांशी पटणे – न पटणे ठरतेच. पण कोण – कोणावर अधिकार गाजवतोय हेपण लगेच लक्षात येते. तिसरा गट सर्वावर अधिकार गाजवतो. तर दुसरा गट पहिल्यावर पहिला गट सर्वाचे अधिकाराने वागणे बघतो आणि शांतपणे क्वचित प्रसंगी सहनही करतो. वैवाहिक जोडीदार एकमेकांना सपोर्ट करणारा आहे, का अधिकार गाजवणारा आहे, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणेच वागणे प्रत्येकाच्याच हिताचे असते.
सुनीता साने – response.lokprabha@expressindia.com