मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

१९४५ च्या उन्हाळ्यात माझा मामा ग्वाल्हेरहून इंदोरला आमच्या घरी आला होता. परत जायच्या एक-दोन दिवस आधी तो अगदी सहजपणे म्हणाला, ‘मी माझ्या आवडत्या भाच्याला घेऊन ग्वाल्हेरला जाणार आहे.’ नऊ वर्षांच्या मला ही जरा गमतीत दिलेली धमकीच वाटली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे आई-वडीलही तितक्याच सहजपणे या गोष्टीला तयार झाले. या लेखात ग्वाल्हेरमध्ये घालवलेल्या त्या आनंददायी दहा महिन्यांतल्या काही रोमांचक, काही मौजमजेच्या आणि काही साध्याच आठवणी आहेत.

माझा मामा ‘दत्तूभैय्या’ (भालेराव) या नावाने ओळखला जायचा. ग्वाल्हेरमधल्या त्या दहा महिन्यांत बऱ्याच वेळा मी त्याच्या अवतीभोवतीच असायचो. त्याच्या आईचं घराणं श्रीमंत असलं तरी मामाला वारशात काही गडगंज पैसा मिळाला नव्हता. तो साधा मॅट्रिकदेखील झालेला नव्हता. शिंदे सरकारच्या देवस्थान खात्यात तो एक साधा अकाऊंट क्लार्क म्हणून नोकरी करत होता. पण त्याच्याकडे एक मोठ्ठा गुण होता आणि तो म्हणजे ‘तेहजीब’! ग्वाल्हेरच्या त्या सरंजामी, संस्थानिक वातावरणात या गुणाला खूप मानलं जात होतं. आणि हो, मामाकडे दोन विलक्षण गुण होते. ते म्हणजे गाणं आणि नकला करणं. या दोन गुणांमुळे तो त्याच्या असंख्य मित्रांमध्ये आणि नातेवाईकांत कमालीचा लोकप्रिय होता. तो एखाद्या व्यावसायिक कलाकाराच्या सफाईने हार्मोनियम वाजवायचा. (कुठलीही तालीम न करता दोन वेगवेगळ्या कथेकरी बुवांना पायपेटीची साथ करताना मी त्याला बघितलं आहे. हे मला तेव्हा फारच आश्चर्यकारक वाटलं होतं.) तसाच त्याचा गळाही चांगला होता. तो फिल्मी गाणीही गात असे. के. एल. सैगल त्याचे अतिशय आवडते गायक होते. त्यातही ‘ऐ कातिब-ए-तकदीर मुझे इतना बता दे’ हे त्याचं खूप आवडतं गाणं होतं आणि तो ते नेहमी गुणगुणायचा.

मामाकडून मी दोन फिल्मी गाणी शिकलो होतो. ‘तू कौन सी बदली मैं है मेरे चांद है आ जा’ (नूरजहॉं, फिल्म- ‘खानदान’), आणि ‘कमल है मेरे सामने’ (जयश्री, फिल्म- ‘शकुंतला’) ही ती दोन गाणी. आणि ‘वंदना के स्वरों में प्रभू , एक स्वर मेरा मिला लो/ अर्चना के कानों में प्रभू, एक कान मेरा मिला दो’ ही प्रार्थना मी ग्वाल्हेरमधल्या एका आरएसएसच्या स्वयंसेवकाकडून शिकलो होतो. माझा आवाज फुटेपर्यंत घरगुती समारंभ आणि छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांत मला ही गाणी म्हणायचा आग्रह  इंदोरमध्ये केला जात असे. म्हणजे मी काही फार उत्तम वगैरे गातो असं कधीही कोणी सूचित केलं नव्हतं. मी म्हणजे भविष्यातील मोहम्मद रफी किंवा किशोरकुमार होणार असंही कोणी म्हणत नसे. पण मी नक्की बरं गात असणार.. नाहीतर त्यांनी मला नेहमी गाणं गायचा आग्रह केला नसता.

ग्वाल्हेरमधल्या स्थानिक आरएसएसच्या तरुण पथकाचे एक प्रमुख सेवक बाळ भागवत (भागवतजी) हे माझ्या मामाच्या घरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर राहायचे. एका रविवारी सकाळी ते मामाच्या घरी आले आणि ‘उद्यापासून याला शाखेत घेऊन जाऊ का?’ असं अतिशय नम्रपणे त्यांनी मामाला विचारलं. भागवत कुटुंब आणि त्यातही बाळदादा मामाच्या चांगलाच परिचयाचा होता. म्हणून मामाने या गोष्टीला सहज परवानगी दिली आणि माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ग्वाल्हेरमध्ये दुसऱ्यांदा संबंध आला. (पहिला संबंध इंदोरमधल्या शाखेशी आला होता. तिथे मी रामबाग शाखेत जात होतो.)

ज्या शाखेत मी जायचो, तिथे मराठी बोलणारे बरेच स्वयंसेवक आणि प्रचारक होते. पण एखादा अलिखित नियम असल्यासारखे  एकमेकांशी कुणीच मराठीत बोलत नसे. प्राध्यापक गावंडे म्हणून एक ज्येष्ठ प्रचारक होते. त्यांनी हा नियम मोडत मला विचारलं की, ‘तुला वीररसप्रधान एखादं देशभक्तीपर मराठी गीत येतं का?’ त्याच्या पुढच्या आठवडय़ात गुरूपौर्णिमेनिमित्त काही शाखांचा एकत्र मेळावा होणार होता. जर मला असं एखादं गीत येत असेल तर त्या मेळाव्यात ते सादर करण्याची संधी मला मिळणार होती. मी म्हटलं, ‘हो. मला येतं असं एक गीत.’ आणि मग मी इंदोरमधील शाखेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं ते गीत त्यांना म्हणून दाखवलं. प्रोफेसरसाहेबांना ते खूपच आवडलं आणि या प्रसंगासाठी ते अतिशय योग्य आहे असं ते म्हणाले. त्या दिवशी काहीशे उपस्थितांच्या समोर एका टेबलावर उभं राहून मी ते मराठी वीररसपूर्ण देशभक्तीपर गीत मोठय़ा झोकात सादर केलं. गाणं संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. त्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी अशा..

‘चला रं, उठा रं शेतकरी दादा, कामकरी दादा

सिंहगडावर ताना गेला, पावनखिंडीत बाजी पडला

शिवरायाचा हुकूम पाळायला..

चला रं, उठा रं..’

..सर्कसच्या बाहेर जिवंत हत्ती मी प्रथम कुठे बघितला असेल तर तो ग्वाल्हेरमध्ये! सिंदियांच्या पदरी वीसएक सरदार होते. महाडिक, आंग्रे, शितोळे, फाळके, जाधव, आपटे, माहुरकर हे त्यातले अ वर्गातले सरदार होते. माझी आज्जी (आईकडून) ही सरदार जिनसीवाले यांची नातेवाईक होती. फार जवळचं नसलं तरी फार दूरचंदेखील नातं नव्हतं. जिनसीवाले हे त्यांच्या वीस खास सरदारांपैकी एक होते. मुद्दा काय, तर जिनसीवाले यांच्याकडे एक हत्तीण होती आणि मी ती कधीही, वाटेल तेव्हा पाहू शकत होतो. मी नऊ वर्षांचा होतो आणि या कल्पनेनेच मी रोमांचित झालो होतो. दुलारी नावाच्या या हत्तीणीला ऊस खूप आवडायचा. ती मोठमोठे रोटले खायची आणि जवळच्या, तिच्यासाठी खास तयार केलेल्या हौदातून पाणी प्यायची. हे दृश्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे. कधी कधी ती तिच्या माहुताबरोबर दंगादेखील करायची. त्या दोघांना एकमेकांची भाषा अवगत होती. त्या भाषेत ते दोघं बोलत असत. दुलारी खूप शांत होती असं मी ऐकलंय. ग्वाल्हेरच्या महाराजांच्या शिकार पार्टीत तिचा नेहमी समावेश केला जात असे. एखाद्या प्राण्याला दिलेला एक प्रकारचा हा सन्मानाच होता.

महाराष्ट्रातली भक्ती संस्कृती ग्वाल्हेरमध्ये गेली दोनशे वर्षे जपणाऱ्या निदान तीन प्रमुख संस्था माझ्या ग्वाल्हेरमधील मुक्कामात मला न्याहाळता आल्या. याचं सगळं श्रेय अर्थातच माझी आजी आणि मामा यांनाच आहे. त्या संस्था म्हणजे- १) दाल बाजार इथला समर्थ रामदास संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारा आबामहाराज मठ आणि राम मंदिर. दास नवमी उत्सवात दासबोधाच्या सामूहिक पाठात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. शिवाय आबामहाराजांची निदान डझनभर कीर्तनं तरी मी तिथे ऐकली असतील आणि त्यांनी माझ्यावर खूप खोलवर परिणाम केलेला आहे . २) महाराष्ट्रातली नारदीय कीर्तन परंपरा समर्थपणे जतन करणारा जनकगंज इथला ढोलीबुवांचा मठ. आणि ३) महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची विशेषता असलेल्या दत्त संप्रदायाची परंपरा पुढे चालवणारं लोहिया बाजार इथलं अण्णामहाराजांचं दत्त मंदिर.

आज मी हे लिहितो आहे याला अर्थातच मागे वळून बघताना मिळणारा सिंहावलोकनाचा आनंद हा फायदा आहेच. पुढील हिंदी व मराठी गाणी तुम्ही निश्चितच ऐकली असतील :

‘देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान’ (सी. रामचंद्र, फिल्म ‘नास्तिक’, १९५४), २) ‘ये गो ये, ये मैना’ (अजय-अतुल, फिल्म- ‘जत्रा’, २००६), ३) ‘छोटा सा देखो मेरा नादान बालमा’ ( सी. रामचंद्र, फिल्म-‘शगुफ्ता’, १९५३) आणि ४) ‘देखो जी बहार आयी बागो में खिली कलियां’ ( सी. रामचंद्र, फिल्म- ‘आझाद’, १९५५)

पहिल्या दोन गाण्यांचा मुखडा ‘पायी हळू हळू चाला, मुखाने गजानन बोला’ या भजनाच्या मुखडय़ासारखा आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोलीबुवा मठातील भक्तगणांना हे भजन गाताना मी ऐकलं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या गाण्याचा मुखडा मी ग्वाल्हेरच्या आबामहाराजांच्या कीर्तनात ऐकला आहे. थोडक्यात काय, तर ऋषीचं कूळ आणि हिंदी फिल्मी गाण्याचं मूळ कधी विचारू नये.

मुहर्रमच्या मिरवणुकीत ग्वाल्हेरचे महाराजा अग्रभागी? हो. हे खरं आहे राव. दस्तुरखुद्द जिवाजीराव सिंदिया (ज्योतिरादित्य सिंदिया यांचे आजोबा) मुहर्रमच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असलेले पाहण्याचं भाग्य मला लाभलं. साधारण १९४६ च्या सप्टेंबरमधली ही गोष्ट आहे. दोन गोष्टी आजही मला ठळकपणे आठवतात. जिवाजीमहाराजांचा स्वत:चा ताजिया होता आणि हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्माचे भक्तगण त्या मिरवणुकीत बेभानपणे नाचत होते. (त्यातले काही रेवडय़ा वाटत होते आणि त्या अतिशय चविष्ट होत्या.) दसऱ्याच्या उत्सवातदेखील महाराज तितक्याच उत्साहाने सामील व्हायचे. सर्वधर्मसमभावाची ही विचारसरणी घराण्याचे संस्थापक राणोजी यांच्यापर्यंत मागे जाते. राणोजी यांच्या पत्नी चिमाबाई या महाराष्ट्रातील बीडमधील सुफी संत बाबा मन्सूर हजरत शाह यांच्या दर्शनाला खूपदा जात असत. बाबांच्या उरुसाचा समारोह दरवर्षी सप्टेंबरमध्ये सिंदिया घराण्याच्या प्रमुखाच्या उपस्थितीत आजही साजरा होत असतो.

सिंदिया घराण्याचा हिंदुत्ववादी पक्षांना असलेला पाठिंबा- प्रथम जनसंघ आणि नंतर बीजेपी- ही स्वातंत्र्योत्तर काळातील विसाव्या शतकामधील घटना आहे. याला अपवाद  माधवराव सिंदिया होत. (विजयाराजे सिंदिया : कॉंग्रेस- स्वतंत्र पार्टी- जनसंघ- भाजप / माधवराव सिंदिया : जनसंघ- कॉंग्रेस / वसुंधराराजे सिंदिया : भाजप / ज्योतिरादित्य सिंदिया : कॉंग्रेस- भाजप) शेवटी भाजपमध्ये प्रवेश करून ज्योतिरादित्य सिंदिया यांनी विजयाराजेंच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

जाता जाता तीन गोष्टी : १) या लेखाचा खर्डा वाचून सोपानने मला विचारलं की, ‘तू आरएसएसची साथ का सोडली?’ त्याचं उत्तर असं : ‘मी साधारण तेरा-चौदा वर्षांचा असतानाच संघ सोडला. त्याचं कारण म्हणजे गल्ली क्रिकेटची मला लागलेली ओढ. शिवाय हिंदी सिनेमे आणि हिंदी फिल्म संगीताचंही मला वेड लागलं. पण कुणी सांगावं, संघाच्या विरोधी असलेल्या कॉंग्रेस सेवा दलाप्रमाणे संघातदेखील मुलींना प्रवेश दिला असता आणि जडजंबाळ संस्कृतप्रचूर हिंदीतल्या बौद्धिकांचा आमच्या निरागस मनावरचा अस भडीमार जर थांबवला गेला असता तर माझ्यासारखी मुलं आणखी काही काळ तरी संघात राहिली असती. पण निश्चितपणे आयुष्यभर नक्कीच राहिली नसती.’ २) ग्वाल्हेरमध्येच मी पहिला हिंदी सिनेमा बघितला. सोहराब मोदी यांचा ‘सिकंदर’ हा तो सिनेमा. शहरातल्या कॅपिटॉल थिएटरमध्ये मी तो बघितला. त्यात सोहराब मोदी यांनी पोरसची भूमिका केली होती. पृथ्वीराज कपूर अलेक्झांडर होते आणि वनमाला यांनी रुखसानाची भूमिका केली होती. (एका दशकानंतर वनमालाबाईंनीच प्र. के. अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या सिनेमात श्यामच्या आईची भूमिका केली आणि त्या महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचल्या. या सिनेमाला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णकमळ मिळालं होतं.)शब्दांकन : आनंद थत्ते