|| समीर गायकवाड

गावाच्या मधोमध असणारं सुतार आळीतलं विठ्ठल मंदिर नेमकं कधी, कुणी बांधलंय याची माहिती गावातल्या पिकल्या पानांनाही नव्हती. मंदिर बरंच जुनं असल्याने जीर्ण झालं होतं. कधीकाळी ते भव्य असावं. त्याची बांधणी आता ढासळण्याच्या बेतात आलेली. माळवदावर कुणी पाय जरी ठेवले तरी खाली माती पडू लागली होती. सभामंडपाची शान गेली होती. त्याला आधार देणाऱ्या लाकडी खांबांच्या बारीक ढलप्या उडून त्यांना चिरा पडल्या होत्या. एकेकाळचा त्यावरचा लालभडक रंग पुरता मिटून गेलेला. भिंतींचे दगड बऱ्यापैकी निसटले होते. त्यातून माती, चुना, मुरूम डोकावू लागले होते. पायऱ्यांचे दगड निम्मेअध्रे गायब झालेले, तर बाकीचे ढासळलेले. पायऱ्या म्हणून दोनेक आडमाप दगडांच्या रांगा होत्या. त्यावरून मंदिरात जाणं हे दिव्य असे. पोराटोरांना थोडंफार जमायचं, पण म्हाताऱ्याकोताऱ्यांची अब्दा व्हायची. गाभाऱ्यात विशिष्ट कुबट दर्पाचा घमघमाट असे. साठ वॅटच्या टंगस्टनच्या काचेरी बल्बचा तांबूस पिवळा उजेड थिजल्या अवस्थेत असे. एकत्र असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती बऱ्यापैकी ठिसूळ झालेल्या. त्यांची काया पुरती तेलकट झालेली. अंगावरची वस्त्रे जुनाट झालेली. रोज नित्यनेमाने अर्पिलेल्या हार-फुलांचा, तुलसी मंजिऱ्यांचा वेगळा गंध तिथं जाणवे. त्याचं निर्माल्य झालं की त्यावर माश्या घोंघावत. त्यातले बारीकसारीक किडे सगळ्या गाभाऱ्यात पसरत. गाभाऱ्याच्या भिंतींना दिलेला रंग नेमका कोणता असावा असा प्रश्न पडे. दरसाली दिलेले रंग आपसात मिसळून तपकिरी निळसर होत पावसाळ्यात ओघळू लागत. गाभारा गळू लागला की भिंती फुगून येत. विठू-रखुमाईची मूर्ती ताशीव दगडी कट्टय़ावर असल्याने तिथे पाणी साचत नसे. पण अन्यत्र फरशीवर सतत ओल जाणवे. विझलेल्या उदबत्त्यांच्या काडय़ा, नारळाच्या करवंटय़ांचे तुकडे पायात घुटमळत. सभामंडपात लावलेल्या संतांच्या तसबिरी इतक्या जुन्या होत्या, की आतल्या फोटोंचे रंग फ्रेमच्या काचांशी एकजीव झालेले. सगळे फोटो मातकट होऊन विटून गेलेले. संतांच्या डोक्यावरच्या पगडय़ांवरून कळायचे की कोणती तसबीर कुणाची आहे. कधीकाळी कुणा दानशूराने दिलेले चंदनी झुरमळ्यांचे निस्तेज हार त्या तसबिरींवर लटकून होते. तसबिरीआड पालींचा मुक्त वावर होता. माळवदाला मधोमध झुंबर अडकवण्यासाठी भलंमोठं हुक होतं. त्यात कुणीतरी बांधलेले नवसाचे नारळ तगून होते.. जे जागेवर आक्रसले होते. फरसबंदी जागोजागी उखडली होती. त्याच्या फटीत उगवलेली गवताची चिवट पाती कितीही उपटली तरी पुन्हा पुन्हा उगवत होती. भिंतींवरची वायिरग अनेक ठिकाणी मोकळी होऊन लोंबत होती. गेलेल्या बल्बस्ना लागलेली जळमटं कधी पुरी हटलीच नाहीत. मंदिरात पूजाअर्चना करणाऱ्या रामा गुरवाचा मृत्यू वृद्धत्वाने झाला तेव्हा त्याला मुलबाळ झालेलं नव्हतं. त्याच्याही आधी गावात विविध वदंता होत्या. त्यामुळे मंदिराला कळस नव्हताच. नुसतंच शिखर होतं; ज्याचे टवके उडाले होते. नक्षी बोथट झाली होती. रंग उडून इतिहासजमा झाला होता. तरीही या मंदिरावर, इथल्या विठू-रखुमाईवर गावाची विलक्षण श्रद्धा होती. मंदिर सुतारआळीत असल्यानं सुताराच्या घराचा त्याच्यावर विशेष जीव होता. घरातलं म्हातारं माणूस असो वा रांगतं बाळ असो; रोज मंदिरात गेल्याशिवाय त्यांचा दिवस कलत नसे. याच घराचा कर्ता पुरुष होता- ज्ञानू सुतार.

काळासावळा वर्ण, सडपातळ बांधा, स्वच्छ साधे कपडे, भाळी गोपीचंदन आणि बुक्का, मुखी विठ्ठलनाम असं ज्ञानूचं रूपडं. सत्तरीला पोहोचलेल्या ज्ञानूचं शिक्षण जेमतेम आकडेमोडीचं होतं. तरीही सगळे अभंग त्याला मुखोद्गत होते. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सगळं त्याला अवगत. कीर्तन-प्रवचन असलं की पखवाजावर त्याच्या बोटांची जादू चाले. त्याच्या चढय़ा आवाजात वेगळीच जादू होती. तो गाऊ लागला की पांडुरंगाचेही देहभान हरपून जात असावे. त्याचे बापजादेही कित्येक पिढय़ांपासून याच मंदिरात विठूचरणी भक्तीसेवा अर्पित. ज्ञानू सुताराला त्या मंदिराचं इतकं वेड होतं की त्यापायी संसाराकडे दुर्लक्ष झालेलं. भागवत सप्ताह, नामस्मरण सोहळा, पुण्यतिथी, व्रतवैकल्ये काहीही निमित्त असलं की घरदार टाकून गडी पुढे असे. त्याच्या बायकोनं-सावित्रीनं कसा संसार रेटला, हे त्यालादेखील कधी उमजलं नव्हतं. मुलं कधी मोठी झाली हेही कळलं नाही. त्याचं सगळं चित्त टाळ कुटण्यात, पखवाजात असे. गावात त्याला मोठा मान होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. त्याचा सालस, सच्चा भक्तीभाव म्हणजे गावाची शानच जणू! ज्ञानूच्या घरी भौतिक साधनांची वानवा असूनही सुख नांदत होतं. पण ते नियतीला बघवलं नसावं.

गावाच्या रस्त्यालगत असलेल्या जमिनी हमरस्त्यासाठी संपादित होऊ लागल्या. गावात बक्कळ पसा खेळू लागला. अनेकांना लाखो रुपये मिळाले. त्यातलाच एक उंबरा होता भोला पाटलाचा. ज्ञानूचा मानसन्मान अल्पमती भोलाच्या मनात खुपायचा. त्यानं शक्कल लढवली. त्याने वेशीवरच्या मारुतीरायाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विडा उचलला. सोबत विठू-रखुमाईच्या नव्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही घोषित केली. मंदिराचा कायापालट केला. उंच गोपूर, भव्य कळस, विशाल सभामंडप, नक्षीदार भक्कम, मजबूत खांब, ऐसपस गाभारे, चकचकीत लख्ख फरशा, लक्षवेधी रंगकाम, भपकेबाज लाइट्स, जोरदार स्पीकर, टाळ-पखवाजाचे संच, हार्मोनियम सगळं काही त्यानं दिलं. मंदिराच्या नव्या रूपाची गावाला ओढ लागली. जुन्या मंदिरातली लगबग कमी झाली. रोजच्या पूजाविधीस होणारी गर्दी पूर्णत: घटली. प्रसादाचे चुरमुरे, बत्तासे तसेच शिल्लक पडू लागले. मंदिर ओस पडले.

ही गोष्ट ज्ञानूच्या काळजाला लागली. त्यानं स्वतला मंदिर आणि घरापुरतं सीमित केलं. त्याचं एकाकीपण सुरू झालं. ज्ञानू घराबाहेर पडायचा बंद झाला. पण गावाला त्याचं सोयरसुतक नव्हतं. गावानं आपली इतकीही दखल घेतली नाही याचं वैषम्य त्याच्या मनात दाटलं. या कठीण समयी त्याचं कुटुंब त्याच्या मदतीला धावलं. घरातली सगळी माणसं सारखी मंदिरात दिसू लागली. थकलेली.. श्रमलेली बायको, तिन्ही पोरं, सुना, आठ-दहा नातवंडं-नाती सगळेच त्याच्यासोबत मंदिराच्या नित्यकर्मात सहभागी होऊ लागले. टाळकरी, वीणेकरी, पेटीवादक, पखवाजवादक सगळी घरातलीच मंडळी. पाव्हणेरावळेदेखील त्यांनी वर्ज्य केले. सणवार, मानपान, संसार सगळं सोडून त्या कुटुंबानं ज्ञानूचं मन सावरलं. अवघं घर विठ्ठलमय होऊन गेलं.

इकडं नव्या मंदिरात आजूबाजूच्या पंचक्रोशीतली माणसं येऊ लागली. मोठमोठाले नामांकित कीर्तनकार पायधूळ झाडू लागले. सगळीकडं भोला पाटलाच्या दानशूरतेची चर्चा होऊ लागली. गावाला जणू विठ्ठलाची नशा चढली. पण त्यात तो जुना अस्सल भक्तीभाव नव्हता.

भोला पाटलानं आणखी डाव टाकत स्वखर्चानं आषाढीसाठी गावातली दिंडी नेणार असल्याचं सांगितलं. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिंडीची जय्यत तयारी सुरू केली. सगळीकडे दिंडीची नुसती धांदल उडाली. मावळत्या सूर्यास जग वंदन करत नसतं, या न्यायानं ज्ञानूकडे कुणी फिरकलंच नाही. गावातून दिंडी जाऊ लागल्याचा ज्ञानूला मात्र खूप आनंद झाला. परंतु आपल्या कुंकवाच्या धन्याला.. बापाला.. आज्ज्याला गावानं साधं विचारलंदेखील नाही याची टोचणी त्याच्या कुटुंबीयांना लागूनही कुणीच कुणापाशी बोललं नाही. द्वितीयेच्या दिवशी गावातून वाजतगाजत दिंडी निघाली. त्या दिवशी ज्ञानूच्या एका डोळ्यात सुख होतं, तर एका डोळ्यात दुख!

त्या दिवसापासून त्याचं कशातच लक्ष लागेनासं झालं. त्यानं घरी झोपणं बंद केलं. मंदिरातच पथारी अंथरली. त्याचं खाणंपिणं घटलं. दशमीच्या दिवशी तो पुरता कासावीस झाला होता. खरं तर त्यालाही पंढरीला जायला आवडलं असतं, पण रामा गुरवाच्या मागं गावातल्या विठूरायाची जबाबदारी त्याच्या अंगावर होती. खेरीज त्याला कुणी आवतनही दिलं नव्हतं. गावातली सांप्रदायिक मंडळी आता पंढरीच्या वेशीवर पोहोचली असतील.. आपण मात्र इथेच आहोत, या विचारानं त्याला पोखरलं. त्या रात्री मंदिराची साफसफाई करून पहाटेच तयारीस लागायचं म्हणून तो मंदिरातच झोपला. तिकडं पंढरीत आलेल्या गावकऱ्यांपैकी अनेकांना वारीत ज्ञानू दिसल्याचा भास झाला. काहींना वाटलं की, ज्ञानू खरंच वारीला आला असावा. दरम्यान, इकडे गाभाऱ्यात झोपलेला ज्ञानू उठलाच नाही. पहाटे त्याच्या मुलांनी बराच वेळ दार ठोठावलं. अखेर दरवाजा फोडून त्याला बाहेर काढावं लागलं. एकादशीच्या पहाटेस ज्ञानू सुतार विठ्ठलाच्या खऱ्या वारीला गेला. ‘ज्ञानूच्या घराला सुतक लागलं..’ असं गाव म्हणू लागलं. बापाच्या मयतीचा निरोप मिळताच शेजारच्याच गावी राहणारी त्याची कन्या सत्यभामा साश्रूनयनांनी धावतपळत तांबडं फुटायच्या आधी गावात आली. आजोबाकडे जाण्याऐवजी तिच्या मुलानं आधी विठ्ठल-रखुमाईची मनोभावे पूजा केली. त्या मायलेकांच्या अश्रूंच्या अभिषेकात न्हाऊन निघालेला तो सावळा श्रीरंग त्या दिवशी नक्कीच मूक रुदन करत असावा. कारण त्यांच्या अश्रूंच्या संततधारेनं त्याला नेसवलेलं भरजरी पितांबर भिजून गेलं होतं.

sameerbapu@gmail.com