वैशाली चिटणीस

कॉर्पेारेट क्षेत्रात काम करणारा एक डोंगरवेडा, भटकभवानाही म्हणा हवं तर, एक दिवस उठतो आणि पाठीवर सॅक, डोक्यावर टोपी आणि हातात एक सोटा अशा अवतारात चालायला सुरुवात करतो. उत्तर महाराष्ट्राच्या टोकापासून म्हणजे सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरातून सुरुवात करून घाटमाथ्यावरून चालत चालत सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जात त्याला पोहोचायचं असतं ते दक्षिण महाराष्ट्राच्या टोकापर्यंत- गोव्यापर्यंत. रोज २०-२५ किलोमीटर कापत ही चाल होते तब्बल ७५ दिवसांची आणि एक हजार किलोमीटर्सची. त्यासाठी त्याला कुठला एलटीए मिळणार नसतो, कुठलं सर्टिफिकेट मिळणार नसतं, की कुठलं प्रमोशन. पण आपल्या सगिरीच्या रांगांमधला निसर्ग, जगणं बघत विनाउद्देश भटकायचं आणि अनुभवांचा बँक बॅलन्स तुडुंब भरायचा एवढाच त्याचा उद्देश.

Amravati, Murder husband ,
अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या; पत्नीनेच रचला कट
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?

या निखळ उद्देशाने प्रसाद निक्ते यांनी केलेल्या विलक्षण भटकंतीचं शब्दरूप म्हणजे ‘वॉकिंग ऑन द एज’ हे समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक. अर्थात एक दिवस उठलं आणि चालायला सुरुवात केली, असं या भटकंतीचं स्वरूप अजिबात नाही. महाराष्ट्रातले गडकिल्ले, डोंगररांगा, खडान् खडा माहीत असणाऱ्या जाणकार मित्रमंडळींच्या सहकार्याने अगदी प्रत्येक दिवसाचं अत्यंत सूक्ष्म नियोजन करून प्रसाद निक्ते यांनी ही सह्यद्रीच्या घाटमाथ्यावरून भटकायची मोहीम आखली आणि ७५ दिवसांत पूर्ण केली. वरवर बघता अनवट भटकंतीचा मोह पडणाऱ्या कुणालाही हेवा वाटेल अशी ही मोहीम. पण त्यातले पूर्वतयारीचे आणि नंतर प्रत्यक्ष चालण्याच्या दिवसांमधले एकेक तपशील कळत जातात, तेव्हा ही सगळीच चढाई राकट आणि कणखर अशा सह्याद्रीइतकीच अवघड कशी होती, ते समजत जातं आणि तिची आणखी भुरळ पडत जाते.

हेही वाचा >>> दखल: लढाऊ वृत्तीची कहाणी

लेखकाची या ७५ दिवसांमधली वाटचाल कशी झाली, याची अधिक स्पष्टता पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या नकाशांमुळे येते. तर पुस्तकात असलेल्या विविध छायाचित्रांमुळे दऱ्याखोऱ्यातल्या महाराष्ट्राची वेगवेगळी रूपं उलगडत जातात. ही छायाचित्रं कृष्णधवल असली तरी त्यांची परिणामकारकता जराही कमी होत नाही, कारण त्यातून दिसणारा महाराष्ट्र एरवी सहसा न दिसणारा आहे. नेमकं हेच या पुस्तकातील आशयाचंही बलस्थान आहे. एका वाक्यात नेमकेपणाने सांगायचे तर हा महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर घेतलेला आडवा छेद आहे. लोकजीवनातले एरवी कुठल्याही निरीक्षणात वा अभ्यासात न दिसणारे सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, मानवी असे धागे या लिखाणातून उलगडत जातात. एकीकडे पुढच्या क्षणी काय घडणार आहे, आपण कुठे असणार आहोत, कोण भेटणार आहे हे माहीत नाही ही अनिश्चितता आणि सतत आश्वस्त करणारे सातपुडा आणि सह्याद्रीचे कडे दुसरीकडे. या सगळय़ा प्रवासात धोके होते, तितकाच थरारही होता. कधीकधी कंटाळायला लावणारी, थकवणारी वाट तर कधी लागलेला एक प्रकारचा चकवा वाचकालाही तेवढाच भुलवतो. कोणत्याही घराच्या दारात जाऊन रात्रीपुरता आसरा मागितल्यावर एखाददुसरा अपवाद वगळता घासातला घास काढून देणारी, जमेल तेवढा पाहुणचार करणारी, काळजीपोटी लेखकाला पुढच्या वाटेला लावून द्यायला येणारी साधीसुधी माणसं या पुस्तकात पावलोपावली भेटतात. आपला परिसर बघण्यासाठी असा पायी फिरत निघालेला शहरी माणूस हे समीकरण त्यातल्या अनेकांच्या पचनी पडलं नाही, पण तरीही माणूस म्हणून त्यांचा जिव्हाळा कुठेही कमी पडला नाही.

लेखकाला भेटलेली वेगवेगळी माणसं हा या लेखनातला एक भाग, पण सगळय़ा या वाटचालीबद्दल सांगताना येणारे विविध प्रकारचे तपशील वर्तमान ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र मांडणारे आहेत. कधी हे चित्र लोभस आहे, तर कधी चटका लावणारं. पण ते निराश कधीच करत नाही. आपल्याला जिथं खूप हॅपनिंग आहे असं वाटत असतं, त्या शहरांच्या पलीकडे कुठेतरी संथपणे वहात असलेला जीवनप्रवाह अजून सगळंच विकाऊ नाही, याचा एक प्रकारचा सुकून देत राहतो. आपल्याकडे जे नाही ते दुसरीकडे कुठेतरी आहे याची जाणीव देत राहतो. लेखकाला त्याच्या भटकंतीत वाटेत लागणारी जंगलं, डोंगरदऱ्या, नद्या, पाणवठे, वेगवेगळी गावं, तिथल्या घरांची रचना, ठिकठिकाणी केली जाणारी शेती, वेगवेगळय़ा घरी लेखकाला दिलं जाणारं जेवण- त्यावरून दिसणारा ग्रामीण महाराष्ट्राचा आहार, लोकांचा रोजगार, तरुण, त्यांचं शिक्षण, पेहराव, त्यांचं रोजचं रुटीन अशा अनेकानेक गोष्टींचं दस्तावेजीकरण हे पुस्तक करतं. हे सगळं अर्थातच वाचायला मिळतं ते एका गिर्यारोहकाच्या नजरेतून. 

हेही वाचा >>> आदरणीय श्रीपु..

वाढत्या शहरीकरणामुळे माणूस निसर्गापासून दुरावत गेला असला तरी त्याची निसर्गाबद्दलची आदिम ओढ बाहेर येते, त्याच्या मनात दडून असलेला जिप्सी थोडक्या काळासाठी का होईना अनिश्चिततेची वाट चालायला लागतो, तेव्हा त्याला गवसतं ते किती अनमोल असतं, हे समजून घेण्यासाठी ‘वॉकिंग ऑन द एज’ वाचायला हवं. 

‘वॉकिंग ऑन द एज’, – प्रसाद निक्ते, समकालीन प्रकाशन, पाने- २९६, किंमत- ५०० रुपये

vaishali.chitnis@expressindia.com