लोकमान्य टिळकांची मंडालेतून सुटका झाली, त्याला आज (८ जून) १०० वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्ताने डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘कर्मयोगी लोकमान्य- चिकित्सक आकलन’ या चरित्राचे प्रकाशन पुण्यात होत आहे. त्यासंदर्भातील हा विशेष लेख..
‘गीतारहस्य’ची बीजरूप कल्पना म्हणजे भगवद्गीता हा कर्म टाकायला सांगणारा ग्रंथ नसून निष्काम बुद्धीने म्हणजे फळाची आशा न धरता मरेपर्यंत कर्तव्यकर्म करायला सांगणारा ग्रंथ होय. हे बीज टिळकांच्या मनोभूमीत रुजून बरेच दिवस झाले होते, परंतु मशागत करून त्याचे रोप वाढवणे टिळकांना आपल्या सार्वजनिक कामाच्या धबडग्यात शक्य झाले नव्हते, त्यासाठी हवी असणारी फुरसत टिळकांना तुरुंगवासामुळे प्राप्त झाली. तेव्हा एका अर्थाने ही शिक्षा त्यांच्यासाठी इष्टापत्ती किंवा इंग्रजीत Blessing in disguise ज्याला म्हणतात, तशी ठरली.
टिळक संस्कृत शास्त्र्याच्या घरी जन्माला आल्यामुळे त्यांचा संस्कृत विद्येशी बालवयातच परिचय झाला. बालपणी गीतेचा एक श्लोक पाठ करण्यासाठी त्यांचे वडील त्यांना एक ढबू पैसा देत असत. म्हणजेच गीतेची संथा आणि वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला असे म्हणता येते. गंगाधरपंत अखेरच्या आजारात अंथरुणावर होते, तेव्हा त्यांना गीता वाचून दाखविण्याचे काम किशोरवयीन बाळनेच केला होता.
अर्थात, टिळक हे उपजतच स्वतंत्र प्रज्ञेचे असल्यामुळे गीतेच्या नुसत्या पाठांतराने त्यांचे समाधान होणे शक्यच नव्हते. वैदिक हिंदू धर्माच्या प्रमाण प्रस्थानत्रयीतील एक ग्रंथ असलेल्या गीतेवर अनेक आचार्यानी भाष्ये लिहून तिचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले होते. परंतु ते सर्व आपापल्या मतांच्या पुष्टय़र्थ लावलेले असून त्यातून स्वत: भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला अर्थ समजत नाही अशी धारणा झाल्यामुळे टिळकांनी सर्व भाष्यग्रंथ बाजूला ठेवून आपल्या बुद्धीने स्वतंत्रपणे गीतेचा अर्थ लावायचे ठरले. त्याची परिनिष्पत्ती म्हणजे गीतारहस्य.
गीता हा टिळकांच्या सततच्या मननचिंतनाचा भाग असल्यामुळे त्यांच्या राजकीय विषयांवरील लेखनातून आणि वक्तव्यांतून गीतेचे संदर्भ नेहमी येत असतच. किंबहुना त्यांचे स्वत:चे राजकारणही गीतेच्या तत्त्वज्ञानाला धरून चालायचे असे म्हणण्यात अतिशयोक्ती होऊ नये.
गीतारहस्याचे प्रारंभीचे उपशीर्षक indu Philosophy of Ethics असे होते आणि नंतर ते Hindu Philosophy of Life, Ethics & Religion असे बदलण्यात आले याचा उल्लेख झालेला आहे. या महत्त्वाच्या घटनेकडे कोणी गंभीरपणे पाहिलेले दिसत नाही. आमच्या परंपरेत नीतिशास्त्र होते असे जरी गीतेच्या आधारे टिळकांना दाखवून द्यायचे होते, तरी गीतेची व्याप्ती Ethics  पुरती मर्यादित करण्यातील धोका त्यांच्या लक्षात आला असावा. परंतु हे त्यांनी कोठे स्पष्ट न केल्यामुळे नंतरचे बहुतेक अभ्यासक गीतेला नीतिशास्त्र मानू लागले. इतकेच नव्हे तर स्वत: टिळकांवर ते गीतेच्या नीतिशास्त्राला कांटियन परिणामनिरपेक्ष हेतुवादी बनवत असल्याचा आरोप करण्यात आला. इंदूर येथील ग. वि. कविश्वरांनी हा आरोप केलेला आहे. अशा प्रकारे टिळकोत्तर काळात गीतेची नीतिशास्त्रीय आटणी झाली.
}मानवी जीवनाची वेगवेगळी अंगे एकमेकांशी आणि नीतिशीही संबद्ध आहेत. आपण आपल्या अभ्यासाच्या व प्रसंगी कृतीच्या सोयीसाठी त्यांना एकमेकांपासून वेगळे करत असतो. विशेषत: पश्चिमेत हे अधिक प्रमाणात घडले. (उदा. मॅकिव्हेलीउत्तर राज्यशास्त्र किंवा भांडवलशाही अर्थशास्त्र). भारतीय परंपरेचा आणि टिळकांचा मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समग्रतावादी आणि जैविक आहे. खरेतर पारंपरिक कर्मसंन्यासवाद्यांनीही ज्ञान आणि कर्म वेगळे करून ही दृष्टी सोडली होती. तिची पुन:स्थापना करण्यासाठी गीतारहस्य लिहिले गेले व तोच ‘गीतारहस्या’चा तात्त्विक संदेश आहे, असे म्हणता येते.एखादी मानवी कृती नैतिक आहे की नाही याचा निर्णय नीतिशास्त्र करते. या  निर्णयासाठीचे निकष सांगणे हे त्याचे काम होय. टिळकांचे आद्य विरोधक आगरकर ज्यांचा विचार घेऊन हिंदू धर्माची चिकित्सा करीत होते, त्या बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल या ब्रिटिश तत्त्ववेत्यांनी मांडलेल्या उपयुक्ततावादी नीतिशास्त्रात सुख हीच नैतिकतेची मोजपट्टी मानली आहे. पुष्कळांचे पुष्कळ सुख हा त्याचा उपयुक्ततावाद होय. ‘गीतारहस्या’चा मुख्य रोख या उपयुक्ततावादी नीतिसिद्धांतावर आहे. त्याची अपूर्णता दाखवून त्यांनी एकप्रकारे आगरकरांचा हिशोब चुकता केला आहे. सुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात. कांटच्या कर्तव्यासाठी कर्तव्य किंवा निरुपाधिक आदेशाचा संबंध ते गीतेच्या निष्काम कर्मयोगाशी लावतात.
एक वेळ आधुनिकांचे समाधान करणे सोपे आहे. कारण ते केवळ बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे तर्कसंगत युक्तिवादाच्या बळावर त्यांना एखादा  मुद्दा पटवून सांगता येतो. परंतु पारंपरिक मंडळी शास्त्रप्रामाण्यवादी असल्यामुळे त्यांच्यापुढे नुसत्या युक्तिवादाची वा बुद्धिविलासाची मातबरी चालत नाही. पारंपरिकांनी ‘गीता’ हे मुख्यत्वे मोक्षशास्त्र असल्याचे ठरवून टाकले होते. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता ही वैदिक धर्माची प्रस्थानत्रयी असून, या सर्व प्रस्थानांमधून एकच एका विषयाचे व एकच एका सिद्धांताचे प्रतिपादन केले आहे असे त्यांचे ठाम मत बनले होते. आद्य शंकराचार्यानी उपनिषदे अथवा वेदांतामधील ‘ज्ञानदेव तु कैवल्यं’ म्हणजे (आत्म)ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते, हा सिद्धांत प्रधान मानून कर्माला गौण लेखले. ज्ञानाने मोक्ष मिळतो हे सांगताना सर्वकर्मसंन्यासपूर्वक असेच ते ज्ञान असायला हवे या आचार्याच्या आग्रहामुळे कर्माकडे पाहण्याची दृष्टीच तुच्छतेची वा उदासीनतेची बनली. ज्याला ज्ञानाचा अधिकार नाही किंवा जो ज्ञानास पात्र नाही, त्याने ही पात्रता अंगी येण्यासाठी आवश्यक असलेल्या चित्तशुद्धीसाठी शास्त्रोक्त कर्म करावे. अशी पात्रता येऊन ज्ञान झाले म्हणजे कर्म करण्याची गरज नाही. या निवृत्तीधर्माचे किंवा ज्ञानमार्गाचे म्हणजे कर्मसंन्यासाचे महत्त्व त्यांनी प्रतिपादले. टिळक उपनिषदांमध्ये या प्रकारचा सिद्धांत असल्याचे नाकारत नाही. मोक्ष ज्ञानानेच मिळतो हेही त्यांना मान्यच आहे. परंतु गीतेलाही हाच सिद्धांत सांगायचा आहे हे त्यांना मान्य नाही. वैदिक धर्म प्रवृत्ती आणि निवृत्ती असा दोन प्रकारचा असून, उपनिषदांमध्ये निवृत्तीधर्माचे व गीतेत प्रवृत्तीधर्माचे विवेचन असल्याचे त्यांनी ठाम प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर आचार्य वैदिक धर्माचे द्विप्रकारत्व नष्ट करून त्याला एकशाखीय अतएव एकांगी बनवत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. गीतोक्त प्रवृत्तीधर्मानुसार (किंवा महाभारतोक्त भागवतधर्मानुसार) निष्काम बुद्धीने कर्तृत्वाचा अहंकार व फलाची आशा सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले, तर त्याचे बंधकत्व नष्ट होते आणि असे कर्म ज्ञानप्राप्तीनंतरही लोकसंग्रहासाठी करण्यातच मनुष्य जीवनाची इतिकर्तव्यता आहे. अशा प्रकारे कर्म केले तर मोक्ष ठरलेला आहेच, पण शिवाय सामान्य लोकांसाठी ते कर्म कित्ता म्हणून अनुकरणीय ठरते. हाच गीतोक्त निष्काम कर्मयोग होय. ‘गीता’ हा केवळ वैयक्तिक मोक्षमार्ग दाखवणारा ग्रंथ नसून तो समाजाच्या धारणेसाठी व भरणपोषणासाठी उपयुक्त ठरणारा ग्रंथ असल्याचे टिळकांनी निदर्शनास आणले.
शंकराचार्याच्या गीतार्थाविरुद्ध जाणारा हा अन्वयार्थ पारंपरिक पंडितांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. आचार्यभक्त विष्णुशास्त्री बापट, वाईचे भाऊशास्त्री लेले, वे.शा.सं. हुपरीकर असे शास्त्री यामुळे अस्वस्थ झाले. बापटशास्त्रींनी दोघांच्या अन्यार्थाची तुलना करत आचार्याचाच अर्थ कसा योग्य आहे हे दाखवणारे भले थोरले स्वतंत्र भाष्यच लिहिले. कोल्हटकरांसारख्या काहींची मजल तर टिळक म्हणजे वैदिक धर्म बुडविण्यास आलेले असुरावतारच होत, असे म्हणण्यापर्यंत गेली.
सनातनी शास्त्रीपंडितांनी पुण्यात गीतारहस्य खंडनासाठी एक मंडळच स्थापन केले. त्याच्या नियमित बैठका होत असत. टिळकांचे खंडण करण्यासाठी आधुनिक विद्याविभूषितांचे साहाय्य घेण्यासाठी त्यांना काही दिक्कत वाटली नाही. प्रा. चिं. ग. भानू आणि प्रा. गो. चिं. भाटे या आधुनिकांनी टिळकांचा अर्थ कसा चुकला आहे हे दाखवायला सुरुवात केली. प्रा. वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांनी तर ‘गीतारहस्या’त तत्त्वज्ञान असे काहीच नाही, ठोशास ठोसा, जशास तसे असे सांगणारा तो ग्रंथ असल्याचे सांगून दुसरे टोक गाठले. डोकी फोडायला सांगणारा हा ग्रंथ असल्याचे राजवाडे सांगतात. अर्थात राजवाडय़ांचा मुळात ‘गीते’वरच आक्षेप असल्यामुळे त्यांनी टिळकांवर टीका करावी यात विशेष काहीच नव्हते.
दुसऱ्या बाजूला टिळकांचा गीतार्थ मान्य असणारे व त्याला अनुसरून कर्मयोगाचा पुरस्कार करणारे पंडितही निघाले. चि. वि. वैद्य, दिनकरशास्त्री रानडे, ज. स. करंदीकर, रहस्यदीपिकाकार भिडेशास्त्री असे काही पंडित. करंदीकरांनी विष्णुशास्त्री बापटांच्या भाष्याच्या तोडीस तोड ‘गीतार्थमंजरी’ लिहून त्यातून टिळकांच्या भूमिकेचा विस्तार केला. भिडेशास्त्रींनी तर टिळकांच्या पद्धतीने ‘गीते’च्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ‘गीताधर्ममंडळ’ नामक संस्थाच काढली. तिची चिटणीशी टिळकांचे नातू गजानन विश्वनाथ केतकरांनी स्वीकारली.
टिळकांनी ‘गीतारहस्या’मध्ये आगरकरांना शिरोधार्थ असलेल्या मिलबेंथामच्या उपयुक्ततावादी-सुखवादी नीतिशास्त्राचा समाचार घेतला खरा,  परंतु त्याला उत्तर द्यायला आगरकर तेव्हा जिवंत नव्हते. आगरकरांनी त्याचा प्रतिवाद कसा केला असता याची झलक दाखवणारी ‘गीतारहस्या’ची बुद्धिवादी समीक्षा करणारे निबंध तरुण ब्राह्मणेतर पत्रकार वा. रा. कोठारींनी लिहिले आणि विशेष म्हणजे टिळकांच्या संमतीने तात्यासाहेब केळकरांनी ते ‘केसरी’त छापले. कोठारींनी टिळकांशी समोरासमोर वादही घातला. कोठारींच्या लेखनातून आगरकरांची छाप दिसून येते. विशेष म्हणजे पुढे कोठारी गीतारहस्याचे परमभक्त बनले आणि त्यांनी ‘गीतारहस्यसार’ सांगणारे पुस्तकही लिहिले. दुसरे एक ब्राह्मणेतर पत्रकार ‘दीनमित्र’ पत्राचे संपादक मुकुंदराव पाटील यांनी ‘नांगऱ्या’ नावाने ‘गीतारहस्य’ हा ब्राह्मणेतरांना अज्ञानात ठेवण्यासाठी केलेला ब्राह्मणी कावा आहे, असे प्रतिपादन केले. काही टीकाकारांची दखल टिळकांनी व्याख्यानांमधून वा लेखांमधून घेतली आहे. ‘गीतारहस्य’ने किती खळबळ माजवली हे दाखवायला एवढे नमुने पुरेसे आहेत.परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या तत्त्वज्ञानाला अनुसरून टिळक स्वत:चे आयुष्य जगले, त्या निष्काम कर्मयोगाचे सांगोपांग विवेचन ‘गीतारहस्या’त आहे. ‘गीतारहस्य’ हे टिळकांच्या जीवनाचेही तत्त्वज्ञान आहे. कर्माच्या फळाची आशा न धरता लोकसंग्रहासाठी ते कर्तव्यबुद्धीने करीत राहायचे हा निष्काम कर्मयोग टिळक आयुष्यभर आचरले. आपल्या हयातीत स्वराज्यरूपी फळ मिळण्याची शक्यता नसताना ते आपले कर्तव्य करतच राहिले. कर्माच्या प्रत्यक्ष परिणामांना महत्त्व न देता कर्त्यांच्या शुद्ध बुद्धीवर भर देऊन कर्माचे नैतिक मूल्यमापन करावे, हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. आपल्या निष्क्रिय बांधवांच्या मनात जागृतीची ज्योत पेटवून त्यांना कृतिशील केले. लोकसंग्रह हे त्यांच्या जगण्याचे सूत्र ठरले. ‘गीतारहस्य’ हे टिळकांच्या जीवनाचेही रहस्य आहे. सुख-दु:ख, लाभ-हानी, जय-पराजय यांना समत्वबुद्धीने सामोरे जाणारा स्थितप्रज्ञ हा लौकिक त्यांनी मिळवला तो हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगतच.