जुन्या पिढीतील नामवंत लेखक, संपादक आणि विचारवंत प्रभाकर पाध्ये यांनी जगभरातील त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रांतील विद्वानांच्या मार्मिक आठवणी ललितरम्य शैलीत ५० वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकातील सदरातून सांगितल्या. त्यांचे ‘असेही विद्वान’ हे संकलन साधना प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे. त्यातील काही निवडक आठवणी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही फार जुनी आठवण आहे. तो १९३८-३९ चा काळ असावा. मी तेव्हा ‘धनुर्धारी’चा संपादक होतो. काही कारणाने डॉ. आंबेडकरांची माझ्यावर मर्जी बसली होती. (पुढे लवकरच त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकावर मी अभिप्रायवजा लेखमाला लिहिली आणि ती मर्जी उडून गेली!)

एक दिवस डॉक्टरसाहेबांचा निरोप आला- ‘‘मला येऊन भेटा.’’

ते आपल्या ‘राजगृहा’तील अभ्यासिकेत बसले होते. भले थोरले टेबल. त्याच्यावर फाऊंटन पेन वगैरे वस्तू. मागे एक फिरणारी (Swivel) खुर्ची.

मी टेबलासमोर जाऊन उभा राहिलो. त्यांनी मला बसायला वगैरे काही सांगितले नाही. ते लगेच म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या पक्षात यावे आणि निवडणुकीला उभे राहावे, अशी माझी इच्छा आहे.’’

त्यांच्या त्या वेळच्या पक्षाचे नाव ‘इंडिपेंडन्ट लेबर पार्टी’ असे होते आणि निवडणुका म्हणजे मुंबई म्युनिसिपालिटीच्या निवडणुका. त्यांच्या पक्षातर्फे म्युनिसिपालिटीला उभे राहणे म्हणजे नक्की निवडून येणे. त्या वेळी महिना पाच रुपये भाडे भरणाऱ्याला मत असे. आंबेडकरांचे बहुतेक अनुयायी म्युनिसिपालिटीचे नोकर असत. त्यांना म्युनिसिपालिटीच्याच जागा राहायला असत. त्यांचे भाडे पाचपेक्षा अधिक असे. त्यामुळे त्यांचे मोहल्ले म्हणजे आंबेडकरांचे ‘पॉकेट बरोज्’! पण मी ‘नाही’ म्हटले.

त्याबरोबर डॉक्टरसाहेब उखडले. त्यांनी आपली भलीथोरली मूठ टेबलावर आपटली. त्यामुळे टेबलावरच्या फाऊंटन पेनांनी मारलेल्या उडय़ा माझ्या डोळ्यांपुढे अजून आहेत. ते ओरडले, ‘‘अरे कंगाल गृहस्था, मी तुला एक करिअर देतो आहे आणि ती तू नाकारतोस?’’ (You wretched fellow! I am giving you a career and you are rejecting it?)

डॉक्टरसाहेबांचा तो अवतार पाहून मी गडबडून गेलो. काय बोलावे तेच मला समजेना. अखेर होते नव्हते तेवढे अवसान गोळा करून म्हणालो, ‘‘सर, मला माहीत आहे, मी गरीब आहे. माझा पगार फक्त ऐंशी रुपये आहे. पण मी एक निर्णय घेतलेला आहे- आपण राजकारणात पडायचे नाही. तिथे आपला निभाव लागणार नाही.’’ माझे हे उद्गार त्यांनी ऐकले मात्र, त्यांच्या चर्येत एकदम फरक पडला. ते खुर्चीत मागे रेलले नि म्हणाले,

‘‘You are right! If I had not been born in this wretched community, I would never have touched this dirty business of politics.’’ (तुमचे बरोबर आहे. मी या नतद्रष्ट जातीत जन्माला आलो नसतो, तर राजकारणाच्या या घाणेरडय़ा मामल्यास स्पर्शसुद्धा केला नसता.)

पु.लं.ची एक अर्थपूर्ण आठवण मजपाशी आहे.

शांता रावचे नृत्य पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. नृत्य पाहून आलो नि आमची त्या नृत्याबद्दल चर्चा सुरू झाली. मला नृत्य अतिशय आवडले होते. पु.लं.ना मुळीच आवडले नव्हते.

मी त्यांच्या मताचा प्रतिवाद केला. तो त्यांना सहन झाला नाही. ते म्हणाले, ‘‘हे पाहा पाध्ये, मी या विषयाचा थोडा अभ्यास केला आहे, त्या आधाराने मी बोलतो आहे.’’ तेव्हा मी म्हटले, ‘‘मी अभ्यास केलेला नसेल, पण मला काय आवडते व काय आवडत नाही, हे मला नीट कळते. मी त्या आधाराने बोलत आहे.’’

अशा थोडय़ा कटू स्वरात आमच्या वादाचा समारोप झाला.

दुसऱ्या दिवशी पु.ल. मला के. डी. दीक्षितांकडेच भेटले. तेव्हा दीक्षित दिल्लीला रेडिओत व पु. ल. देशपांडे टेलिव्हिजनमध्ये होते. भेटल्याबरोबर पु.ल. म्हणाले, ‘‘पाध्ये, तुमचे म्हणणे बरोबर आहे. ही शांता राव फार सुंदर नाचते. काल आम्ही टीव्हीसाठी तिचा डान्स रेकॉर्ड केला, तेव्हा मला समजले. वास्तविक शांता रावची पावले बेढब आहेत, पण काल माझा कॅमेरा तिच्या पावलांवरच खिळला होता. तिच्या पावलांत जादू आहे.’’

पु.लं.च्या प्रांजळपणाचा असा अनुभव मला आणखीही काही वेळा आला आहे. पु.ल. फार मोठे विनोदी लेखक होणार, हे भविष्य मी फार पूर्वी वर्तवले होते.

पु.ल. त्या वेळी अंधेरीच्या कॉलेजात फर्स्ट इयरच्या वर्गात होते. आमच्या ‘धनुर्धारी’त तेव्हा ‘कॉलेजचे विश्व’ हे सदर येत असे; त्या सदरासाठी एकदा पु.लं.चा लेख आला नि तो वाचून मी थक्क झालो. मी त्यांना पत्र पाठवले आणि भेटीला बोलावले. ते आले. त्यांना मी म्हटले, ‘‘गडय़ा, तू एक दिवस महाराष्ट्राचा मोठा विनोदी लेखक होणार!’’ पु.लं.नी माझा शब्द खरा केला.

पुढे त्यांनी, जणू माझे भविष्य खरे झाले हे मलाच नीट पटावे म्हणून माझ्यावर आपल्या विनोदाचे धारदार शस्त्र अनेकदा धरले!

कुरुंदकरांच्या ‘रूपवेध’वर मेघश्याम पुंडलिक रेग्यांचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याची चर्चा साहित्यिकांच्या व तत्त्वज्ञांच्या अड्डय़ात सुरू झाली. त्यातले तात्त्विक मुद्दे तर अभ्यासकांना आकर्षक वाटलेच, पण त्या लेखाच्या शैलीने त्यांचे लक्ष अधिक वेधून घेतले.

खरे म्हणजे हा लेख एका चिडीतून निर्माण झाला. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या नावाने पूज्य असलेल्या या महाराष्ट्रात संशयास्पद, पण दिखाऊ विद्वत्तेने मोठमोठे लोक कसे भाळून व भारून जातात, याने निर्माण झालेली ती चीड. पण या चिडीवर रेग्यांनी आपल्या मिस्कीलपणाचे मोठे मजेदार आवरण घातलेले आहे.

मी रेग्यांना आपल्या भागातला एक फार मोठा तत्त्वज्ञ मानतो. माझ्यात तत्त्वज्ञानाची काही आवड असेल, तर त्याचे श्रेय मी प्रथम रेग्यांना देईन. किंबहुना, कुरुंदकरांचे अनुकरण करून मी असे म्हणेन की, या जिवाला या क्षेत्रात नर्मदेतल्या पाषाणाची जर काही थोडीबहुत कळा आली असेल (म्हणजे कंगोरे वगैरे गेले असतील), तर त्याचे श्रेय रेग्यांना आहे.

रेग्यांची मार्गदर्शनाची पद्धतच तशी आहे. कशी ती सांगतो-

प्रथम त्यांनी मला आजच्या रिवाजास अनुसरून राईलचे ‘दि कन्सेप्ट ऑफ दि माइंड’, नोएल स्मिथचे ‘एथिक्स’, विट्गेन्स्टाइनचे ‘फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स’ वगैरे पुस्तके वाचायला सांगितली. त्यांचा फारसा परिणाम होत नाही, असे त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाची दिशा बदलली. मग ते माझ्याशी चर्चा करीत आणि माझ्या विचारांना पक्केपणा येण्यासाठी निरनिराळे ग्रंथकार वाचायला सांगत. एकदा त्यांनी बोसांक्वे वाचायला सांगितला.

एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही कार्ल पॉपर वाचा. तुमच्या मतांचा मोठा भारदस्त पुरस्कार त्याच्यात तुम्हाला आढळेल.’’ एकदा त्यांनी मला बेर्गसांचे ‘क्रिएटिव्ह इव्होल्युशन’ वाचायला सांगितले.

मी म्हटले, ‘‘ते पुस्तक जुनेपुराणे नाही का झाले?’’

‘‘तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात काहीच जुनेपुराणे नसते,’’  रेगे म्हणाले, ‘‘तसे म्हटले तर आजचे नव-कॅथॉलिक तत्त्वज्ञान अगदीच बाद होईल!’’

एकदा मी त्यांना माझा एक प्रबंध पाठवला. त्यात मी असे प्रतिपादन केले होते की, ‘तत्त्वज्ञानाची पद्धती आणि विज्ञानाची पद्धती यात तसा महत्त्वाचा फरक काही नाही.’ त्याचे मला त्यांनी (अनंत काल गेल्यावर) उत्तर पाठवले की, ‘तत्त्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या पद्धतीत फरक असलाच पाहिजे.’

पुढे ते मला पुण्याला भेटल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘तत्त्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या पद्धतीत फरक असतो असे तुम्ही सांगितलेत. तो फरक कसा असू शकेल हेही तुम्ही दर्शवलेत; पण तत्त्वज्ञान म्हणजे काय, हे तुम्ही मला सांगितले नाहीच.’’

त्यावर आपल्या विशिष्ट स्वरात रेगे म्हणाले, ‘‘ते मला तरी अद्याप कोठे समजले आहे? ज्या क्षणी मला ते समजेल, त्या क्षणी मी तुम्हाला ते सांगणारी तार करेन.’’

असा रेग्यांचा मिस्कीलपणा!

वर मी रेग्यांचे उत्तर अनंत काळानंतर आले, असे म्हटले. रेग्यांची उत्तरे कधीच वेळेवर येत नसतात आणि त्यांच्याबद्दलची माझी उत्सुकता एवढी असते की, उशीर हा अनंत काळासारखा वाटतो! पण उशिराने का होईना, पण रेग्यांची उत्तरे येतात याचेच काहींना विलक्षण आश्चर्य वाटते.

असेच एक उत्तर आल्याचे ऐकून डॉ. रा. भा. पाटणकर मला एकदा म्हणाले, ‘‘तुमची मते त्यांना फारच धोकादायक वाटत असावीत- म्हणून बहुधा ते उत्तर पाठवण्याची तसदी घेत असतात!’’

सी. डी. देशमुख हे विनोदासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांची भाषणे ऐकलेले लोक तर, ‘त्यांना विनोदाचे इंद्रियच नाही’ असा निष्कर्ष काढण्याचा संभव आहे.

पण मी त्यांचे एक विनोदाने काठोकाठ भरलेले भाषण ऐकलेले आहे. फ्रेड हॉईलचे सहकारी गणितज्ञ जयंत नारळीकर यांच्या दिल्लीच्या एका व्याख्यानाला सी. डी. अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी नारळीकरांच्या विषयातले दृष्टान्त घेऊन खूप हशा पिकवला होता.

त्यांचा एक विनोद आठवतो. (म्हणजे आठवतो असे वाटते. याबाबतीत स्मरणशक्तीवर फार भिस्त टाकण्याची माझी तयारी नाही.) ‘एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ म्हणजे प्रसरणशील विश्वाच्या कल्पनेचा आधार घेऊन ते म्हणाले होते- ‘‘या अशा सारख्या प्रसरण पावणाऱ्या विश्वात दरेक ‘शेजारी’ सारखा एकमेकांपासून दूर जात असतो, तशी या पृथ्वीवरची शेजारी राष्ट्रे जर एकमेकांपासून दूर गेली, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातले कितीतरी प्रश्न चटकन सुटतील, नाही?’’

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचा मी विद्यार्थी होतो, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये दिलेल्या प्रवेशाचा आणि इन्स्टिटय़ूटतर्फे दिलेल्या स्कॉलरशिपचा मी काहीच उपयोग केला नाही.

पण जो काही थोडासा अभ्यास मी केला, त्या संदर्भात धनंजयरावांशी झालेल्या एका संभाषणाची मला चांगली आठवण राहिली आहे.

त्यांनी मला एक पुस्तक वाचण्याची शिफारस केली आणि लगेच म्हटले, ‘‘हे पुस्तक सुमारच आहे म्हणा!’’

‘‘मग तुम्ही मला ते वाचायला का सांगता आहात?’’

‘‘ते सामान्य आहे, हे तुम्ही ते वाचून ठरवले पाहिजे.’’

अभ्यासाविषयीचा एक सुंदर सिद्धान्त धनंजयरावांनी मला त्या वेळी सांगितला. पण पुढे प्रिन्स्टनला जाईपर्यंत त्याची नीटशी उमज मला पडली नव्हती आणि त्यानंतर तरी किती पडली, तो एक प्रश्नच आहे!

गोष्ट १९३४ मधली (किंवा १९३५ मधली) असेल. मीरत खटल्यात झालेली शिक्षा भोगून डांगे नुकतेच सुटून आले होते. तेव्हा ग. त्र्यं. माडखोलकरांचा मुक्काम मुंबईत होता. क्रांतिकारक कादंबऱ्या लिहिण्याचा सोपा मार्ग म्हणून क्रांतिकारकांना भेटण्याचा त्यांना हव्यास होता. ते डांग्यांना भेटायला गेले. त्यांनी बरोबर मला नेले.

माडखोलकरांनी माझी ओळख करून दिल्याबरोबर डांग्यांनी मला म्हटले, ‘‘तुमचा ‘प्रतिभा’ पाक्षिकात रशियन लेखकांच्या आत्महत्येबद्दलचा लेख मी वाचला. तुम्हाला हे माहीत नाही का की, आत्महत्या करण्याची प्रथा रशियन लेखकांत फार पूर्वीपासून सुरू आहे?’’

स्टालिनच्या राजवटीत लेखकावर असा काही वरवंटा फिरवण्यात येऊ  लागला की, कवींनी आत्महत्या केली व गद्यलेखकांनी लेखनसंन्यास घेण्यास सुरुवात केली, अशा अर्थाचा एक लेख मी काही आठवडय़ांपूर्वीच ‘प्रतिभा’ पाक्षिकात प्रसिद्ध केला होता. त्याला उद्देशून डांगे बोलत होते. एका शिस्तबद्ध कम्युनिस्टाचा स्टालिनची तरफदारी करण्याचा तो प्रयत्न होता.

मी म्हटले, ‘‘हो, मला माहीत आहे, आत्महत्या करण्याची मानवजातीची जुनीच खोड आहे. पण प्रत्येक आत्महत्येला कारण कुठले झाले, याला महत्त्व असते. आज रशियात होत असलेल्या कवींच्या आत्महत्यांची कारणमीमांसा मी केली आहे.’’

त्यानंतर माडखोलकर तासभर तरी तिथे बसले होते, पण तेवढय़ा अवधीत डांगे माझ्याशी एक शब्ददेखील बोलले नाहीत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notable authors prabhakar padhye memories with scholars from various fields
First published on: 28-10-2018 at 01:52 IST