वीणाताईंना ग्रंथनायकाच्या अभ्यासविषयापेक्षा ग्रंथनायकाची गोष्ट सांगायची असते. त्याचा/ तिचा प्रवास, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष हे सगळं मानवी असतं आणि तेच वीणाताईंना सांगायचं असतं. ही गोष्ट जनसामान्यांसाठी महत्त्वाची, प्रेरणादायी. बाकी त्या नायक/ नायिकेचे अभ्यासविषय हे तज्ज्ञांचं क्षेत्र! आपण कोणासाठी नक्की हे सांगतो आहोत याची पक्की जाणीव वीणाताईंना आहे…

मराठीतल्या अनेक वाचकांप्रमाणे वीणा गवाणकर या नावाशी माझा परिचय फक्त ‘कार्व्हर’कर्त्या इतक्यापुरताच मर्यादित होता. सातवी-आठवीत असताना कधीतरी मामाने ते पुस्तक मला दिलं. आणि मग मराठीतल्या अनेक जणांप्रमाणे मीही ‘कार्व्हर’मय होऊन गेलो. त्या वयात होतं असं. आता ते आठवलं तरी आपण इतके स्वप्नाळू असणं शक्यच नाही… असं वाटतं; पण ‘त्या’ वयात हे असं कोणता ना कोणता ‘विषय-मय’ होणं काही वाईट नाही. ज्यांचं असं होत नाही त्यांचं पुढे काय होतं हे पाहिल्यावर भीतीच वाटते. असो.

त्यानंतर वीणा गवाणकर हे नाव दिसलं की वाचायचं हा परिपाठ सुरू झाला. नंतर त्यामुळे की काय माहीत नाही, पण चरित्र जास्त आवडायला लागली. त्यावेळी अजून इंग्रजी वाचन झेपायची सुरुवात व्हायची होती. ती भूक गोविंदरावांच्या ‘वाचता वाचता’च्या पुढे गेलेली नव्हती. सुमती देवस्थळींची टॉलस्टॉय, अल्बर्ट श्वाईट्झर, मॅक्झिम गॉर्की, मार्क्स वगैरे, न. र. फाटक यांचं टिळक चरित्र, सेतुमाधवराव पगडी, चर्चिल, हिटलर वगैरे वगैरे विपुल वाचलं. त्या सगळ्यात वीणाताईंचं लिखाण आपोआप लक्षात राहायचं. का, ते तेव्हा कळत नव्हतं.

पुढे पत्रकारितेत आल्यावर अनेकांच्या भेटीगाठी व्हायच्या, पण वीणाताईंचा कधी काही परिचय झाला नाही. एव्हाना पत्रकारितेत स्थिरावल्यानं आपण जाऊन एखाद्याची ओळख करून घ्यावी हा भाबडेपणाही उडून गेलेला. बरेचसे लेखक, कवी तितके काही आदरणीय नसतात हे सत्य एव्हाना कटू वाटेनासं झालेलं. स्वत:च्या पुस्तकाचं ‘चार ओळी तरी…’ परीक्षण यावं यासाठी कोणा ना कोणा मार्फत प्रयत्न करणारे, त्यातले काही सराईत तर स्वत:च स्वत: त्यासाठी आर्जवं करणारे… ते करताना ‘माझं काही नाही ब्वा… पण लोकांना फार वाटतं बघा या पुस्तकावर छापून यायला हवं,’ असं म्हणणारे रस्तोरस्ती भरपूर दिसू लागलेले. पण असं काही मत बनावं असं वीणाताईंबाबत काही घडलेलं नव्हतं. आणि मी नंतर गेलो ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये. मराठी कवी/ लेखक यांच्यापासनं ‘इकॉनॉमिक टाइम्स’ तसा फारच लांब, त्यामुळे वीणाताईंशी परिचय काही कधी झाला नाही.

पण झालं असं की ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये असतानाच २००६ साली माझं ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’ हे खनिज तेल या विषयावरचं पहिलं पुस्तक आलं. त्याआधी त्या विषयावर कुठे कुठे दिवाळी अंकात लिहिलेलं. त्यातला एक लेख वाचून बडोद्याहून डॉ. नेने यांचा फोन आला. म्हणजे दादुमिया. ते म्हणाले, ‘‘हा विषय लेखांत वाया घालवू नकोस… पुस्तक लिही.’’ त्यांचा माझा काहीही परिचय नव्हता. म्हटलं, इतकी अधिकारी व्यक्ती म्हणतीये तर लिहू या. लिहिलं. मराठीत त्यावर काही पुस्तक नव्हतं तोवर. जरा साशंकच होतो. म्हटलं, तेल, अरब वगैरे विषयांवर कोण वाचणार अशी शंका.

तिला पहिला तडा वीणाताईंनी दिला. त्यांनी ते वाचलं आणि वर पत्र लिहून कळवलं. पुस्तक आवडलं वगैरे… पण त्यापेक्षा लक्षात राहिला त्यांनी वापरलेला एक शब्द- ‘तेलसाक्षरता’. म्हणजे इतके दिवस गोडं तेल, खोबरेल तेल वगैरे इतकंच माहीत होतं… खनिज तेल हे प्रकरण इतकं गंभीर असतं आणि त्यामागे काय काय घडत असतं याचा काही अंदाज नव्हता. ‘‘तुम्ही आमची तेलसाक्षरता वाढवलीत,’’ हे वीणाताईंचे शब्द. जरा धीर आला. वीणाताईच असं म्हणतायत म्हणजे बरं असणार पुस्तक असं वाटून गेलं. तो मुद्दा तिथेच संपला. वीणा गवाणकर ही व्यक्ती अपरिचितच राहिली.

मग तेल आणि संबंधित विषयांवर कुठे कुठे भाषणांची निमंत्रणं यायला लागली. एकदा वसईला होतं भाषण. तोपर्यंत वसईत अनेकांशी एक अदृश्य दोस्ताना तयार झालेला. कार्यक्रमाला बरेच यायचे त्यातले. नंतर त्यातल्या एकानं ओळख करून दिली- या वीणाताई! ती पहिली भेट. नंतर उत्तरोत्तर तो परिचय दूध तापत राहिलं की होतं तसा घट्ट होत गेला. त्यांच्या पुस्तकांचा चाहता होतोच. नंतर त्यांचाही बनलो.

याचं कारण वीणाताईंचे पुस्तकाचे विषय. ते केवळ अनवट आहेत हेच त्यांचं मोठेपण आणि इतकंच त्यांचं वैशिष्ट्य नाही. तर त्यांचे सर्व कथानायक एक निश्चित भूमिका घेतात. रोझलिंड फ्रँकलीन, माँटेसरी, लीझ माइट्नर, डॉ. सलीम अली, सर्पतज्ज्ञ रेमंड डिटमार्स, ‘पाणी पंचायत’वाले विलासराव साळुंके, इस्रायलच्या गोल्डा मायर किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असूनही भारतीयांनाच माहीत नसलेले डिझायनर रॉबी डिसिल्वा वगैरे… वीणाताईंच्या ग्रंथनायकांची जगण्याची काही मूल्यं आहेत; आणि त्यात ते जराही तडजोड करत नाहीत. वीणाताईंचं पुस्तक वाचण्याआधी डॉ. खानखोजे यांच्याविषयी जुजबी माहिती होती. कारण ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या वर्तुळातले. रॉय यांच्याप्रमाणेच तेही मेक्सिकोत गेले. जपान, अमेरिका, जर्मनी आणि अखेर मेक्सिको असा त्यांचा कष्टप्रद प्रवास. त्यांच्यावर लिहिण्यासाठी मेक्सिको दूतावासातनं कागदपत्र मिळवण्यासाठी तितकेच कष्ट वीणाताई घेतात. या सगळ्या ठिकाणी डॉ. खानखोजेंनी शेतीवर अनेक यशस्वी प्रयोग केले. त्या देशांना त्यांचं कौतुक, पण भारतात परतल्यावर मात्र या खानखोजेंच्या पदरी आपली नेहमीची उपेक्षा भरभरून पडते आणि अखेर अर्धपोटी राहात त्यांना मरण जवळ करावं लागतं.

हे सगळं सांगायचं तर आधी ते मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. वीणाताई ते घेतात. आणि मुळात ते सांगण्याची ओढ आणि गरज हवी. कारण हे विषय काही कंत्राटी लेखनाचे नाहीत. ‘‘आणखी एखादं चरित्र होऊन जाऊ द्या,’’ असं प्रकाशक म्हणालेत म्हणून त्या नायक शोधून शोधून काढतायत असं अजिबात झालेलं नाही. त्यांना स्वत:ला काही सांगायचं असतं तेच त्या चरित्रनायकाच्या गोष्टीतून सांगतात. ते सांगण्याची निकड आणि तीस साजेसा चरित्रनायक सापडावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आटापिटा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या ग्रंथनायकांच्या क्षेत्राशी वीणाताईंचा काडीचाही संबंध नाही. म्हणजे डीएनए, मोलेक्युलर बायालॉजी, अणू विघटन वगैरे वगैरे विषय वीणाताईंनी अभ्यासलेत असं अजिबात नाही. तरीही या विषयांतल्या मान्यवरांवर त्यांनी लिहिलेली पुस्तकं कमालीची वाचनीय ठरतात.

याचं कारण त्यांना ग्रंथनायकाच्या अभ्यासविषयापेक्षा ग्रंथनायकाची गोष्ट सांगायची असते. त्याचा/ तिचा प्रवास, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष हे सगळं मानवी असतं आणि तेच वीणाताईंना सांगायचं असतं. ही गोष्ट जनसामान्यांसाठी महत्त्वाची, प्रेरणादायी. बाकी त्या नायक/ नायिकेचे अभ्यासविषय हे तज्ज्ञांचं क्षेत्र! आपण कोणासाठी नक्की हे सांगतो आहोत याची पक्की जाणीव वीणाताईंना आहे. आणि दुसरं. त्यांच्या सगळ्या पुस्तकांत, त्यांच्या विषयांत एक समान धागा आहे.

तो म्हणजे या सगळ्यांना तात्कालिक समाजानं त्यावेळी आणि काहींच्या बाबत नंतरही मोठेपणा काही ना काही कारणानं नाकारलेला आहे. रोझलिंड फ्रँकलीन, लीझ माइट्नर, माँटेसरी या तर विशेष. रोझलिंड आणि लीझ यांची कामगिरी अगदी नोबेलच्या दर्जाची. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि त्यावर मात करून केलेलं मूलभूत संशोधन. पण त्या काळात दुर्लक्षित. राजकीय कर्तृत्वाचं पुरुषीपण मिरवणाऱ्यांत स्वत:चं मोठेपण न मिरवता दाखवून देणाऱ्या गोल्डा मायर दुर्लक्षित नाहीत; पण आपल्याकडे नायकत्वापासून वंचित. या सगळ्या स्त्रिया बंडखोर आहेत. वीणाताईंनी ज्यांच्यावर लिहिलं ते डॉ. खानखोजे, रॉबी डिसिल्वा, साळुंके हेही तसे उपेक्षित; पण उपेक्षित असल्याची त्यांना खंत नाही आणि ती उपेक्षा संपावी म्हणून या सगळ्यांनी कधी पुढे पुढे केलेलं नाही.

हे अगदी वीणाताईंसारखंच. लेखन-विषयातली मूल्यं आणि लेखकाची जीवनमूल्य यांचं काही नातं असलं तर ते लेखन आणि तो लेखक आदरणीय अशी एक माझी माझ्यापुरती मर्यादित समज. वीणाताई त्यात फिट्ट बसतात. म्हणजे काय? म्हणजे व्यापक चांगलेपणासाठी वैयक्तिक वाईटपणा घ्यायला न घाबरणं!

म्हणून अन्य मराठी सारस्वत महानुभावांप्रमाणे वीणाताई वैयक्तिक आयुष्यातही भूमिका घ्यायला कचरत नाहीत. अनेक मराठी लेखक, प्रकाशक वगैरे मान्यवर मंडळी व्यावहारिक कातडीबचाऊपणा करत असताना वीणाताईंचा धारदारपणा फारच लोभस. मग तो मुद्दा स्थानिक किंवा राष्ट्रीय राजकारणाशी, साहित्यिकांशी संबंधित असो किंवा प्रकाशक-लेखक संबंधांचा विषय असो. वीणाताई पोलिटकली करेक्ट राहण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. आणि पोलिटिकली करेक्ट मंडळींकडून फक्त स्वत:चं भलं होतं फार फार तर; पण समाजाच्या भल्यासाठी पोलिटिकली करेक्ट नसणंच जास्त महत्त्वाचं असं माझं ठाम निरीक्षण. ते बळकट करणाऱ्यांतल्या एक वीणाताई. गेल्या जवळपास वीस वर्षांच्या परिचयात वीणाताईंच्या या गुणाचे भरपूर दाखले आहेत. वीणाताईंशी गप्पा मारणं, त्यांना भेटणं हा ‘एकसंध’ अनुभव असतो. लेखिका वेगळी आणि व्यक्ती दुसरी असा प्रकार नाही.

त्यामुळे वसई आणि परिसरातल्या कार्यक्रमाची भैरवी दोन प्रकारे होते. एक म्हणजे प्रशांत रॉड्रिग्ज, नोएल दिब्रिटो, सॅबी परेरा अशा समविचारींबरोबर कार्यक्रमोत्तर कार्यक्रम. तो नसेल तर वीणाताईंच्या घरी. मुळात तो वसईचा परिसरच रम्य आहे. गोव्यातल्या एखाद्या लहानशा गाऊल्याची- म्हणजे चिमुकलं गाव- आठवण करून देणारा. अशा परिसरातल्या वीणाताईंच्या घराची रचना जुन्या वळणाशी अजूनही इमान राखून असलेली. घरातली सजावटही अगदी साधी, अनलंकृत आणि तरीही क्लासी अशी. जुनी पितळेची भांडी, बंब-नामे पाणी तापवायच्या भांड्याची प्रतिकृती, पुस्तकांचं फडताळ, मंद दिवे. मुख्य म्हणजे हॉस्पिटलच्या खोल्यांची आठवण करून देणाऱ्या ट्युबलाइटचा मंदबुद्धी उजेड नाही. पहिल्या मजल्यावर वीणाताई आणि तळमजल्यावर पुतण्या चिन्मय. तोही ‘लोकसत्ता’ लेखक. वीणाताईंकडे गेलं की सगळेच जमतात. गप्पा मारायला. महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत गवाणकर हे ‘लेखिकेचा नवरा’ असे अजिबात वागत नाहीत. ‘मी अमुक मुद्दा हिला कसा सांगितला’ -छापाचं काहीबाही बोलत बायकोच्या श्रेयावर डल्ला मारण्याचा जराही प्रयत्न त्यांचा कधी नसतो. पण म्हणून निरिच्छ असतात असंही नाही. त्या सगळ्यांबरोबरच्या गप्पांचा सुखांत जेवणाच्या टेबलावर. वीणाताईंच्या लिखाणाप्रमाणे त्यांच्या हातालाही चव आहे. ताजे मासे आणि सोबतीला तो वसईतला स्थानिक लालसर भात. त्यामुळे जेवण अधिक रुचकर की गप्पासत्र अधिक चविष्ट हे ठरवता येणं अवघड.

ही संधी सारखी मिळतेच असं नाही. पण एरवी मोबाइल-संवाद तसा नेहमीचा. ‘‘तुमची परवाची मुलाखत बराच खकाणा उडवणारी ठरली म्हणे,’’ अशी एकदा त्यांची प्रतिक्रिया. तर ‘‘कधी वसईत येताय, रात्री जेवायचं काय? मासेमारीसाठी बोटी पाठवायच्या आहेत तेव्हा आधीच सांगा.’’ अशी स्पष्ट सूचना. कधी कधी एखादा लेख ‘बेक्कार आवडला’ असं म्हणायला त्यांना कमीपणा वाटत नाही. ‘‘आता तुम्हास स्वखर्चाने दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमावे लागणार… काळजी घ्या,’’ असं त्या कळवणार. माझ्या कुठल्या भाषणात किंवा लिखाणात एखादी तपशिलाची चूक आढळली किंवा एखादा उल्लेख राहून गेला तरी त्या तितक्याच अधिकारवाणीनं कळवतात. हे नमूद अशासाठी केलं की, उगाच वर्तमानपत्राच्या संपादकाला वगैरे आपण चुका कशाला सांगा… असा सोयीस्कर विचार वीणाताई अजिबात करत नाहीत. त्यांचा टोकदार स्पष्टवक्तेपणा लोभस आणि खरा- त्यांनी लिहिलेल्या चरित्रांसारखा…

कर्नाटक संगीतात एक वाद्या आहे- विचित्र वीणा. ते नाव अगदीच काहीतरी. पण त्याचा शाब्दिक आधार घेत गवाणकरबाईंना मराठी साहित्यातल्या ‘चरित्र वीणा’ म्हणायला हरकत नसावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

girish.kuber@expressindia.com