आभाळातले ग्रह मानवाच्या विचार, भावना, कृतींवर काय व कितपत प्रभाव टाकतात यासंबंधी जनमानसात मतभिन्नता आहे. परंतु नातेसंबंधांमध्ये वावरताना, त्यांचा सक्रिय भाग होताना आपल्या मनाने करून घेतलेले ग्रह निश्चित परिणामकारक ठरतात,  याविषयी अनेकांचे  मतैक्य असावे. आपण सगळेजण हे जाणतो, अनुभवतो की प्रत्येकाच्या एखाद्या विशिष्ट ‘नात्या’कडून, ‘भूमिके’कडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण न सांगताही समोरच्या व्यक्तीने समजून घ्याव्यात, उमजून वागावे, त्यांची पूर्तता करावी, ही आणखीन एक अपेक्षा! नातेसंबंधांमध्ये तेढ निर्माण होण्याचं एक मुख्य कारण ‘सुसंवादाचा अभाव’ हे मानलं जातं. याबरोबरीने आपण नात्याबद्दल आणि नात्यातील व्यक्तींबद्दल करून घेतलेले ग्रह किंवा आपल्याला करवून दिलेले ग्रह, हे स्वानुभवावरून तयार झालेले- केलेले किंवा ऐकिवातल्याअनुभवांवरून गृहीत धरलेल असू शकतात. दुर्बिणीतून थेट न दिसणारे, पण नातेसंबंधांच्या अवकाशात थैमान घालणारे हे ग्रह आपल्याला नवीन नाहीत. आपण बऱ्याचदा या ग्रहांनी इतरांच्या (नात्यातील साथीदारांच्या) विश्वासाची, बांधिलकीची, हेतूची शिकार करतो आणि काही प्रसंगी स्वत:च शिकार होतो!

एखादा ‘ग्रह’ करून घेणे, गृहीत धरणे म्हणजे- संपूर्ण माहिती नसताना, आपल्याला जे वाटतेय तशीच वस्तुस्थिती आहे असं मानणं. त्यावर ठाम विश्वास ठेवून भूमिका पुढे रेटणं आणि आपली कृती तशीच थाटणं, असं म्हणूया. इंग्रजीत या संकल्पनेला ‘Assumptions’ हा प्रतिशब्द योग्य ठरेल. आपल्या सोयीसाठी (चर्चेच्या) आपण एक नातं आणि त्यातील दोन व्यक्ती आणि त्यांचे आपापसातील नातेसंबंध असे कल्पूया. या दोन्ही व्यक्ती आपापल्या जाणिवेत, चित्तात काही कथासदृश बाबी घेऊन नात्यात रुजू होतात. या कथा अनेक ग्रहांवर उभारलेल्या, चितारलेल्या, लिहिलेल्या असतात. आणि या कथेचे एक मुख्य पान नात्यातील ही दुसरी व्यक्ती असते. कथेचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आपण असल्याने, आपण या दुसऱ्या व्यक्तीची, म्हणजे नात्यातील आपल्या साथीदाराची व्यक्तिरेखाही आपल्या हिशेबाने, मताप्रमाणे रेखाटतो. काही गोष्टी गृहीत धरल्या जातात, ग्राह्य़ धरल्या जातात आणि मग ग्रह डोकावतात, स्थिरावतात. आणि बहुतांश वेळा वेळेत न हाताळल्याने आपल्याला दु:ख, संताप आणि एकंदरच नकारात्मकतेच्या जाळ्यात अडकवतात आणि जाळ्यातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रतिवार करतो, पलायन योजतो किंवा दुसऱ्या व्यक्तीला दोष देत स्वत:ला  मुक्त केल्याचे भासवतो. या धोरणाने समस्यांचे निरसन होण्यापेक्षा, मतभेद यशस्वीरीत्या हाताळण्यापेक्षा समस्या व मतभेद अधिक जटिल होऊन बसतात आणि ग्रहही आणखीन धारदार आणि तीक्ष्ण होत जातात. सशक्त आणि विश्वास- आदर- प्रेम- सहकार- सहिष्णुतेने बहरलेली नातीही काही वेळा या खाचखळग्यांना सामोरी जातात. परंतु या ग्रहांचे वर्चस्व गृहीत धरून हतबल होण्यापेक्षा, पारदर्शकतेची कास धरणं, विचाराचा पुरावा शोधणं आणि मगच तो पक्का करणं योग्य ठरेल. म्हणजे ‘asking rather than assuming’ हे उपयुक्त ठरेल. योग्य त्या पद्धतीने विचारणा करून ग्रह टाळणे हे फायद्याचं ठरेल. नात्यातील आव्हानं गायब करू पाहणं यापेक्षा ग्रह नाहीसे करणं हे अधिक गरजेचं आहे, कारण हे जटिल ग्रहच एक भले मोठे आव्हान ठरू शकतात; आव्हान म्हणण्यापेक्षा- अडथळा!

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

‘‘नात्यातील दुसरी व्यक्ती आपली फसवणूक करत आहे- आर्थिक, भावनिक’’, ‘‘ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही, हे मला ठाऊक आहे’’, ‘‘ती व्यक्ती माझं कधीच कौतुक करणार नाही’’, ‘‘तो हे मला चिडवायलाच बोलला असणार’’, ‘‘तिने मुद्दामहून मला सगळ्यांसमोर कमी लेखलं, कारण तिचा हेतू नेहमी कुटिलच असतो’’, ‘‘तुला एखादी गोष्ट आवडणार नाही/ आवडेल म्हणून मी ते केले आणि ते बरोबरच आहे’’.. अशा स्वरूपाची दोष देणारी, दुसऱ्यांवर  जबाबदारी ढकलणारी, आपल्याला प्राथमिक व निवडक माहिती उद्धृत करणारी- शोधणारी व बाकीची माहिती दुर्लक्षित करणारी, हेतुपुरस्सर/ अनवधानाने केलेली विधानं आपले ग्रह पक्के करताना दिसतात. एक उदाहरण पाहूया –

‘अ’ ने ‘ब’ ला ‘क’च्या बाबतीत ‘काहीतरी’ सांगितले. ‘अ’चे हे सांगणे बऱ्यापैकी स्वानुभवावरून रचले गेलेले होते. ‘अ’चे स्वभावविशेष अभ्यासले, तर ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’, ‘राई का पहाड करणे’, ‘तिखट- मीठ लावून सांगणे’ हे होतं. स्वाभाविकच त्वरेने आणि टोकाचे ग्रह करून घेण्यात आणि ते भराभर पसरवण्यात इतरांच्या मनात कोंबण्यात ‘अ’ जराही दिरंगाई करत नाही. अशा स्वरूपाच्या स्रोताकडून ‘ब’पर्यंत विशिष्ट प्रकारे रंगवलेली माहिती पोहोचते. किंबहुना माहितीचा स्वत:च्या आकलन आणि हेतूनुसार लावलेला अर्थ पोहोचवला जातो. ‘ब’ जर स्वत:च्या बौद्धिक  प्रक्रियांना चालना न देता ‘अ’वरच्या अतिविश्वासामुळे किंवा ‘अ’शी प्रामाणिक राहण्याच्या खटाटोपामुळे बधला तर हे चुकीचे ग्रह ‘क’ची प्रतिमा आहे त्यापेक्षा भिन्न करून टाकतात. ‘अ’ जर अतिप्रभावशाली व्यक्तिमत्त्व असेल, ‘अ’ जर प्रचलित नेता असेल, ‘अ’ जर एखादा वरचा अधिकारी असेल, सत्ताधीश असेल, तर त्याचे ‘ग्रह’ जनमानसावर किती प्रमाणात छाप पाडतील, रुजतील, कलंकित करतील याचा आपण अंदाज बांधू शकतो.

आपल्या नातेसंबंधांमध्येच नव्हे, तर सामाजिक स्तरांवरही जातपात, धर्म, इ. बाबतचे ग्रह एकमेकांस आपटतात आणि सामाजिक अवकाश हादरून जातो, धगधगता राहतो. काही निवडक व्यक्ती हे ‘ग्रह’ खोडून काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात ते यशस्वी होताना दिसले तर काही समाजकंटक जुने- बुरसटलेले ग्रह पुन्हा अवकाशात आणू पाहतात. ग्रहांची ही आदळआपट आपल्या जीवनात होत राहते. पण त्यांच्या ‘ठिय्या मांडून’ बसण्याच्या स्वरूपामुळे पाठ काही सोडत नाहीत आणि सूर्याला म्हणजेच आपल्या बौद्धिक- भावनिक क्षमतांना, विवेकबुद्धीला, तर्काला घेराव घालत राहतात. आपला हा सूचक ‘सूर्य’ म्हणजे मानसिक प्रक्रिया प्रकाशमय ठेवल्या (ऊर्जितावस्थेत ठेवल्या) तर हे ग्रह आपल्या कक्षा सोडून भरकटणार नाहीत. कारण तळपत्या सूर्याच्या निकट जाऊन खाक होण्यापेक्षा अंतरावर राहिलेले बरे! आपली नीतीही काहीशी अशीच राखली, योजली तर अवकाश सुंदर दिसेल, मोहक भासेल आणि जीवन सुखमय, पारदर्शक होईल.

मानसिक प्रक्रिया ऊर्जितावस्थेत ठेवणं म्हणजे आपली आकलनशक्ती, स्मरणशक्ती, एकाग्र ठेवण्याची क्षमता.. यांवर सजगतेने काम करत, स्वत:ला नियमित प्रश्न विचारत ग्रहांकित विचार व निर्णय होत आहे का याचा उपलब्ध माहिती आणि वस्तुस्थितीआधारे आढावा घ्यावा. कोणताही ग्रह बनू पाहत असताना त्याचा स्रोत, त्या स्रोताचे खरेपण, त्याची खात्रीपूर्वकता पडताळून पाहावी. जे समजले त्यात तथ्य आहे का हे नि:पक्षपणे ओळखावे. नकारात्मतक ग्रह करून घेतल्याने आपण कोणावर अन्याय करत नाही ना, दुजाभाव राखत नाही ना वा तथाकथित अतिसकारात्मक ग्रह बाळगल्याने एखाद्याच्या आत्मोन्नती रोखणाऱ्या चुका पोटात घालत नाही ना, अयोग्य वर्तन- निर्णयांचे समर्थन करत नाही ना, संकुचित दृष्टिकोनातून- दुर्बिणीतून पाहत नाही ना, विश्वासनीय पुरावा असल्याशिवाय एखाद्या विधानावर, भूमिकेवर, मतावर विसावत नाही ना, तेच अंमित सत्य मानत नाही ना.. या प्रश्नांची उत्तरे शोधावी.

ग्रह करून घेतले की गृहीत धरणे आणि आपल्या व इतरांच्या हेतू-वर्तनावर अभिप्राय देणे, मूल्यमापन करणे आपल्याला स्वाभाविकरीत्या अवगत होते. त्यांच्या सोयीमुळे आपण ही प्रक्रिया चटकन अवलंबतो, राबवतो. एखादी परंपरा केवळ पिढय़ान् पिढय़ा चालत आली आहे म्हणून ती ग्राह्य़ धरणे, योग्य समजणे; मग त्यामुळे कोणावर अन्याय होत असेल, अंधश्रद्धा फोफावत असेल तरी त्यांना न जुमानणे हे जसे घातक, तसेच केवळ ‘मी’ हा ग्रह केला आहे, बाळगला आहे म्हणून तो बरोबर आणि इतरांनीही मानावाच असा समज करून घेणे, आग्रह धरणे हेही अहंकाराचे लक्षण, आडमुठेपणाची खूण. आणि त्यामुळे ते अयोग्यच! आता गोंधळ घालणाऱ्या या ग्रहांना आयुष्यात शिरकाव करू द्यायचा का तर्काला, हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे.

केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)