स्नेहल बाकरे
उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेल्या बच्चे कंपनीसाठी मामा बाजारातून भरपूर आंबे घेऊन आला. आंब्याच्या पेट्या दिसताच मिहिर, जान्हवी, प्रिया, मुकुल सगळे जण त्याच्याकडे धावले. ‘‘आता खरी मज्जा येणार,’’ असं म्हणत मिहिर आंब्याची पेटी उघडण्यासाठी मामाला मदत करू लागला. मामाही एक एक पेटी उघडत मुलांना आंबे दाखवू लागला. ‘‘हे घ्या पायरी रस पुरी खायला. हा हापूस मस्त फोडी करून खायला आणि हा रायवळ चोखून खायला.’’
‘‘मामी, आता लवकर जेवण बनव. मला खूप भूक लागलीये.’’ – इति जान्हवी
मामीने ते आंबे स्वच्छ धुऊन बाहेर अंगणात रस करण्यासाठी आणून दिले. सगळी मुलं हात-पाय स्वच्छ धुऊन मामासोबत घोळका करून रस करायला बसली.
रसासोबत त्यांच्या गप्पांची मैफीलदेखील रंगू लागली. मिहिर म्हणाला, ‘‘आंब्याला फळांचा राजा का म्हणतात माहितीये का?’’
छोटीशी प्रिया म्हणाली, ‘‘तो खूप मस्त लागतो म्हणून ना!’’
‘‘आंब्याची चव तर फारच मस्त असते, पण आंब्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यात फोलेट, बीटा कॅरिटीन, लोह, जीवनसत्त्व ए आणि सी, तसंच कॅल्शियम विटामिन ईसारखे खूप सारे पोषक घटक असतात. तसेच हा अँटीऑक्सिडंटनेसुद्धा समृद्ध आहे. एकाच फळात एवढे सारे गुण असल्यामुळे त्याला फळांचा राजा म्हणतात.’’ – मिहिरने माहिती सांगितली.
जान्हवी अधिक माहिती पुरवत म्हणाली, ‘‘आणि हो, आंबा हा काय फक्त भारताचेच राष्ट्रीय फळ नाहीये, तर पाकिस्तानचेसुद्धा राष्ट्रीय फळ आहे. बांग्लादेशचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपिन्सचे राष्ट्रीय चिन्हदेखील आंबाच आहे.’’
मामा मुलांचं कौतुक करत म्हणाला, ‘‘अरे वा मुलांनो, तुम्हाला तर बरीच माहिती आहे.’’
‘‘मामा, मागच्या वर्षी आम्हाला शाळेत आंब्यावर एक प्रोजेक्ट करायला सांगितला होता.’’ स्पष्टीकरण देत जान्हवी.
‘‘छान… तुम्ही आंब्यावर एवढा अभ्यास केला आहे हे ऐकून खूप छान वाटलं. पण तुम्हाला आंब्याचे प्रकार माहिती आहेत का?’’
मिहिर म्हणाला, ‘‘हो, तोतापुरी, रायवळ, हापुस, पायरी…’’
‘‘फक्त एवढेच नाहीत. भारतात आंब्याच्या तेराशेपेक्षा अधिक जाती आहेत.’’
‘‘बापरे, एवढ्या प्रकारचे आंबे असतात.’’ कुतूहलाने प्रिया म्हणाली.
‘‘देशभरात आपल्याकडे मालगोवा, केशर, सफेदा, सिंदुरी, नीलम, दशहेरा, लंगडा, हिमसागर, चौसा, मानकुराद, रुमाली, बेनिशान, बनारसी, मडप्पा, फझरी, हिमसागर, सुकाल आणि अजून बऱ्याच प्रकारचे आंबे येतात. जगभरात सर्वात जास्त म्हणजे २७ दशलक्ष टनपेक्षाही जास्त आंबा भारतातूनच निर्यात केला जातो. इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, मेक्सिको, ब्राझील या देशांतही आंबा पिकतो, पण आंब्याचं जगात सर्वात जास्त उत्पादन भारतातच होतं.’’ – मामाने माहिती पुरवली.
‘‘एवढ्या सगळ्या प्रकारचे आंबे खायला मिळाले तर काय मज्जा येईल ना! सगळी सुट्टी संपून जाईल, पण आंबे मात्र संपणारच नाहीत.’’ प्रियाच्या या वाक्यावर सगळेजण खूप हसले.
‘‘अजून एक गंमत सांगतो ती ऐका. मी तुम्हाला आंब्याची बरीच गमतीशीर नावं सांगितली. त्यातला चौसा या आंब्याला त्याचं नाव कसं काय पडलं ते आता सांगतो. पंधराव्या शतकात शेरशहा सुरीने बिहारमधील चौसा इथे झालेल्या युद्धात हुमायूनचा पराभव केला होता. आणि त्याच आनंदात त्याने त्याच्या आवडीच्या आंब्याला चौसा नाव दिलं.’’
‘‘मामा, खरं तर तू आमच्या प्रोजेक्टच्या वेळी हे सगळं सांगायला हवं होतं म्हणजे आमचाच प्रोजेक्ट फर्स्ट आला असता.’’ जान्हवी जरा खट्टू होत म्हणाली.
गप्पांमध्ये आंब्याचा रस केव्हा काढून झाला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. मामी रसाचे भांडे घेऊन आत गेली. सगळे जण रस-पुरीची आतुरतेने वाट बघत बसले. छोट्याशा प्रियाला मात्र एक प्रश्न सतावत होता- ‘‘बाबा, आपण कच्चा आंबा म्हणजे कैरी खातो ती चवीला आंबट असते आणि ती पिकली की त्याचा आंबा झाल्यावर गोड लागतो असं का बरं?’’
‘‘ते मी तुला सांगतो,’’ मुकुल आपली हुशारी दाखवत म्हणाला, ‘‘आंबा कच्चा असताना त्यात आम्ल जास्त असतं, तर फळामधली साखर जिला आपण फ्रुक्टोज असं म्हणतो ती अतिशय कमी किंवा अजिबातच नसते. जसजसा आंबा पिकायला सुरुवात होते तसतसं हे आम्ल कमी होत जातं आणि फ्रुक्टोज बाहेरच्या उष्णतेमुळे वाढायला लागतं आणि म्हणूनच त्याचा रंग हिरव्यापासून पिवळा होतो आणि चवही गोड होते.’’
‘‘अगदी बरोबर मुकुल, झाडावरच्या कैऱ्या पिकायला सुरुवात झाली की त्या हिरव्या-हिरव्या कैऱ्या तोडून सुकलेल्या गवतात पिकायला ठेवतात. आणि मग दहा ते पंधरा दिवसांनी पिवळा धम्मक गोड गोड आंबा तयार होतो. पण आजकाल लोकांकडे वेळ कुठे आहे दहा-पंधरा दिवस थांबायला, मग आंबा लवकर पिकावा म्हणून कॅल्शियम कार्बाईड या रसायनाचा वापर करतात. त्यामुळे आंबा ३-४ दिवसांतच पिकतो, पण यामुळे या रसायनाचा काही अंश आंब्यात जातो- जो आपल्या आरोग्याला घातकसुद्धा ठरू शकतो.’’ मामा मुलांना माहिती सांगत असतानाच आतून मामीचा आवाज आला, ‘‘बरं चला आता, पानं मांडली आहेत. लवकर या, पुऱ्या गार होतील. सगळे जण स्वयंपाकघरात गेले. रसावर मनसोक्त ताव मारला. पोट अगदी तुडुंब भरलं तरी वाटीभर रसाचा मोह मामाला आवरत नव्हता. मग मामी त्याला दटावत म्हणाली, ‘‘आंबा कितीही चांगला लागला तरी हे एक उष्ण प्रवृत्तीचं फळ आहे. म्हणून खूप जास्त प्रमाणात आंबा खाल्ला की त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे आता पुरे झाला रस.’’ मामीच्या या दटावणीवर सारे खळखळून हसू लागले.
bakresnehal@gmail.com