रामदास भटकळ – ramdasbhatkal@gmail.com

मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपली अत्यंत यशस्वी नाममुद्रा कोरणारे चतुरस्र नाटककार आणि साहित्यिक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांस येत्या २० मार्च रोजी प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ते त्यांच्या निकटच्या सुहृदाने चितारलेले त्यांचे व्यक्तिचित्र..

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

वसंतरावांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू होत आहे हे खरेच वाटत नाही. ते ९९, तर मग मी किती वर्षांचा, असा मला प्रश्न पडतो. त्यांच्या मनाचा मोठेपणा हा की आमच्या वयांतील तेरा वर्षांचे अंतर विसरून त्यांनी मला आपले मानले होते. ते आमच्याकडे यायला लागले तेव्हा मी सतरा वर्षांचा विद्यार्थीच होतो; आणि ते एक प्राध्यापक. पॉप्युलरच्या मराठी प्रकाशनाचे काम पाहण्याची मुभा मला वडिलांकडून मिळाली असली तरी मी ती घरूनच सांभाळत होतो. पॉप्युलरने तोवर दोनच मराठी पुस्तके प्रसिद्ध केली होती. दोन्ही कथासंग्रह होते. त्याआधारे ते आपल्या कथांची कात्रणे घेऊन आले होते. गंगाधर गाडगीळ-अरिवद गोखले यांच्या तुलनेत कथाकार म्हणून वसंत कानेटकर बसू शकत नाहीत हे मला जाणवत होते. किंबहुना, तोपर्यंत त्यांची ‘घर’ ही अप्रतिम कादंबरी प्रसिद्ध झाली होती, त्यामानानेदेखील त्यांचे कथालेखन सामान्य वाटते, हे मत अध्र्या हळकुंडाने पिवळ्याच नव्हे, तर सोनेरी झालेल्या मी त्यांना कसे सांगितले, आठवत नाही. पण ते आमच्या नात्याच्या आड आले नाही.

त्या पहिल्या दिवसापासून माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे वसंतराव कविहृदयाचे असावेत. नेहमी आपल्याच तंद्रीत असायचे. त्यांना काही सुचून खुणावत असले की त्यांना दुसरे काही दिसत नसे. आमच्या घरात अनेक ज्येष्ठ मंडळी असायची. माझे वडील तर पॉप्युलरचे संस्थापक. माझा थोरला भाऊ वसंतरावांच्या वयाचा आणि त्यांच्यासारखाच शिकलेला. पण एकदा त्यांनी श्रोता म्हणून माझी निवड केली की त्यांना तेच पुरत असे. बहुधा ते मुंबईला यायचे त्यांच्या सोसायटीच्या सभांसाठी. ते गोखले एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद होते. आजीव सभासद हे एका अर्थी मालक आणि म्हटले तर बांधील सेवक. सभांच्या कामात प्रत्येक सभासदाला थोडेफार लक्ष घालावेच लागायचे. पण त्यावर उतारा म्हणून माझ्याशी गप्पा असाव्यात. नाही तर अभ्यासाशी झगडणारा मी त्यांच्याशी काय चर्चा करणार?

ते त्यावेळी सात्र्च्या एका कादंबरीने झपाटलेले होते. ‘दी चिप्स आर डाऊन’ ही काही सात्र्ची महत्त्वाची कादंबरी मानली जात नाही. पण त्यांना त्यात काही सापडले होते. पुढील काळात त्यांनी कदाचित या विषयावर कथा किंवा नाटक बेतले असते. त्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी तिचे भाषांतर केले. नाव दिले ‘तेथे चल राणी.’ सात्र्च्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानावर अनायासे माझे बौद्धिक होत असे. अजिबात न समजणाऱ्या गोष्टी समजल्यासारख्या ऐकण्याची प्रकाशकाला आवश्यक अशी सवय तेव्हापासून मला लागली असणार. ‘तेथे चल राणी’ निश्चितच वाचनीय झाली होती. मी ‘घर’वर खूश होतो; तेव्हा ही कादंबरी छापण्याचा थोडा मोह झाला असता, पण मूळ लेखकाची परवानगी मिळवणे सोपे नव्हते. तेव्हा प्रकाशनाचा तोही प्रस्ताव नाकारावा लागला. तरीही आमचे संबंध सुधारत गेले.

वसंतरावांच्या दोन कादंबऱ्या आम्ही प्रसिद्ध केल्या. मी नवखा होतो. प्रत्येक पुस्तकाबरोबर शिकत होतो. शिकतानाचे माझे अनुभव वसंतरावांना सांगत असे. तेही माझ्यासारखे धडपडले होते.. अभ्यासात, जीवनात आणि लेखनातही! हे सारे हळूहळू ते मला सांगत गेले. आमच्यातले काहीसे साम्य त्यांना भावले असणार. नाही तरी आपल्या मनीचे गूज सांगायला प्रत्येक जण कोणाची तरी निवड करत असतो. वसंतरावांनी मला निवडले. नंतरच्या काळात आमच्या नात्यात चढउतार आले तरी त्यांना कान देण्याचे काम सातत्याने मीच करत आलो. पुढील काळात त्यांना काही सांगावेसे वाटले की नाशिकला त्यांच्या शिवाई बंगल्याच्या वरच्या खोलीत आम्ही बठक मारत बसू. बाटली उघडली की मन उघडणे त्यांना सोपे जायचे. हे नाटक त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठीच असायचे. आमच्या शेवटच्या भेटीत मी त्यांना म्हणालोदेखील की, ‘‘वसंतराव, मी तुमचे चरित्रच नव्हे, तर आत्मचरित्रही लिहू शकेन.’’

त्यांचे इतर काही विशेष मला तेव्हाच जाणवले. त्यांचे वडील गिरीश स्वत: नावाजलेले कवी आणि शिक्षक. वसंतरावांच्या प्रतिभेची जातकुळी अगदी वेगळी. त्यांचा मोठा भाऊ मधुसूदन हा संगीतकार. तोही प्रतिभावान, पण अन्य क्षेत्रात. वसंतरावांना याच नव्हे तर आपल्या इतरही नातेलगांबद्दल जिव्हाळा असायचा; पण त्यांच्यात फार न गुंतता. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या काही ज्येष्ठांबद्दलही. त्यांच्यामुळे मी कुसुमाग्रज, मामा पाटणकर, अशोक टिळक, प्रा. आचार्य अशा नाशिककरांशी जवळीक वाढवू शकलो.

‘पंख’ आणि ‘पोरका’ या कादंबऱ्या पॉप्युलरने प्रसिद्ध केल्या. त्याबद्दल मी समाधानी नव्हतो; आणि खरे तर तेही. तरी त्यांचा आत्मविश्वास व माझा त्यांच्या सृजनशक्तीवरील विश्वास शाबूत होता. ते जेव्हा ‘औरंगजेब’ या त्यांच्याच कथेतील एका व्यक्तिरेखेने झपाटले गेले तेव्हा आमच्यातील अर्थपूर्ण साहचर्याला खरी सुरुवात झाली. पुढे जे नाटक ‘वेडय़ाचं घर उन्हात’ म्हणून गाजले, त्या नाटकाने त्यांना खूप प्रसववेदना दिल्या. त्यांचे ते पहिलेच नाटक होते. नाशिकात त्यांच्या पत्नीशी, पुण्यात भालबा केळकर यांच्याशी ते चर्चा करायचे, तसे मुंबईत माझ्याशी.

आता मुंबईला येण्यासाठी त्यांना सोसायटी सभांचे निमित्त लागत नसे. मी त्या दोन-तीन वर्षांत बरेच काही शिकलो होतो. नाटके पाहत होतो. मामा पेंडसे, चिंतामणराव कोल्हटकर यांच्या शिष्यवत संपर्कात होतो. अल्काझी आणि थिएटर युनिटची नाटके पाहून आणि त्यानिमित्ताने वाचन करून खूप काही सुचवू शकत होतो. बिचारे वसंतराव माझ्या आणि पुण्यातील भालबांच्या भडिमारापुढे अनेक खर्डे करत. ते सगळे उपलब्ध असते तर सृजनप्रक्रियेचा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता. हे नाटक पुण्यात प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने बसवले आणि अत्यंत यशस्वी झाले.

आता त्यांच्यातील नाटककाराचा दुसरा एक गुण लक्षात आला. त्यांना दर वेळी नवे आव्हान लागायचे. विषय वेगळा, आविष्कार पद्धती वेगळी. ‘देवांचं मनोराज्य’च्या कथावस्तूचा वा ती मांडण्याच्या पद्धतीचा पहिल्या नाटकाशी संबंध नव्हता. वास्तव आणि काल्पनिक या दोहोंचा खेळ करत ते विश्वनिर्मितीसंबंधी गंभीर विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या नाटकाला अनपेक्षित यश मिळाले, तर दुसऱ्याने आपटी खाल्ली. तरी नाउमेद न होता त्यांनी नवीन वाटांचा शोध चालू ठेवला. ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ ही निखळ सुखात्मिका होती. ती यशस्वीही झाली. नाटककार म्हणून वसंत कानेटकर हे नाव रुजले.

या सुमारास मी लग्न केले- ते ज्या पद्धतीने याबद्दल वसंतरावांना कौतुक वाटले. यातही त्यांना स्वत:च्या अनुभवाचे पडसाद ऐकू आले. एकदा तर आम्ही चौघे महाबळेश्वरला आठ दिवस एकत्र हॉटेलात राहून आलो. त्यानंतर आम्ही एकमेकांशी अधिक मोकळे होत गेलो.

यानंतरचा टप्पा त्यांच्या लेखनात सर्वात महत्त्वाचा ठरला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक श्रेष्ठ दर्जाचे असल्याचे बहुतेकांनी मान्य केले. पन्नास वष्रे या नाटकाचे प्रयोग सातत्याने होत आहेत. या पुस्तकाचे बारूपही सर्वानी अनुकरणीय मानले. लेखकाला मानसन्मान मिळू लागले. निरनिराळ्या क्षेत्रांतील मोठी माणसे त्यांच्यापुढे लीन होऊ लागली आणि वसंतरावांना आपला जीवनक्रम बदलता आला. बदलली नाही एक महत्त्वाची गोष्ट : नवनवीन विषयांचा  शोध घेणे, झपाटले जाणे आणि त्यासाठी आगळ्या आविष्कार पद्धतींची निवड!

‘रायगड’ हे त्यांचे चौथे नाटक. त्यांनी ४० नाटके लिहिली. शिवाय ११ विनोदी नाटिका. प्रत्येक नाटक नवीन विषयावर. त्यात संगीत नाटकेही होती. ‘मत्स्यगंधा’ने तर नवीन आदर्श निर्माण केला. ‘लेकुरें उदंड जालीं’त वेगळ्या प्रकारचे संगीत, तर ‘कधीतरी कोठेतरी’ हे रेश्मा या लोकप्रिय गायिकेवर बेतलेले. त्यांच्या नाटकांपकी निदान दहा नाटके मराठीतील त्या, त्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट नाटकांपकी मानली जाणारी. या नाटकांत मेलोड्रामा, सुखात्मिका, ऐतिहासिक, पौराणिक, प्रायोगिक ही सर्व आली. त्यांना थोर व्यक्तींचे भारी आकर्षण. ‘हिमालयाची सावली’ हे महर्षी कर्वे यांचे उत्तम व्यक्तिचित्र उभे करणारे नाटक श्रीराम लागू यांच्या भूमिकेमुळे इतरांना कठीण आव्हान उभे करणारे होते. ‘विषवृक्षाची छाया’मध्ये दोन श्रेष्ठ व्यक्तींना जोडण्याचा प्रयत्न होता, तर ‘वादळ माणसाळतंय’मध्ये त्यांनी बाबा आमटे साकार केले होते. मीराबाई, बालकवी अशी एकेक आव्हाने त्यांनी आपणहून स्वीकारली. दर वेळी झेपलीच असे नाही. शेक्सपीयरशी प्रत्येक सृजनशील कलावंताला झटापट करावीशी वाटतेच. त्यांच्या चार शोकांतिकांतील नायकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हे न झेपलेले एक आव्हान. तत्त्वज्ञान हे जसे उत्तरे मिळवण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करण्यासाठी असते, तसेच सृजनात्मक कृती ही आव्हान स्वीकारण्यामुळे श्रेष्ठ ठरते. यशापयशाबद्दल मतांतरे असणारच.

मी नाशिकला गेलो की त्यांच्या घरीच राहू लागलो. कॉलेज परिसरातील त्यांचे घर छोटे होते. त्यांना दोन छोटी मुले होती. तिथून स्टेशनवर जायचे तर कॉलेजचा टांगा सांगून ठेवावा लागत असे. पण मी नाशिकला जातच असे मुळी वसंतरावांना भेटायला. शिरवाडकर आणि त्यांची प्रभावळ नंतर आली माझ्या आयुष्यात. काही वर्षांनी वसंतरावांनी ‘शिवाई’ बंगला बांधला. त्यात त्यांची लिहिण्याची खोली वेगळी होती. ते खाली बसूनच लिहायचे. त्यासाठी त्यांनी एक डेस्क बनवून घेतला होता. मुंबईत मी पाल्र्याला काही दिवस होतो. ते घर त्यांना लांब पडायचे. मी शिवाजी पार्कला राहायला लागलो तेव्हा ते आमच्याकडे उतरायचे. मुंबईत ते संकोचल्यासारखे वागायचे. घरातच त्यांचा वावर- तेव्हा काही गमतीच्या गोष्टी मी पाहिल्या. ते दाढी घोटून करायचे आणि तेही मनापासून रंगून. स्वत:चा गोंडस चेहरा आरशात पाहायला त्यांना आवडायचे. पाहण्यासारखाच होता तो. ते फार आधी नट होण्याच्या तयारीने मुंबईत आले होते म्हणे, उगाच नाही!

त्यांना चांगले दिवस आल्यावर त्यांनी गाडी घेतली. स्वत: ते चालवत. पण गाडी चालवण्यापेक्षा तिची निगा राखणे, वेळप्रसंगी मॅकॅनिकची कामे शिकणे यात त्यांना अधिक रस असे. निरनिराळी कामे शिकण्याची त्यांना आवड होती. ते स्वयंपाक करायचे, तसे मधूनच हार्मोनियम काढून जुन्या नाटकांतील आवडती पदे वाजवत बसायचे. ते बाजा चांगला वाजवत.  सगळे अनुभव गाठीशी असावेत या नादात ते एनसीसीत शिक्षक म्हणून सामील झाले. बेळगावला जाऊन प्रशिक्षित झाले आणि लेफ्टनंट किंवा असेच काहीतरी होते. प्रशिक्षणात बेयोनेट डमीत खुपसण्याची सवय करावी लागायची, या आठवणीने ते अस्वस्थ व्हायचे. कधीतरी त्यांनी यातून सुटका करून घेतली.

बंगल्यावर त्यांनी एक आल्सेशियन कुत्रा पाळला होता. मला कुत्र्याची भीती. पण त्यांचा हा मित्र त्यांनी एकदा हे आपुले पाहुणे आाहेत असे सांगितले की आमच्या वाटेला येत नसे. एकदा कुत्रा भुंकायला लागला. बाहेर एक पायजमा, सदरा घालणारा माणूस उभा होता. वसंतराव त्याला तांदूळ विकायला आलेला शेतकरी समजून घालवून देणार इतक्यात तो म्हणाला, ‘‘मी शेतकरीच आहे, पण आलो आहे माझ्या कविता ऐकवायला. मी ना. धों. महानोर.’’

त्यांची नाटके चालू लागली तसा त्यांनी सोसायटीच्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा दिला. फक्त लेखनावर जगण्याचा निर्णय घेतला. मला याचे कौतुक होते. तरी वसंतराव व्यावसायिक नाटककार झाले याचे काही दुष्परिणामही झाले. बालगंधर्व जसे प्रेक्षकांना मायबाप मानत, तसे वसंतराव रसिक प्रेक्षकांचा कौल मानू लागले. मधल्या काळात त्यांची बहुतेक नाटके चालू लागली तसे हे प्रेम बळावत गेले. निदान काही वेळा नाटकाची गुणवत्ता आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद व्यस्त प्रमाणात असतो हे त्यांच्या लक्षात यायला हरकत नव्हती. पूर्वी मी मोकळेपणाने त्यांना माझे मत सांगू शकत होतो. त्यांच्यापुढे निर्मात्यांची  रांग लागू लागली आणि याचा त्यांच्यावर परिणाम होणे साहजिकच होते. त्यांनी व्ही. शांताराम यांच्यासाठी चित्रपट लिहिला. मोठय़ा उत्साहाने ते ट्रायल शोला मला घेऊन गेले. त्यांच्या स्क्रिप्टचे पुस्तक कसे थाटात करावे ते आम्ही दोघेही ठरवत होतो. चित्रपट सर्वार्थाने निराशाजनक होता. मी खोटेपणाने भाटगिरी करणे शक्य नव्हते. मी स्टुम्डिओत गप्पच राहिलो. मग त्यांना मात्र मोकळेपणाने सांगितले.

त्यांना निर्मात्यांबरोबर प्रकाशकही प्रलोभने दाखवू लागले. प्रत्येकाची वागण्याची निराळी तऱ्हा. माझा मोकळेपणा आता वसंतरावांना रुचेना. इतरांचे वागणे त्यांना पटायला लागले. त्यांच्या लेखनावरही काही निर्माते, नटमंडळी यांचा प्रभाव पडू लागला. त्यांच्या लेखनस्वातंत्र्याचे महत्त्व त्यांच्यापेक्षाही मला वाटायचे. ‘आता त्यांना स्वत:चे लिहू द्या’ असा लेखही मी प्रसिद्ध केला. आम्ही एकमेकांवर नाराज असायचो. हळूहळू आमचे भेटणे कमी झाले. त्यांची नवीन पुस्तके इतर प्रकाशकांकडे जाऊ लागली. आमचा संबंध इतका घनिष्ठ होता की परक्यांनासुद्धा आमच्यातील दुराव्याचा त्रास व्हायचा. तरी आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा आटणे शक्यच नव्हते. कधीतरी काळ बदलला. हळूहळू सारे पूर्ववत होऊ लागले. त्यांची नवीन नाटके पुन्हा पॉप्युलरकडे येऊ लागली. नाटके अंत:प्रेरणेने लिहिली जाऊ लागली.

त्यांचा शेवटचा आजार त्रासदायक होता. मुंबईला उपचारांसाठी आले की आमची भेट व्हायची. डॉक्टरांवर त्यांची श्रद्धा होती. पण सारे काही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे होत नसते. ते शेवटी नाशिकला गेले. अखेर जवळ आली हे त्यांनाही समजत होते. उपचार नसले तरी त्यांना आराम मिळावा म्हणून एका नìसग होममध्ये नेण्यात आले होते. मी भेटायला गेलो तेव्हा आम्ही दोघेच होतो. जणू सारे सुरळीत चालणार असे आम्ही बोलत बसलो. बहुधा त्यानंतर कोणी त्यांना भेटले नसावे.