केरळमधील दोन मासेमारांची हत्या करणाऱ्या दोन इटालियन खलाशांच्या प्रकरणावरून सोमवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर शरसंधान साधल़े  मासेमारांची हत्या केल्यानंतर या खलाशांना मायदेशी परत जाण्यासाठी कोणी साहाय्य केले हे स्पष्ट करावे, अशी मागणीही मोदी यांनी केली.
येथील भाजपच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी यांनी खलाशांचा प्रश्न लावून धरला़  या खलाशांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, या सर्व गोष्टींबद्दल देशाची जनता अंधारात आह़े  त्यांना ही माहिती हवी आहे, असेही मोदी म्हणाल़े  देशाच्या सीमेतील समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन निष्पाप मासेमारांची या इटालियन खलाशांनी हत्या केली़  त्यांचे खुनी भारताच्या तुरुंगात असायला हवे होते, परंतु त्यांना इटलीला माघारी धाडण्यात आल़े  यामागे कोणाची शक्ती होती? त्यांना भारतात आणू नये असे म्हणून कोण प्रयत्न करीत आहे, असे संशयाची सुई सोनियांकडे नेणारे प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केल़े  
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्या खलाशांना भारतात आणण्यात आले होते, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली़  तसेच या खलाशांना भारतातील इटालियन वकिलातीत ठेवण्यात आल्याचा संदर्भ देत, मोदी यांनी उपरोधाने खलाशांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगाचा पत्ता विचारला़  ते खलाशी केवळ इटालियन होते म्हणून त्यांना वेगळी वागणूक देणे खपवून घेतले जाणार नाही, असेही मोदी म्हणाल़े
देशाच्या राजधानीत ईशान्य भारतीय नागरिकांना मिळणारी सापत्न वागणूक किंवा देशाच्या सीमेवर पाकिस्तान्यांकडून मारले जाणारे सैनिक या कशाकशाचीच काँग्रेसला मुळीच पर्वा नसल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला़  १०० कोटी भारतीयांना सोनियांकडून देशभक्ती शिकण्याची आवश्यकता नसल्याचा टोलाही लगावला़