मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी संयुक्त जनता दलाला लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोनच जागांवर विजय मिळवता आल्याने बिहारमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील भाजपनेते सी. पी. ठाकूर यांनी शुक्रवारी तसे संकेत दिले. संयुक्त जनता दलाचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
बिहारमध्ये भाजपने ४० पैकी २३ जागांवर विजयपताका फडकवली आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना ठाकूर यांनी बिहारमधील सत्तापालटाचे संकेत दिले. मात्र, बिहार विधानसभा बरखास्त करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नसून सत्ताधारी आमदारांच्या नाराजीतूनच हे सरकार अल्पावधीतच कोसळेल असे भाकीत ठाकूर यांनी केले. संयुक्त जनता दलाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. लोकशाही संकेतांविरोधात जाऊन आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाही, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. बिहारच्या जनतेने केंद्रात मोदींच्या पंतप्रधानपदासाठी जनादेश दिला आहे. राज्यातही त्याचे प्रतिबिंब उमटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.