भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे विधान करणारे भाजपचे बिहारमधील नेते गिरिराज सिंग यांच्यावर देवघर जिल्ह्य़ात मोहनपूर येथे प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. त्यांचे विधान मुस्लिमांना उद्देशून होते. भाजपने गिरिराज सिंग यांच्यावर ताशेरे ओढले असले, तरी गिरिराज सिंग यांना पश्चात्ताप झालेला नाही ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. काँग्रेस व जनता दल संयुक्तने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. भाजपने गिरिराज किशोर यांच्या विधानापासून दूर राहणे पसंत केले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी भाजपचा न्याय व मानवता या तत्त्वांवर विश्वास असल्याचे सांगितले. गिरिराज हे नावडा येथील लोकसभा उमेदवार असून त्यांना असे वाद न निर्माण करण्यास सांगितले आहे. झारखंड येथे त्यांनी असे सांगितले होते, की ज्यांना मोदी यांना विरोध करायचा असेल त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. त्यांचे वक्तव्य मुस्लिमांना उद्देशून होते अशी टीका विरोधी पक्षांनी केली. भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी गिरिराज यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगितले. भाजपच्या प्रवक्तया निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या विधानाला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे सांगून मोदींनी त्यावर ट्वीटरद्वारे मत व्यक्त केल्याचे सांगितले. भाजपच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट शब्दात गिरीराज सिंह यांना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचा प्रचार विकासाच्या मुद्दय़ाभोवती सुरू असताना, अकारण विरोधकांना मुद्दा मिळाल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसने या वक्तव्याची खिल्ली उडवताना लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि मायावती या नेत्यांना पाकिस्तानमध्ये पाठवले जाईल काय, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते मीम अफझल यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पाटणा येथे गिरिराज यांनी त्याच विधानाची पुनरुक्ती करीत जे कुणी मोदींना सत्तेवर येण्यापासून रोखू पाहत असतील, त्यांना भारतात स्थान नाही त्यांनी पाकिस्तानात जावे असे सांगितले.गिरीराज, गडकरींविरोधात एफआयआररांची : भाजप नेते गिरीराज सिंह आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यांबद्दल एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या दोघांबरोबरच भाजपचे गोड्डा येथील उमेदवार निशिकांत दुबे यांच्या विरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. व्यासपीठावर असलेल्या सर्वाना अटक करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.