मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस प्रवक्ते के. के. मिश्रा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा येथील सत्र न्यायालयात दाखल केला आहे.मिश्रा यांनी चौहान यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाशी निगडित विविध जागांच्या भरतीप्रकरणी घोटाळ्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये युतीबाबत काँग्रेस श्रेष्ठी ठरवणार -आझाद
श्रीनगर:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. कुणाशी युती करावी हे मी सांगणार नाही असे सांगत याबाबत संदिग्धता ठेवली.आझाद यांनी गेल्या आठवडय़ात पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांची भेट घेतली होती. मात्र निवडणुकीत युतीबाबत चर्चा झाली नसल्याचा दावा आझाद यांनी केला.  गेली सहा वर्षे राज्यात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचे सरकार आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी वारंवार भेटतो त्यात काही गैर नाही. वैयक्तिक संबंध वेगळे असतात असे सांगत या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असे सांगितले.
‘केरळच्या मुख्य सचिवांची सीबीआय चौकशी करा’
थिरुवनंतपुरम:केरळमधील सनदी अधिकाऱ्यांमध्ये असलेले तीव्र मतभेद मंगळवारी विधानसभेतच उघड झाले. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव ई. के. भारत भूषण यांनी आपली मालमत्ता दडवून ठेवल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र हे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी मागणी फेटाळून लावली.राज्याच्या मुख्य सचिवांनी आपल्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता दडवून ठेवल्याचा आरोप अच्युतानंदन यांनी केला. मात्र त्यामध्ये हस्तक्षेप करताना चंडी यांनी स्पष्ट केले की, ज्या अधिकाऱ्याने कोणतीही चूक केलेली नाही त्याचे खच्चीकरण करण्याचे सरकारचे धोरण नाही.अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होईल, असे कोणतेही पाऊल उचलण्याची सरकार परवानगी देणार नाही, जे अधिकारी उत्तम काम करतात त्यांना संरक्षण देणे हीच सरकारची भूमिका आहे, असे नमूद करून चंडी यांनी भूषण यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप फेटाळले.
‘उत्तर प्रदेश सरकारची सूडबुद्धीने कारवाई’
लखनौ: उत्तर प्रदेश सरकार भाजप कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असून, राजकीय हेतूने प्रेरित गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते विजय बहादूर पाठक यांनी केला. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पुतळ्याचे दहन केले म्हणून भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई का केली गेली नाही, असा सवाल त्यांनी केला.
गुजरात : पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण
गांधीनगर:राज्य पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण ठेवण्याची घोषणा गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी केली.समाजात महिलांच्या जीवनमानाचा स्तर उंचावला जावा यासाठी महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असल्याचे पटेल म्हणाल्या.
देशात गुजरातमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी आहे,  गेल्या १० वर्षांत गुजरातमध्ये कोणताही मोठा जातीय संघर्ष झालेला नाही, त्यामुळेच आपण विकास करू शकलो, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.
सिक्कीम : एसडीएफ सरकारचा २०वा अर्थसंकल्प सादर
गंगटोक:सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी  राज्याचा सहा हजार ६६६.७१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. चामलिंग सिक्कीममधील एसडीएफ सरकारचे नेतृत्व गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून करीत असून या सरकारचा हा २०वा अर्थसंकल्प आहे.अर्थसंकल्प केवळ चार लाख रुपये तुटीचा असून ही तूट कर्ज आणि सार्वजनिक लेख्यांमधून भरून काढण्यात येईल. जुने प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नवे प्रकल्प हाती घेण्यात येणार नाहीत, असेही चामलिंग यांनी स्पष्ट केले.