डहाणू: रविवार पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिरातून दिव्याची ज्योत घेऊन जाण्यासाठी देवीभक्तांची रीघ लागली आहे. विवळवेढे येथील गडावर आणि पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून घटस्थापणेसाठी दिव्याची ज्योत घेऊन आपल्या गावात घटस्थापना करण्यासाठी नेली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या एक ते दोन दिवस आधी मंडळाचे कार्यकर्ते सप्तशृंगी, तुळजापूरची महालक्ष्मी अश्या मंदिरातून घटस्थापणे साठी ज्योत घेऊन जातात. अलीकडे साधारण २० वर्षांपासून महालक्ष्मी मंदिरातून ज्योत घेऊन जाण्याची प्रथा सुरू झाली आहे. वर्षागणिक ज्योत घेऊन जाणाऱ्या मंडळांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत असून यंदा साधारण २५ ते ३० देवीभक्त मंडळ मंदिरातून ज्योत घेऊन जाण्यासाठी दाखल झाले होते.

हेही वाचा… डहाणू : चारोटी येथे माकपचे विविध मागण्या घेऊन रस्ता रोको आंदोलन; हजारोंच्या संख्येने आंदोलनाला गर्दी

त्रंबकेश्र्वर, हरसूल, पेठ, नाशिक, इगतपुरी, संगमनेर अश्या साधारण १२० ते २५० किलोमीटर पासून देवीभक्त मोठ्या संख्येने मंदिरात येतात. मंदिरापर्यंत वाहनाने येऊन देवीची विधिवत पूजा, आवाहन करून दिव्याची ज्योत (मशाल) वाजत गाजत अनवाणी पायाने चालत आपल्या गावात नेली जाते. यासाठी मंडळातील लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही सहभागी झाल्याचे दिसून आले. देवीची ज्योत घेऊन गेल्यावर विधिवत घटस्थापना करून नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवली जात असल्याची माहिती देवीभक्तांकडून देण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक वर्षांपासून घटस्थापना साठी सप्तशृंगी, तुळजाभवानी, डहाणूची महालक्ष्मी मंदिरातून दिव्याची अखंड ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे. आम्ही संगमनेर वरून साधारण 240 किलोमीटर लांब महालक्ष्मी देवीच्या गडावरील आणि पायथ्याशी असलेल्या मंदिरातून अखंड ज्योत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. महालक्ष्मी मंदिरातून घेतलेली ज्योत अखंड ठेवत आमच्या गावात नेऊन घटस्थापना करणार आहोत. – मच्छिंद्र हसे, देवीभक्त संगमनेर