शिकारी, स्थलांतरित आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट मुंबई, नागपूर: ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार शिकारी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरित आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात गरुड आणि गिधाडांच्या संख्येत घट झाली असून, मोरांच्या संख्येत नाटय़मयरीत्या वाढ झाली आहे. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. यामध्ये देशभरातील सुमारे ८६७ पक्ष्यांच्या सद्य:स्थितीचा मागोवा घेण्यात आला. गेल्या २५ वर्षांतील निरीक्षणांचा यामध्ये समावेश आहे. ‘ई-बर्ड’ या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल गांधीनगर येथे स्थलांतरित पक्षी परिषदेत सोमवारी प्रकाशित करण्यात आला. शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि अधिवासनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. तसेच कीटकभक्षी पक्ष्यांची संख्या कमी होणे हेदेखील धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याचबरोबर १२६ प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण स्थिर अथवा वाढत असल्याचे यामध्ये आढळून आले. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे दिसून येते ही धोक्याची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून आलेल्या या निष्कर्षांमुळे संवर्धनासाठी पुढील काळात ठोस धोरण राबवता येईल. ‘पक्ष्यांच्या संवर्धनासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये यापूर्वी अनेकदा वस्तुनिष्ठ माहितीचा अभाव असायचा, पण या नव्या विश्वसनीय माहितीमुळे योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल,’ असे वाईल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. धनंजय मोहन यांनी सांगितले. तसेच अहवालातून सामान्य पक्ष्यांची संख्या कमालीची घटताना दिसत असल्याबद्दल ‘सॅकॉन’ संस्थेचे डॉ. राजा जयपाल यांनी चिंता व्यक्त केली. या पक्ष्यांची संख्या आणखीन घटण्यापूर्वीच त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. स्थलांतरितांची संख्या दोन्ही ठिकाणी चिंताजनक आक्र्टिक, रशिया आणि सैबेरिया या प्रदेशातून देशात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण केले असता, त्यांची संख्या भारतात कमी होताना आढळते असे ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ या संस्थेचे सुहेल कादीर यांनी सांगितले. या स्थलांतरित पक्ष्यांच्या मूळ अधिवासाच्या ठिकाणी अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणानुसार तेथेदेखील या पक्ष्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. करडा टिलवा (डनलिन), सोन चिखल्या (गोल्डन प्लोवर), पाणटिवळा (गॉडविट) आणि कवडय़ा टिलवा (सॅण्डरलिंग) या प्रजातींचा यामध्ये समावेश होतो. * पक्ष्यांच्या अभ्यासासाठी २५ वर्षांच्या निरीक्षणांचा आधार घेण्यात आला आहे. * या २५ वर्षांत पक्ष्यांच्या ४८ टक्के जाती सुरक्षित आणि स्थिर असल्याचे दिसून आले. * गेल्या पाच वर्षांतील परिणामांमुळे अहवालातील १०१ पक्ष्यांच्या प्रजातींना मोठय़ा प्रमाणात संवर्धनाची गरज असल्याचे निष्पन्न झाले आहे. * चिमण्यांची संख्या स्थिर असली तरी शहरी भागातून त्यांची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या प्रजाती पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर), रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट), भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर), सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर), बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर) गेल्या २५ वर्षांत वाढ झालेल्या प्रजाती * मोर, गुलाबी मैना (रोझी स्टर्लिग), * मोर शराटी (ग्लॉसी आयबिस), * साध्या वटवटय़ा (प्लेन प्रिनिया), * राखी वटवटय़ा (अॅशी प्रिनिया).