उदय सामंत यांची माहिती

दापोली : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांकरिता ३६० कोटी रूपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

दापोलीतील उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोकण आयुक्त यांनी शासनाकडे तीन जिल्ह्य़ातील नुकसान भरपाईसाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी चर्चेअंती ती मागणी मान्य केली असून तो निधी तातडीने उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ते म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्य़ात ९३ टक्के पंचनामे पूर्ण झालेले असून मदतीचे वाटपही सुरू आहे. जिल्’ामध्ये ७९४ गावे बाधित झाली असून एकूण  १ हजार ७७० घरे पूर्णपणे आणि ४१ हजार ३०६ अंशत: बाधित झालेली आहे.  यात मंडणगडमध्ये ६००, दापोलीमध्ये ८९६, गुहागरमध्ये ४, रत्नगिरी तालुक्यात अकरा घरांचा समावेश आहे. तर अंशत: नुकसान झालेल्यांमध्ये मंडणगडची १४ हजार, दापोलीमधील २२ हजार, गुहागरची १ हजार ७४५ रत्नागिरी तालुक्यातील १  हजार १२० समावेश आहे.  आतापर्यंत आठ कोटी नऊ  लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आलेले आहे, अशी सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

कृषी विभागाकडे वादळग्रस्तांच्या मदतीसाठी आठ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. बागांच्या साफसफाईसाठी १९९२ ची रोजगार हमी योजना राबवण्याची मागणी आपण केली आहे. ही मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे, असे सामंत यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रासाठी स्वत: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील गांभीर्याने विचार करत असून पर्यटनाकरिता देखील लवकरच वेगळे पॅकेज जाहीर करण्यात येईल. मत्स्य उद्योगातील जाळ्यांच्या अंशत: नुकसानीपोटी चार हजार १००, पूर्णत: नुकसान झालेल्यांना ९ हजार ६०० देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून चक्रीवादळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णयही झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाबाबत बोलताना ते म्हणाले की दापोलीमध्ये कनेक्टिविटीची अडचण असल्याने ते तातडीने महाडला रवाना झाले. मात्र त्यांनी आपल्याशी या झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन मिनिटे वेळ दिला. या पथकाने दापोलीमध्ये वेळेत येऊन देखील दोन गावांच्या भेटी देखील रद्द केल्या. हे नियुक्ती जन रद्द का केले, हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.