देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ५११ पोलीस करोनाबाधित आढळले असून, सात पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १६ हजार ९१२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार २० जण, करोनामुक्त झालेले १३ हजार ७१९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७३ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १६ हजार ९१२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ८१८ अधिकारी व १५ हजार ९४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार २० पोलिसांमध्ये ३८२ अधिकारी व २ हजार ६३८ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १३ हजार ७१९ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ४२१ व १२ हजार २९८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १७३ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.