दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे. गेल्या सोमवारपासून केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, केजरीवालांच्या आंदोलनाला आता भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेची साथ मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः अरविंद केजरीवाल यांना फोन केला होता, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेल्या सरकारला संपूर्ण अधिकार असायला हवा अन्यथा लोकशाहीचा काही अर्थ राहत नाही’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

संजय राऊत म्हणाले, केजरीवालांनी सुरू केलेलं आंदोलन खूप वेगळं आहे. उद्धव ठाकरेंनी या मुद्दयावर केजरीवालांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली आहे. केजरीवालांना दिल्लीच्या जनतेने निवडून दिलंय, दिल्लीसाठी काम करण्याचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे. त्यांच्यासोबत जे काही होतंय ते लोकशाहीसाठी योग्य नाही, या मताशी उद्धव ठाकरेही सहमत आहेत असं राऊत म्हणाले.

यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केजरीवालांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय. आता यामध्ये शिवसेनेचीही भर पडली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवा, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा आणि गरीबांच्या घरी रेशन पोहोचवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी या केजरीवालांच्या मागण्या आहेत.

आंदोलनाला वाढता पाठिंबा –
केजरीवाल यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. मोदीविरोधक यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याशिवाय, सपचे अखिलेश यादव, त्रृणमूलच्या ममता बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू, माकपचे सीताराम येच्युरी, तामीळनाडूतील नवे राजकीय नेते कमलहालन, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आदींनी आपच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने मात्र ‘आप’विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.

पंतप्रधानांच्या घरी रेशनची पाकिटे –
‘आप’चे नेते आणि आमदारांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी रेशनची पाकिटे पाठवली आहेत. आता सोमवारपासून घरोघरी जाऊन ‘आप’च्या आंदोलनाची माहिती दिली जाईल आणि १० लाख स्वाक्षरींची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे ‘आप’ने जाहीर केले आहे.