एमआयडीसी चिकलठाणा परिसरात झालेल्या विविध अपघातात दोन जण ठार झाले. हे दोन्ही अपघात ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच घडल्याने मुकुंदवाडी आणि सातारा परिसरातील अलोकनगरवर शोककळा पसरली आहे.

मुकुंदवाडी परिसरात राहणारे सिताराम गोविंद सुर्यवंशी (वय ७२) हे शनिवारी रात्रपाळी करुन रविवारी सकाळी आठ वाजता सायकलवरुन घराकडे जात होते. चिकलठाणा एमआयडीसीतील डी.एम.पॉवर कंपनी समोर त्यांच्या सायकलला भरधाव जाणार्‍या वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिताराम सुर्यवंशी यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

दुसर्‍या घटनेत सातारा परिसरातील अलोकनगर येथील रहिवासी मंगलसिंग राजे जाधव (वय ३०) हे रविवारी पहाटे सिडको चौकातून चिकलठाण्याकडे दुचाकीवरुन आकाश सर्जेराव सोनवणे यांच्यासोबत जात होते. मुकुंदवाडीतील एस.टी. वर्कशॉप समोर त्यांच्या दुचाकीस भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या मंगलसिंग जाधव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या दोन्ही अपघातांची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.