करोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा करोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला असंही ते म्हणाले. गंमतीचा भाग सोडा पण आपण करोना काळ असूनही खूप चांगलं काम केलं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केला.

आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे. गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.