अजित पवार यांचा टोला

जालना : आमच्यातील काही नेत्यांवर अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि असे नेते पक्षात आले की त्यांना पवित्र करून घ्यायचे, असे भाजपचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जालना जिल्ह्य़ातील भोकरदन आणि बदनापूर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या वेळी जाहीर सभांमध्ये केली.

पवार म्हणाले, की भूलथापा मारून सत्तेवर आलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. या सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला त्याचे गांभीर्य नाही. कोल्हापूर-सांगली भागात महापूर आल्यावर तेथे भेट देण्यास मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना चार दिवसांचा वेळ लागला.

धनंजय मुंडे म्हणाले, की भाजप म्हणजे पाप धुण्याचा घाट झाला आहे. तेथे जा आणि पवित्र व्हा, अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये नसणाऱ्यांना विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आणि गुन्ह्य़ांचे आरोप करून धमकावले जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर दडपशाही करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर आपल्या भाषणात टीका केली. पीक कर्ज वाटप करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी वाढत असून मेगाभरतीची घोषणा पोकळ आश्वासन ठरले आहे. आमदार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींची भाषणे यावेळी झाली.

काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. शंकरराव राख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावरील ईडीची कारवाई ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राच्या धोरणांमुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आल्याचे ते म्हणाले.