संगमनेर येथून कसारा येथे जाणा-या बसला बारी घाटात अपघात झाला. बसमध्ये बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. संगमनेर आगाराची ही बस पुलाच्या कठड्यावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत वृत्त असे की, संगमनेर - कसारा नियमित चालणारी बस ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. घाटात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगाने जाणारी ही बस पुलाचा कठडा तोडून त्याच ठिकाणी अडकून बंद पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अकोले आगारातील बसला अपघात झाला होता. आज घडलेल्या या घटनेत ही बस कठडा तोडून दरीत कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही आणि सर्व प्रवासी बचावले.