नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना न्यायालयाने शनिवारी दिलासा दिला आहे. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तातडीने सुटका करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. एल्गार परिषदेच्या आयोजनात डॉ. तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय तपासयंत्रणेला आहे. पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) डॉ.तेलतुंबडे यांचे नाव आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार येथे झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याप्रकरणी पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी पुण्यातील विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तपास अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून डॉ. तेलतुंबडे (वय ६८) यांचे नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉ. तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे मुंबईतून अटक केली होती. शनिवारी दुपारी तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने या कारवाईवरुन पोलिसांना फटकारले. सुप्रीम कोर्टाने तेलतुंबडे यांना चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने तेलतुंबडे यांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे पुणे पोलिसांची नाचक्की झाली आहे.