राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपाध्य़क्ष जे पी नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संवाद साधताना पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत. मात्र शिवसेना आणि भाजपा एकत्र आले तरी निवडणूक मात्र वेगवेगळे लढू,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेवर टीकादेखील केली आहे. “शिवसेना सध्या खूप हवेत असून त्यांना स्वर्गाला बोटं टेकली असं वाटत आहे अशी टीका त्यांनी केली असून ते ऐकतील असं वाटत नसल्याचंही म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत युती करताना उद्धव ठाकरे, अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत आणि मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात दावे-प्रतिदावे सुरू झाले. मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द भाजपा नेत्यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे वारंवार करीत होते, तर मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिला नव्हता असं भाजपा नेते सांगत होते. त्यामुळे अखेर शिवसेनेने युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात आघाडी सरकार स्थापन केलं.
महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागा, केंद्रातून आदेश
महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. “पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे. एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा,” असं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 12:36 pm