शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून ‘एक शरद! सगळे गारद!!’ अशा मथळ्याखाली ती प्रसिद्द केली जाणार आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का? असा टोला लगावला आहे. "सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे," अशी टीकाही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. “करोनाचा सामना करत असताना आम्हाला व्हायरसचा सामना करायचा आहे. लढा व्हायरसशी आहे आहे नंबरशी नाही. सरकार सातत्याने नंबर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून ते चुकीचं आहे. टेस्टिंग आणि व्यवस्था वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात टेस्टिंगची संख्या कमी आहे. करोनाला रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पारनेरमधील राजकारणावरुन टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी, कोणत्या जगात ही मंडळी जगत आहेत हे माहिती नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन करोनाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. सरकारमध्ये विसंवाद असून महाराष्ट्राला याचा फटका बसत आहे अशी टीका केली. सामनामधून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे. दुर्दैवाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जी तत्वं पाळली, ज्या तत्वांचा विरोध केला आज त्यांचीच पाठराखण केली जात आहे”.