गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे जाहीरपणे आपल्यावर अन्याय झाला असून देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवत आहेत. यामुळेच नाराज खडसे लवकरच पक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जळगावमधील जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसेंच्या पक्षांतरासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगलं कळतं. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे”. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नसून योग्यवेळी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहारावर प्रतिक्रिया
“राज्यपालांकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण मुख्यमंत्री उद्धव यांनी ज्याप्रकारे पत्र पाठवलं आहे, ते दुर्दैवी आहे,” असं ते म्हणाले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, “शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई लढत असल्याचं सांगतो. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते”.

“मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आभाळ होते असं नाही तर त्याचा छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा,” असंही ते म्हणाले आहेत. “तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विचारला आहे.