‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे. जयभगवान गोयल यांनी लिहीलेल्या पुस्तकाला सध्या सर्व स्तरातून विरोध होतो आहे. राज्यात सत्तेत मोठा भाऊ बनलेल्या शिवसेनेनेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना, महाराष्ट्रातली जनता बोलतेय, आता छत्रपती गादीच्या वारसदारांनीही बोललंच पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपामधून राजीनामे द्यावे, अशी मागणी राऊतांनी पत्रकार परिषदेत केली.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे, सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. आता या वादात नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. मराठ्यांनी काय करावं हे पवारांच्या कुत्र्याने सांगू नये अशा शब्दांत, निलेश राणेंनी राऊतांवर टीका केली आहे.

ज्यावेळी मराठ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यावेळी राऊतांनी आगीत तेल ओतायचं काम केलंय. यांना मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत अशा शब्दांत निलेश राणेंनी राऊतांना आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलं. त्यामुळे शिवसेनेकडून राऊतांच्या या टीकेला काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.