कोल्हापूर : “खालच्या पातळीवर जाऊन दुषणे देण्याची पद्धत बंद केली पाहिजे. यातूनच बिघडलेली राजकीय संस्कृती नीट करण्याची वेळ आली आहे,” असा समजुतदारपणाचा सल्ला देतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘अन्यथा त्याचा काहीही शेवट होऊ शकतो. कोणी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. कोणी कोणाला घाबरत नाही,” अशा शब्दात पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना उत्तर दिलं.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्‍यांकडून काहीही प्रतिक्रिया उमटू शकतात, असा इशारा दिला होता. त्याला लगेचच चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. पाटील म्हणाले, “आपण वादग्रस्त विधान करणार नाही, असं हसन मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. पण आज ते पुन्हा वेगळे बोलले आहेत. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही.”

“गोपीचंद पडळकर यांनी चुकीचे विधान केल्यानंतर पक्षाने त्यांना तात्काळ समज दिली होती. त्यांनी ती मान्यही केली होती. असे असताना पुन्हा शेरेबाजी सुरू करणे चुकीचे आहे, असं सांगत पाटील म्हणाले, “याची सुरुवात कोणी केली, याच्या खोलात गेले तर आणखी कलगीतुरा होऊ शकतो. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशा पद्धतीची विधाने आणि राजकारण बसणारे नाही. त्यामुळे एकदाचा हा विषय संपला पाहिजे. अन्यथा हा विषय कोठेपर्यंत ही कुठेही भरकटू शकतो,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.