एकीकडे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाघावरून सुरू असलेला कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील या सुंदोपसुंदीमध्ये उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाघासंदर्भातल्या केलेल्या विधानावरून निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो”, असं निलेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे बुधवारी पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या ‘वाघ’ प्रकरणावरून आता दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

..तर वाघांची किंमत संपली असती!

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर निलेश राणेंनी ट्वीटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरी पण स्वत:ला वाघ समजतात. बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो. स्वत:ला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

nilesh rane tweet
निलेश राणे यांचं ट्वीट

“वाघाशी कधी मैत्री होत नाही फार. वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांना कुणाकुणाशी मैत्री करायची आहे, त्याची यादी त्यांनी पाठवून द्यावी, त्यावर आपण काम करू”, असा टोमणा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देताना मारला होता.

“मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”

…तर सामनात माझ्यावर आठवड्याला एक अग्रलेख नसता!

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.