'कात्रजचा घाट दाखवणे' ही म्हण महाराष्ट्रात नेहमी ऐकायला मिळते. विशेषतः राज्याच्या राजकारणात या म्हणीचा प्रत्यय यावा अशा घटना अनेक वेळा घडल्या. घडतात. पण, ही म्हण आली कोठून असा प्रश्न अनेकांना पडतो. या मागेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. पुण्यात आलेल्या शाहिस्तेखानला अद्दल घडवण्यावण्यासाठी शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला. त्यावेळी घडलेल्या घटनेतूनच 'कात्रजचा घाट दाखवणे' म्हणीचा जन्म झाला. त्याचा हा किस्सा. या म्हणीमागे इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा. अबू तालिब नावाचं एक पात्र इतिहासात सापडतं. या माणसाचं परिचयातल नावं म्हणजे शाहिस्तेखान. औरंगजेबाचा मामा म्हणजे शाहिस्तेखान. शाहिस्तेखान मोठा सरदार होता. बंगालचा सुभेदार असलेल्या शाहिस्तेखानाला समोरासमोर हरवणं म्हणजे साधं नव्हतं. प्रचंड सैनिक हाताशी असलेला शाहिस्तेखान छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी आला होता. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून आपल्या लवाजम्यासहित पुण्यात मुक्काम ठोकला. पुण्यात तळ ठोकलेला शाहिस्तेखान काही केल्या हलायला तयार नव्हता. दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा सिंहगडावर मुक्कामी होते. लालमहालात राहणाऱ्या शाहिस्तेखानाला समोर जाऊन हरवणं अशक्य होतं. मग छत्रपती शिवाजी महाजांनी एक शक्कल लढवली. योजना महाराजांचा गनिमी काव्याचाच भाग होती. आणखी वाचा - शिवजयंती विशेष : महाराष्ट्राच्या शिवप्रेमी मुस्लीम मुख्यमंत्र्यांनं घेतलेले ऐतिहासिक निर्णय तर लालमहालात राहणाऱ्या शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी लग्नाच्या वरातीचा आसरा घेतला. शिवाजी महाराजांसोबत निवडक मावळेही होते. तर लालमहालाची सर्व माहिती असलेले शिवाजी महाराज महालात घुसले. त्यानंतर महालात धावपळ सुरू झाली. शाहिस्तेखानही पळून जाण्याच्या तयारीत होता. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी संधी साधली आणि वार केला. त्यात शाहिस्तेखानाची बोटं तुटली. आणखी वाचा - शिवजयंती विशेष: प्रत्येकाने आदर्श घ्यावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची खास गुणवैशिष्ट्ये ही बातमी सगळीकडं पसरली. शाहिस्तेखानाच्या फौजेलाही ही माहिती मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेचा सामना करण शक्य नव्हतं. महाराजांनी मावळ्यासहित सिंहगडाचा रस्ता धरला. शाहिस्तेखानाचं सैन्य शिवाजी महाराजाचा पाठलाग करत होतं. या सैन्याला चकवा देण्यासाठी महाराजांनी क्लृप्ती लढवली. महाराजांनी बैलाच्या शिंगांना पेटत्या मशाली बांधल्या आणि हे बैल कात्रज घाटाच्या दिशेनं सोडून दिले. झालं, शाहिस्तेखानाचं सैन्य कात्रजच्या घाटाच्या दिशेनं गेलं आणि महाराज सिंहगडावर पोहोचले. शिवाजी महाराजांच्या एका गनिमी काव्यामुळं कात्रजचा घाट दाखवण्याची म्हण रूढ झाली.