अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी तरुणांना लाभ होणार

रवींद्र जुनारकर, चंद्रपूर</strong>

अर्ध्यावर शिक्षण सोडून देणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींना पुढील  शिक्षणाची व्यवस्था करून नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हय़ातील पोलीस ठाण्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यात येणार आहे. अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

गडचिरोली व गोंदिया जिल्हे नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळत असून तेथील आदिवासी तरुण-तरुणी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. बहुतांश तरुण चौथी, पाचवी, सहावी व सातव्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर ते सोडून दिले आहे. अर्धवट शिक्षित तरुणांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर तरुणांना शिक्षित करून विधायक मार्गाने वळवण्यासाठी गडचिरोली-गोंदियाचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी या दोन्ही जिल्हय़ात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. धोडराज, लाहेरी, कोसी, दामरंचा, पातागुडम, गट्टेपल्ली, कसनासूर या भागात मुक्त विद्यापीठाचे हे केंद्र सुरू होईल.

दोन्ही जिल्हय़ातील अतिदुर्गम गावे आणि तेथील  शिक्षण सोडून देणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच शाळाबाहय़ मुलांचीही यादी तयार केली जात आहे. पोलीस ठाण्यातच हे मुक्त विद्यापीठाचे केंद्र राहणार आहे. या केंद्रांमधून सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातील. पाचवी व सहावी नापास आदिवासी तरुणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला की त्याला मुक्त विद्यापीठाची दहावी व बारावीची परीक्षा देता येणार आहे. एकदा दहावी व बारावी झाले की मग त्याला बीए व बीकॉॅम आदी पदवीचे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा इतरही शिक्षण दिले जाणार आहे.

‘‘झाडापापडा या गावाला भेट दिल्यावर तेथे शाळाबाहय़, अशिक्षित तरुण बघितल्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या केंद्राची कल्पना सुचली. नासिक येथील मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश बोंडे यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव पाठवला. लवकरच हे केंद्र सुरू होणार आहे.’’

– अंकुश शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली-गोंदिया

‘‘ सहा ते सात महिन्यांचा हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी, बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण घेता येणार आहे. कृषी विज्ञान केंद्र नाशिकच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच कौशल्य विकासाचेही  शिक्षण दिले जाणार आहे. याच वर्षी हे केंद्र सुरू होईल. ’’

– दिनेश बोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक