"टाळेबंदी म्हणजे एकप्रकारचा गतीरोधक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी याच गतीरोधकाचा मोठा उपयोग झाला. जर ही टाळेबंदी लागू केली नसती तर आज करोनाचा गुणाकार मोठ्या प्रमाणात झाला असता. त्यामुळेच ही टाळेबंदी लागू करण्यात आली," असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. "सध्या राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. असं असलं तरी सौम्य, अतिसौम्य लक्षणं असलेल्यांची संख्या ८० टक्के आहे. परंतु ते करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ते क्वारंटाइन आहेत. तसंच यापूर्वी जे करोनाग्रस्त होते त्यांच्या संपर्कात काही लोक आले त्यामुळे हा आकडा आपल्याला वाढताना दिसत आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र लढाई लढतोय “महाराष्ट्र करोनाविरोधतली लढाई लढतो आहे, खंबीरपणे ही लढाई महाराष्ट्र लढतो आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा या कित्येक वर्षांच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र कमी नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, क्रांतिकारी विचार हे सगळं रुजवणारा आणि जपणारा हा महाराष्ट्र आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मी करोनाविरोधातल्या लढाईत जिंकणार हे मला माहित आहे. कारण महाराष्ट्र माझ्या साथीला आहे. आपण करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा- मुंबई, ठाणे, पुणेकरांना लॉकडाउनमधून दिलासा नाहीच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत महाराष्ट्र दिनाला ६० वर्षे "महाराष्ट्र दिनाला ६० वर्षे पूर्ण झाली. आजचा हीरक महोत्सव राज्यभरात साजरा करायचा असं आपण ठरवलं होतं. पण नाईलाज आहे. आज मी अभिवादन करायला गेलो तेव्हा मास्क लावला होता. संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण झाली होती त्यावेळी कसा सोहळा झाला ते सगळ्यांना आठवत असेल. १ मे २०१० रोजी लाखो लोक जमले होते. शिवसेना प्रमुख, बाबासाहेब पुरंदरे होते आणि लतादीदी होत्या. बहु असोत सुंदर हे १९६० मध्ये गाणं लतादीदींनी गायलं होतं तेच गाणं पुन्हा २०१० पुन्हा गायलं होतं. आज त्याच ग्राऊंडमध्ये आपण करोनाग्रस्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतो आहे," असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.