समृद्धी महामार्गासाठी आता राज्य सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच समृद्धी महामार्गाचं काम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचत समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती दिली नाही. केवळ आम्ही कामांचा आढावा घेत आहोत. समृद्धी महामार्गासाठी राज्य शासन कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारणार होते. त्या कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागणार होते. परंतु आता महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. हा प्रकल्प महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा असेल. तसंच समृद्धी महामार्गालगतच्या व्यवसायांमधून रोजगार निर्मिती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसंच कोणत्याही सिचन प्रकल्पाला आपण स्थिगिती दिली नाही. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेताना कालव्यांचीही दुरूस्ती करण्यात येणार आहेत. तसंच गोसेखुर्द प्रकल्पासाठी लागेल तेवढा पैसाही राज्य सरकार देईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसंच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० रूपये अधिक देण्यात येतील. पूर्ण विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मदत करण्याची विनंती केली. मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.