विडय़ाचे पान हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. रुचकर भोजनानंतर हटकून विडय़ाच्या पानाचा तोबरा भरणारेही बख्खळ. अशा या ‘लोकमान्य’ पानाला मात्र थंडीमुळे पानगळ लागली आहे. विडय़ाच्या पानाची मोठी बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या सांगली परिसरातील अनेक पानमळे यंदा कडाक्याच्या थंडीने निष्पर्ण झाले आहेत. मुंबईच्या ‘लोकमान्य’ बाजारात सांगली जिल्ह्य़ातील मालगावमधील पानाला जोरदार मागणी असायची. मिरज तालुक्यातील मालगाव शिवारातील पानमळे मात्र सध्या कमी झाले आहेत. परंतु आरग, बेडग, लिंगनूर, मंगसुळी, शेडबाळ, उगार आदी परिसरातील पानमळ्याखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. या भागात निचऱ्याची जमीन असल्याने पानमळ्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पानाच्या उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा वापर सुरू झाल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. यातील काही विद्राव्य खतांचा वापर वेलीचा शेंडा मोठा करण्यासाठी होऊ लागल्याने आणि कालव्याचे पाणी पाटपाणी पद्धतीने दिल्याने जमिनीतील क्षाराचे प्रमाणही वाढले आहे. थंडीत वाढ झाल्यावर तर हे पानमळे पूर्णपणे निष्पर्ण होऊ लागले आहेत.पाने महागकळीच्या पानाचा दर ६०० ते ८०० रुपये प्रतिदहा कवळय़ाला पोहोचला आहे. एका कवळीमध्ये ३०० पाने असतात. मुंबई बाजारात उठाव असणाऱ्या फापडा पानाचा दर डागाला ३७०० ते ४४०० रुपये असा मिळत आहे. यातील एका डागात १२ हजार पाने असतात. काय आहे लोकमान्य पान?मुंबईच्या लोकमान्य पान बाजारात सांगली जिल्हय़ातील मालगावमधील पान एकेकाळी चविष्ट म्हणून खूप प्रसिद्ध होते. लोकमान्य टिळकांनाही हे पान आवडायचे. हाच संदर्भ घेत पुढे मुंबईच्या पानबाजारालाच लोकमान्य टिळकांचेच नाव देण्यात आले.